विदेश दर्शन - १२२

परंतु एकदम फार अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. दृष्टिकोनात काही मूलभूत फरक आहेत. सिस्टिम्स वेगळया आहेत. त्याचे काही परिणाम राहणारच. परंतु चर्चांना सुरुवात झाली आहे हे काही कमी महत्त्वाचे नाही असे त्यांचे मत आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे.

सिक्युरिटी कौन्सिलच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाकिस्तानचा प्रश्न निघाला. हिंदुस्थान व पाकिस्तानचे प्रश्न सोपे व्हावेत अशी त्यांची इच्छा. हिंदुस्थानने पुढाकार घेऊन पाकिस्तानला काही कन्सेशन द्यावे असे त्यांना वाटते.

हिंदुस्थान व पाकिस्तान यांचेमध्ये स्पर्धेचे (काँपिटिशन) व संघर्षाचे वातावरण निर्माण झाले की ते सर्वजण (Arabs) अडचणीत येतात असे ते म्हणाले. पाकिस्तानने नॉन-अलाइन्ड परिषदेत सामील व्हावे व हिंदुस्थानने निदान आब्झर्वर म्हणून इस्लामिक कॉन्फरन्समध्ये सामील व्हावे असे त्यांना वाटते.

रबार कॉन्फरन्सचे वेळी या ह्याखानने अगदीच वेडेपणाची भूमिका घेतली, हे त्याचे चुकले असे त्यांचे मत आहे. हिंदुस्थानमध्ये मोठया संख्येने मुसलमान आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे. चाळीसच्यावर असलेल्या इस्लामिक राष्ट्रांपासून दुरावा पत्करून राहणे हिंदुस्थानच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे याचा विचार केला पाहिजे असे त्यांनी सुचविले.

हे सर्व प्रश्न विदेश-नीतीचे दृष्टीने महत्त्वाचे व गंभीर प्रश्न आहेत असे मला वाटते. बदलत्या जागतिक वातावरणात या सर्व प्रश्नांचा विचार करावा लागेल. उत्तरे सोपी नाहीत. पण प्रश्न उभे आहेत.

सिनाईबाबत इजिप्त व इस्त्राएल यांच्या कराराबाबत मी त्यांचे मत विचारले. तेव्हा ते फार सावध बोलले. अरब-युनिटी संकटात आहे असे त्यांना वाटते. सादत हे रशियाचे विरोधी बोलून राजकीय चूक करीत आहेत. यामुळे अरब-जगतात ग्रेट-पॉवर स्पर्धा सुरू होईल व त्यात अरबांचे नुकसान आहे असे ते बोलले.

विचारात सखोलता व दूरदृष्टि दिसली.

सोव्हिएट रशियाचे P. R. श्री. मलिक यांना मुद्दाम भेटलो. स्पेशल सेशनच्या आर्थिक सहकार्याच्या कार्यक्रमाकडे काहीशा तटस्थ वृत्तीने ते पाहतात असे वाटले. डेव्हलपिंग देशांसाठी ते पुष्कळ करीत आहेत. परंतु यू. एन्. मधील कार्यक्रमामध्ये त्यांनी भागीदार झाले पाहिजे असे मी सुचवले.

या सेशनमध्ये चीन व रशिया यांनी एकमेकांची खूपच निंदानालस्ती केली. पश्चिमी राष्ट्रे ही सर्व मजा मोठया आनंदाने पहात होती.

चीनची भूमिका वैराची आहे. तिसरे युध्द अपरिहार्य आहे. रशिया सत्तापिपासू राष्ट्र असून आपल्या साम्राज्य प्रस्थापनेचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्यापासून अप्रगत देशांनी (थर्ड वर्ल्ड) सावध राहिले पाहिजे. इतरांच्या मदतीवर अवलंबून न राहता सेल्फ रिलायन्सचे तत्त्वाने आपली शक्ती वाढविली पाहिजे असा सल्ला चीनचा!