आमचे मुख्यमंत्री -३१

दादासाहेबांना त्यांच्या कारकिर्दीत खूप मानसिक त्रास झाला. त्यांचा व आचार्य अत्रे यांचा वाद सुरू झाला. त्याच वेळी म्युनिसिपल कामगारांचा संप झाला. २० नोव्हेंबर १९६३ रोजी मंत्रिमंडळाचा पहिला वाढदिवस साजरा करून ते दौ-यावर गेले. २२ नोव्हेंबर रोजी (गुरुवारी) सकाळी दौ-यावरून परत आले. बरे वाटत नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले गेले व २४-११-१९६३ रोजी त्यांचे निधन झाले.

दादासाहेबांचे व्यक्तिमत्व

दादासाहेब हे गरीबीतून वर आलेले नेते. त्यांची राहणी साधी. अहंकाराचा अभाव. प्रत्येकाशी आस्थेवाईकपणे बोलण्याची शैली, निर्व्यसनी, मितभाषणी. एकूण ते एक सभ्य मुख्यमंत्री होते. त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता. गरीबीतून वर आल्यामुळे गरीबांची कळकळ त्यांना होती. महात्मा गांधी यांच्या जीवनावर त्यांनी लिखाण केलेले आहे. तसेच ते कुशल पत्रकारही होते.

त्यांच्या मंत्रिमंडळाची कारकीर्द अल्प ठरली. त्यामुळे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला नाही. त्यांची यशवंतराव चव्हाणांवर दृढ निष्ठा होती व यशवंतरावांच्या आचारविचारांचे मी पालन करीन असे ते सातत्याने म्हणत असत.

संदर्भग्रंथ

१)    तु. नो. काटकर    कर्मवीर कन्नमवार, प्रकाशक श्रीमती गोपिकाबाई कन्नमवार, प्रथमावृत्ती फेब्रुवारी १९६४.

२)    विजय तखडे    मा.सा. कन्नमवार जा. २००२, अविष्कार प्रकाशन