भूमिका-१ (97)

प्रत्यक्ष कृतीत गुंतलेल्या कार्यकर्त्याला योग्य मार्गदर्शन व्हावे, अशी अपेक्षा आपण विद्यापीठांकडून अग्रक्रमाने बाळगली आहे. परंतु आजच्या भारतातील विद्यापीठांचा वा सर्वच शिक्षणसंस्थांचा विचार करताना सर्वत्र निराशेचा सूर निघतो, ही माझ्या दृष्टीने अधिक चिंतेची बाब म्हणावी लागेल. वर्तमान परिस्थिती कठीण खरीच. सारेच प्रश्न अधिकाधिक अवघड होत चालल्यासारखे दिसतात. ते सोडविणे जसे आमच्या हाती आहे, तसे ते जागतिक परिस्थितीवरही अवलंबून आहे. याचा प्रत्यय अलीकडे सर्वच राष्ट्रांना येऊ लागला आहे. आधुनिक विज्ञान व तंत्रविद्या यांच्या योगाने सर्वांचेच भवितव्य परस्परावलंबी झाले आहे. सर्व घटकांचा संकलित विचार केल्यावाचून इत:पर कोणासही पुढे जाता येणार नाही. तथापि या बाबतीत भविष्यकाळात तरी आशेला जागा आहे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना शिक्षणक्षेत्राकडेच वळून पाहावे लागते. म्हणूनच आजची परिस्थिती अधिक चिंताजनक वाटते. कारण शिक्षणाविषयीची निराशा ही भविष्याविषयीची निराशा होय.

या निरोशेचे आविष्कार विविध स्वरूपांत पाहावयास मिळतात. सभोवतालच्या प्रत्यही वाढत्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर मात करण्याच्या बाबतीत, तिला योग्य आकार देण्याच्या बाबतीत शिक्षण अपयशी ठरले आहे. यातून ही निराशा उद्भवते. आणि सामाजिक वातावरणाचे सर्व दोष शिक्षणक्षेत्रात प्रकर्षाने दिसू लागल्याने ती दुणावते. या निराशेच्या भावनेतून अनेक वडीलधारी मंडळी आजचे शिक्षण अगदी कुचकामाचे झाले आहे, आजची शिक्षणपद्धती आमूलाग्र बदलली पाहिजे, थोडीफार सुधारणा केल्याने, लहानसहान बदल करून कार्यभाग साधणार नाही, असे म्हणू लागली आहेत. हे मूल्यमापन बरेच अर्थपूर्ण आहे, यात शंका नाही. तथापि सर्वच शिक्षणकार्याला दूषण देणे फारसे समर्थनीय वा योग्य होणार नाही, असे वाटते. कोणत्याही प्रकारचे असो, शिक्षण हे सर्वथैव दोषस्पद असू शकत नाही, ते काही दुष्कर्म नव्हे. त्यात दोष असू शकतात - नव्हे, आहेत. तथापि वाढत्या पिढीचा शिक्षणावरील विश्वासच नाहीसा करणे हा काही शिक्षणपद्धती सुधारण्याचा मार्ग नव्हे. भावी शिक्षणपद्धतीत आजचे अभ्यासक्रम, अध्यापन व परीक्षापद्धती इत्यादी गोष्टी पुष्कळच बदलाव्या लागतील, यात संशय नाही. आजचा औपचारिकपणाही बराच कमी होईल. तथापि हे सारे मान्य करूनही भावी पिढ्यांचा ज्यायोगे शिक्षणावरील विश्वास ढासळेल, असे काहीही करणे इष्ट नाही, असे मला वाटते.

वडीलधा-या मंडळींच्या निराशेची दुसरी बाजू म्हणजे तरुण पिढीतील वैफल्याची भावना, ही होय. आजकाल तरुण मंडळी काहीशी रागावलेली आहेत. आपण मिळविलेले शिक्षण प्रत्यक्ष जीवनातील काही प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत निरुपयोगी आहे; पदवी मिळाली, तरी नोकरी मिळत नाही, सामाजिक दर्जा सुधारत नाही, आर्थिक परिस्थिती बदलत नाही, असा अधिकाधिक नकारात्मक अनुभव आल्याने तरुणांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. आपली फसवणूक झाल्याने त्यांना वाटते, कोणी तरी आपला जणू विश्वासघातच केला आहे, असे वाटून त्यांच्या वर्तनात काही वेळा कटुताही दिसू लागते. जीवनातील स्पर्धा अधिक तीव्र बनत चालल्याने नोकरी वा कामधंदा मिळणे कठीण होते, पुढील मार्ग दिसेनासा होतो. अशा वेळी प्रस्थापित शिक्षणयंत्रणा व समाजरचनादेखील उलथून टाकावीशी वाटते. अशाच काहीशा भावनेमुळे कित्येकजण देश सोडून कायमच्या वास्तव्यासाठी अन्यत्र जातानाही दिसतात. इतर अनेकांच्या बाबतीत ते करीत असलेली कामे आणि त्यांनी मिळविलेले शिक्षण यांचा मेळ घालणे कठीण होते.