शब्दाचे सामर्थ्य १२१

त्यांचा-माझा प्रत्यक्ष परिचय पुढे मीही सार्वजनिक कामात पडल्यानंतर वाढत गेला. त्यांच्या मुलीही शिक्षण घेत होत्या. विशेषतः, त्यांची थोरली कन्या डॉ. सरोजनी बाबर या शरीराने अधू आहेत. परंतु शिक्षणाच्या बाबतीत त्यांना अधू ठेवावयाचे नाही, ही अण्णांची प्रतिज्ञा होती, ती त्यांनी पुरी पण केली. कु. आक्काताईंना त्यांनी आपले सर्व संस्कार पूर्ण दिले होते. पुण्यात घरात करून राहिल्यानंतर त्यांचा पुण्यातील विद्वान मंडळींमध्ये राबता सुरू झाला आणि या परिचयाच्या संस्काराची आक्काताईंना मदत झाली. त्यांनी आक्काताईंना लेखनास प्रवृत्त केले, मदत केली आणि संशोधनात्मक विषय त्यांनी घ्यावा, असा आग्रह धरला. त्याचेच परिणत स्वरूप म्हणजे आजच्या डॉक्टर सरोजिनी बाबर या आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील सुसंस्कृत विचारांना त्यांनी आपल्या जीवनात महत्त्व देऊन, ते संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबीयांत पसरविले. ते निवृत्त झाल्यानंतर व त्याआधीही त्यांचा राजकारणाकडे ओढा होता. त्यांचे राजकारण कोणत्या एका पक्षाचे नव्हते. बहुजन समाजात कार्य करणार्‍या कर्त्या-सवरत्या मंडळींना मदत करणे, सल्ला देणे, चर्चा करणे या प्रकारचे सहकार्य करून त्या कामाला ते एक नवी बैठक देण्याचा प्रयत्‍न करीत होते. त्या वेळी सांगली जिल्ह्यात काम करणारे आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील यांचे त्यांच्याशी संबंध याच कारणाने आले आणि कै. अण्णासाहेबांचे घर वसंतरावांचे घर झाल्यासारखे झाले होते. १९४८ नंतर श्री. भाऊसाहेब हिरे महाराष्ट्राच्या राजकारणात काम करू लागले. त्या वेळी त्यांच्याशी कै. अण्णांचा मोठा राजकीय घरोबा तयार झाला. श्री. भाऊसाहेब हिरे अण्णासाहेबांची नुसती विचारपूस करीत नसत, तर ते त्यांचा अधून-मधून सल्लाही घेत असत, हे मला माहिती आहे. पुढे त्यांच्याच आग्रहाने डॉ. सरोजिनी बाबर यांनी निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला व त्या बरीच वर्षे विधानसभा व राज्यसभा यांत काम करीत होत्या. अर्थात आम्ही सर्व मंडळी त्यांना याबाबत मदत करीत होतो. विशेषतः, मी कै. अण्णांना अतिशय आदर देत असे. ते कधी आपुलकीने मुद्दाम घरी चहाला किंवा जेवावयास बोलावून घेत असत. मग त्यांच्याशी तास-दोन तास चर्चा व गप्पा होत असत. त्यांतून काही तरी महत्त्वाचे बरोबर घेऊन गेल्यासारखे वाटत असे. कारण अशा चर्चेतून ते चांगल्या वाचलेल्या पुस्तकांची माहिती देत. पुण्यातील सर्व ज्ञानी विद्वानांत ऊठ-बस असल्यामुळे त्यांच्या मताचीही ते माहिती देत. म्हणून कै. अण्णांचा सहवास म्हणजे एक विचारांची उत्तम शिदोरी होती.

आज अण्णा नाहीत. परंतु अण्णांनी सुरू केलेली समाज शिक्षण माला आजही चालू आहे. अण्णांचे काम ती पुरे करीत आहे. साक्षरांमध्ये ज्ञानप्रसारही व्हावा. ही त्यांची या कामातील प्रेरणा आहे. हा माझ्या मताने त्यांनी ठेवलेला फार मोठा वारसा आहे. आक्काताईंनी तो पुढे चालू ठेवला आहे, ही त्यांची पितृभक्ती अभिनंदनीय आहे.

कै. अण्णांच्या स्मृतीस माझे अभिवादन.