विरंगुळा - ३९

२१ जानेवारी

सकाळी ७ वाजता रेल्वेने नगरला पोहोचलो. बंगल्यावर पोहोचल्यावर समजले स्टेशनवर स्वामीची व कलेक्टरांची चांगलीच 'तोंडातोंडी' झाली. दुष्काळी परिस्थितीतील जिल्हा असताना हे चित्र काही आशादायी नव्हे! गुरवपिंपरीकडे सकाळी जाऊन आलो. सुमारे दोन हजार माणसे कामाला होती. बंडिंगची आणि या स्वरूपाची कामे पाहून किडवाईंच्या मनावर खूपच चांगला परिणाम झालेला दिसला. कालच्या सोलापूरच्या बैठकीत मुंबई सरकारचे काम योजनाबद्ध चालू आहे असे आपले स्पष्ट मत दिले.

दुपारी दीड वाजता येथील प्रसिद्ध पारशी व्यापारी इराणी, यांच्याकडे जेवणासाठी गेलो. नगर कँपमधील प्रमुख लष्करी अधिकारी सहकुटुंब जेवणासाठी निमंत्रित केले होते. दुष्काळी हवेतून काहीतरी निराळ्या वातावरणांत आल्यासारखे वाटले. किती कृत्रिम जीवन जगतात हे लोक! पुष्कळ वेळा माझ्या मनात येऊन जाते की या तऱ्हेचे जीवन घालविणारे हे लष्करी अधिकारी गरीब भारताचे खरे 'संरक्षण अधिकारी' असू शकतील का? परंतु पुन्हा असेही वाटते की अशा तऱ्हेचे विचार मनात आणून आपण त्यांच्यावर अन्याय तर करीत नाही का? मनात शेवटी उरणारी गोळाबेरीज अस्वस्थतेची आहे, हे कबूल केले पाहिजे. What a terrific gap between the way of life of the people and their...

नगर कॅम्पमधील प्रमुख अधिकारी श्री. चौधरी यांनी जेवण घेताना मला विचारले 'हैद्राबाद अधिवेशन कसे काय झाले?' मी 'ठीक' म्हणताच तो विचारतो ''पण पंडितजी किती वेळा रागावले? मला त्यांचा अनुभव आहे. अमेरिकेतील त्यांचा दौरा पार पाडण्याची माझ्यावर जबाबदारी होती. किती तत्काळ ते रागावतात आणि लगेच शांत होतात! तेही इतके की थोड्याच क्षणापूर्वी ते रागावले होते हे कुणाला खरेही वाटणार नाही.'' इतके सांगून किती छान हसले चौधरी! रात्रीच्या कलेक्टरकडील खान्यासही वरील मंडळी होतीच. श्री. व सौ. चौधरी हे जोडपे चांगलेच लोकप्रिय वाटले. रात्रीची सभा मोठीच झाली.
------------------------------------------------------------
२२ जानेवारी

नगरहून दौंडपर्यंत सकाळी दहापर्यंत दौड पुरी केली. पुण्याचे कलेक्टर हजर होते. दुपारी १२ वाजता इंदापूरला पोहोचलो. कार्यकर्त्यांच्या चर्चेत चांगलीच खळखळ झाली.

दुपारी २ वाजता वालचंदनगरकडे प्रयाण केले. तीन-चार तास वालचंदनगर प्रदक्षिणा केली. सायंकाळी ७ वाजता सूर्यास्ताच्या सुमारास नीरा काठी 'हुर्डा पार्टी' ऐन महाराष्ट्रीय थाटात झाली. रात्रीचे जेवण करून भिगवण स्टेशनवर मेल गाठली.

दहा-बारा दिवसांनी मुंबईस घरी पोहोचलो. इतक्या दिवसांनी दमल्या-भागल्या जिवाने घरी येण्याचा किती आनंद आहे नाही! दुपारी १२ पर्यंत कसा वेळ गेला समजलेच नाही. दुपारी ३ वाजता नेपियन सी रोडवरील किडवाईंच्या मुक्कामी भेट घेऊन दौऱ्यात झालेल्या चर्चांचे व प्रश्नांचे निराकरण करून घेऊन काही निर्णय निश्चित केले.
------------------------------------------------------------