इतिहासाचे एक पान. ३०५

काँग्रेस-अंतर्गत या दोन गटांशी यशवंतरावांचे आपुलकीचे संबंध होते हे खरं, परंतु दुर्दैव असं की, १९६९ च्या जुलैंत भारताच्या राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार निश्चित करण्याचा प्रश्न आणि त्या संदर्भात नंतरच्या काळांत घडलेल्या घटना, यामुळे यशवंतरावांचा या दोन्ही गटांशीं असलेल्या संबंधांत कमालीचा व्यत्यय आला. काँग्रेस-पक्ष दोन गटांत विभागला जाऊं नये यासाठी त्यांनी प्रामाणिकपणें प्रयत्न केले, परंतु कांही जणांनी त्याचा भलताच चुकीचा अर्थ लावला. यशवंतरावांचे विचार या सर्व प्रकरणांत डळमळीत आहेत अशी कुजबूज कांहींनी सुरु केली, तर कांहींनी ते कुंपणावर बसून आहेत असं सांगण्याला प्रारंभ केला. परंतु फरिदाबाद काँग्रेस-अधिवेशनानंतर ज्या क्रमानं घटना घडत गेल्या त्यांची तपासणी केली म्हणजे पक्षांतर्गत रस्सीखेचीमुळे पक्ष दुभंगण्याच्या निर्णयापर्यंत गोष्टी कशा पोंचल्या याचं चित्र स्वच्छपणें दिसूं लागलं; आणि या सर्व परिस्थितींत यशवंतरावांनी स्वीकारलेल्या भूमिकेचाहि खुलासा होऊ शकतो.

फरिदाबादा काँग्रेसनंतरच्या आठवड्याभरांत राष्ट्रपति डॉ. झाकीर हुसेन यांचं ३ मे १९६९ ला निधन झालं. वराहगिरी व्यंकटगिरी हे त्यावेळीं उपराष्ट्रपती होते. हंगामी राष्ट्रपति म्हणून त्यांचाच शपथविधि झाला; आणि नंतर पुढच्या एक-दोन दिवसांत नव्या राष्ट्रपतींच्या संदर्भांत वावड्या उडूं लागल्या. निजलिगप्पा हेच त्या वेळीं काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी युरोपचा दौरा आयोजित केला होता. नव्या राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निश्चित करण्याच्या हालचाली सुरू होतांच त्यांनी युरोपचा दौरा पुढे ढकलल्यांच जाहीर केलं. कारण त्यांना दिल्लीमध्ये थांबून राष्ट्रपतिपदासाठी कोणाची निवड करावी यासाठी काँग्रेसमधील मताचा अंदाज घ्यावा लागणार होता. परंतु नंतरच्या दोनच दिवसांत त्यांनी युरोपला जाणारा असल्याचं जाहीर केलं. ते मेच्या शेवटच्या आठवड्यांत दौ-यावर निघणार होते.

दरम्यान त्यांनी व्ही. व्ही. गिरी यांची भेट घेतली आणि डॉ. झाकीर हुसेन यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या पदासाठी कराव्या लागणा-या निवडीसंबंधांत चर्चा केली. गिरी यांनी त्यांना पूर्वीच्या निर्णयाचं स्मरण करुन दिलं. राष्ट्रपतींचं निधन झालं, तर उपराष्ट्रपति म्हणून काम करणारास ती जागा देण्याची प्रथा त्यापूर्वी सुरू झाली होती. याचा अर्थ गिरी यांचीच राष्ट्रपतिपद स्वत:ला मिळावं अशी इच्छा होती. निजलिंगप्पा यांनीहि या चर्चेच्या वेळीं गिरी यांना आपला पाठिंबा दर्शवला आणि राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी निवडणूक लढवावी, आपला संपूर्ण पाठिंबा राहील, असं आश्वासनहि दिलं.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर हें प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयांत नेण्यांत आलं त्या वेळीं गिरी यांनी सादर केलेल्या पुराव्यांतच या घटनेचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. २१ एप्रिल १९७० ला हा पुरावा सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झाला. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निश्चित करण्याबाबत " माझा शब्द हा अखेरचा शब्द असून तुम्ही तें आता सर्व माझ्यावर सोपवा" असं नि:संदिग्ध आश्वासन निजलिंगप्पा यांनी आपणास दिलं होतं. निवडणुकीची अंतिम फेरी जिंकायची तर तोपर्यंत गिरी यांनी आपली वागणूक कशी ठेवावी याचेहि धडे निजलिंगप्पा यांनी त्यांना दिले होते. डोळे असून पहायचं नाही, कान असून ऐकायचं नाही आणि तोंड असून बोलायचं नाही, या वागणुकीचं निदर्शक म्हणून माकडाचीं चित्रं तयार करण्यांत आलेलीं आहेत. म. गांधींच्या काळापासून ती प्रचलित आहेत. तीं चित्रं मीं आपल्या टेबलावर ठेवलेली आहेत असं त्यांनी गिरी यांना सांगितलं आणि सर्व कांही ठीकठाक होईल, असं भरघोस आश्वासनहि दिलं. गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयांत दाखल केलेल्या पुराव्यांत या सर्वांचा उल्लेख केलेला आहे.