विरंगुळा - ४३

१ मार्च १९५३

मार्च म्हणजे बजेटचे दिवस. बजेट मांडून झाले की चर्चेला जोर येत असतो. आज ता. ४ ला बजेटवरील सर्वसामान्य चर्चा पुढे चालू झाली. पुरवठा खात्याचा साधा उल्लेखही टीकेत होत नसल्यामुळे मी निर्धास्त होतो. चर्चेचा आजचा तिसरा दिवस आहे.

संध्याकाळी चि. दिनकररावांचे (कोतवाल) (भाचा) लग्नासाठी कराडला सहकुटुंब निघालो. रात्री पुण्यात थांबलो. सकाळी ५ वाजता पुण्याहून निघून ६॥ वाजता कराडला पोहोचलो. लगेच विट्याला श्री. जयंतीलाल शहा यांच्या लग्नासाठी जाऊन आलो. दुपारी श्री. गौरीहरकडे जाऊन पुष्कळ वेळ बसलो. बऱ्याच दिवसांनी अनेक गोष्टी मनमोकळेपणाने बोललो.

दिनकरचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. आमच्या आक्काच्या (मातोश्रीच्या) आनंदाला सीमा नव्हती. दिनकर हा आक्कांचा नातू. अनेक वर्षांच्या दु:खाचे ओझे तिच्या डोक्यावरून कमी झाल्यासारखे भासले. चि. दिनकर चार दिवसांचा असताना त्याचे वडिल वारले होते. तो दु:खाचा दिवस माझ्या नजरे समोरून गेला. आज आमचे दादा किंवा गणपतराव असते तर किती बरे झाले असते असा विचार मनात येऊन कंठ दाटून आला.
श्री. बी. बी. काळेपाटील यांनी चि. कुमारी लीलाबाईबाबत आक्काजवळ बोलणे केले. हे लग्न जमून येईल तर बरे होईल असे मलाही वाटते. पाहूया, काय योगायोग आहे तो!

कराड येथून सकाळी उठून मुंबईला जाण्याची तयारी करून मंडईत आक्काच्या (भगिनीच्या) घरी गेलो. सकाळचा रेडिओ ऐकत मुले बसली होती. तेवढ्यात बी. बी. काळे एका एकी येऊन सांगू लागला- ''मामा, स्टॅलिन रात्री निधन पावल्याची बातमी मॉस्कोहून अधिकृत जाहीर झाल्याचे आत्ता सांगण्यात आले.''

या थोर पुरुषाच्या निधनाची वार्ता ऐकून मला फार वाईट वाटले. कुणीतरी अगदी जवळचे माणूस गेल्यानंतर जशी हुरहुर लागते तशी हुरहुर! काही तरी जवळचे हरवले आहे अशी भावना मनाला सारखी बोचत होती. एक अत्यंत शहाणा नेता, या शतकातील एक अत्यंत कर्तृत्ववान आणि ध्येयवादी राजकीय विचारवंत म्हणून मला या पोलादी पुरुषाबद्दल आदर होता. with him ends a epoch.

मे महिना, उन्हाळा असूनही ऐन उन्हाळ्यातही मुंबईची हवा मला सोईस्कर वाटली. रात्री बारा वाजता मुंबईत पोहोचलो. श्री. दादासाहेब जगताप बरोबर होते. गेले पंधरा दिवस ज्या दगदगीत गेले त्यामुळे येथे कितीतरी निवांत व काहीसे आल्हाददायकही वाटत आहे.