कथारुप यशवंतराव- अशिक्षित बेकारांपेक्षा सुशिक्षित बेकार चांगले !

अशिक्षित बेकारांपेक्षा सुशिक्षित बेकार चांगले  !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्यावर यशवंतरावांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. असाच एक निर्णय होता, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा. ज्यांचे वार्षिक उत्पन्न नऊशे रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठीय शिक्षण मोफत करण्यात आले. हा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांनी पुण्यामध्ये एका चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं होतं. योगायोगाने यशवंतरावही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तेव्हा पुण्यातच होते. संयोजकांनी त्यांना दहा मिनिटांसाठी चर्चासत्रास उपस्थित राहण्याची विनंती केली. यशवंतराव गेले. एका शिक्षणतज्ज्ञांनी यशवंतरावांना प्रश्न केला , ' आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मोफत करून तुम्ही कोणते संकट निर्माण करीत आहात याची तुम्हाला जाणीव आहे का ?' या प्रश्नाचे उत्तरही त्यांनीच दिले. ' शिक्षणासंबंधी असले निर्णय घेऊन तुम्ही शिक्षित आणि प्रशिक्षित बेकारांची फौज निर्माण करीत आहात. हे बेकार लोक उद्या बंड करून उठतील, याचा काही विचार आपण केला आहे का ?'

त्या तज्ज्ञांचे म्हणणे शांतपणाने ऐकून घेतल्यावर यशवंतराव म्हणाले, ' मी याचा जरूर विचार केलाय. माझं असं मत आहे की, अशिक्षित बेकारांपेक्षा सुशिक्षित बेकार केव्हाही अधिक चांगले असतात आणि स्वत:चे व देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी जर उद्या त्यांनी बंड केले तर आमच्या निर्णयाचा हेतू सफल झाला असे मी मानेन.' या तोडीस तोड उत्तराने शिक्षणतज्ज्ञ निरुत्तर झाले व श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.