शब्दाचे सामर्थ्य १२२

४०

डॉ. धनंजयराव गाडगीळ

कै. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या जीवनाला कृतार्थ जीवन म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकात आपले विशिष्ट ध्येय निवडून, त्याला जीवन वाहून घेऊन निग्रहाने सेवा करणा-या ध्येयवादी पुरुषांची जी परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली, त्याच परंपरेचे डॉ. गाडगीळ हे प्रतीक होते. डॉ. गाडगीळांवर न्या. रानडे, लो. टिळक व गोपाळराव गोखले या तिघांचे संस्कार झाल्यामुळे त्यांना समग्र व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले होते. न्या. रानड्यांची शास्त्रीय दृष्टी, गोखल्यांची सखोल व चौफेर व्यासंगी वृत्ती व टिळकांची लोकाभिमुखता, कठोर व निग्रही बाणा यांच्या संस्कारांतून गाडगीळांचे व्यक्तित्व घडविले गेले होते. त्यामुळे गाडगीळ महाराष्ट्रातील व भारतातील राजकीय स्थित्यंतराबरोबर जी तितकीच महत्त्वाची सामाजिक व आर्थिक क्रांती होत होती, तिचे द्रष्टे पुरुष ठरले.

पण केवळ बौद्धिक सखोलता किंवा द्रष्टेपणा एवढेच गाडगीळांचे वैशिष्ट्य नव्हते. गाडगीळांनी केवळ तत्त्वचिकित्सा किंवा बौद्धिक काथ्याकूट केला नाही. गाडगीळांची प्रतिभा व प्रज्ञा सर्जनशील होती. एखाद्या प्रश्नाची मूलगामी चिकित्सा ते करीत आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एखादी योजना व आराखडा सुचवत, सैद्धांतिक आग्रह व त्याला जोडून कार्यक्रम असे त्यांचे नियोजन असे, त्यातूनच त्यांची सामाजिक समीक्षा, व्यवहारी दृष्टी यांचा प्रत्यय येत असे. या सर्व चिंतनाची मूळ प्रेरणा समाजहित ही होती. दरिद्री बहुजनसमाजाच्या हितासाठी, सुखासाठी गाडगीळांनी काही आग्रह धरले. एका अर्थाने गाडगीळ 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' या थोर तत्त्वाचे प्रतीक होते. त्यांच्या उपाययोजनेशी मतभेद झाले, तरी त्यांची जी आधारभूत सामाजिक दृष्टी होती, तिच्याबद्दल कधीच कोणाला शंका वाटली नाही. हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण आर्थिक व सामाजिकदृष्ट्या ज्या वर्गात आपण जन्मतो व वावरतो, त्याच्या पलीकडे जाऊन बहुजनसमाजाच्या सुख-दुःखांशी समरस होणे किंबहुना त्याच्याच दृष्टिकोनातून सर्व प्रश्नांकडे पाहणे, त्यासाठी कार्यशील होणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणूनच गाडगीळांनी महाराष्ट्रातील व भारतातील बुद्धिमंतांत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करून ठेवले आहे.

डॉ. गाडगीळांच्या जीवनाची व व्यक्तित्वाची ही जी बैठक होती, तीतूनच त्यांचे जीवनकार्य साकार झाले, हे करत असताना गाडगीळांच्या संघटनकौशल्याची प्रचीती महाराष्ट्राला आली. गाडगीळांमध्ये एक प्रकारची अलिप्तता होती, पण त्या अलिप्ततेत अलगपणाची भावना नव्हती. म्हणून निरक्षर लोकांशी, अडाणी समजल्या गेलेल्या शेतक-यांशी किंवा सर्वसाधारण कार्यकर्त्यांशीही ते समरस होऊन वागत. त्यांनी सहकारी संस्था उभारल्या, चालविल्या व त्यांसाठी लागणारे सुजाण नेतृत्व स्वतःच निर्माण केले व आपले आर्थिक विचार व सिद्धान्त यांची एक प्रयोगशाळा महाराष्ट्रात निर्माण केली. म्हणून गाडगीळ हे नुसते आर्थिक तज्ज्ञ नव्हते, तर ते निर्माते होते. कोणतीही निर्मिती करण्यासाठी लागणारे चातुर्य, कौशल्य, दूरदृष्टी व संघटनकौशल्य गाडगीळांनी दाखविले. म्हणून गाडगीळ आधुनिक महाराष्ट्राचे द्रष्टे पुरुष, तत्त्वचिंतक व रचनाकार होते, हे निःसंशय आहे. गाडगीळांनी आयुष्यभर अनेक समित्यांवर काम केले. त्या सर्वांचे मूल्यमापन तज्ज्ञ करतीलच. ते एक आदर्श अभ्यासक असल्याने कोणत्याही समितीवर काम करताना हाती घेतलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करीत. दोन-तीन उदाहरणे देता येतील.