यशवंतराव चव्हाण (101)

काँग्रेसने आणि भाजपने चौधरी चरणसिंगांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन त्यांना पंतप्रधानपदावर बसविले. चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात यशवंतरावांनी उपपंतप्रधानपद स्वीकारावे अशी इंदिराजींनी गळ घातल्यावर यशवंतरावांनी महाराष्ट्रातील कांही खासदार, कांही नेते, मुख्यमंत्री, मंत्री यांचेशी याबाबत विचारविनिमय केला. खासदार आबासाहेब कुलकर्णी, किसन वीर आदि मंडळींनी उपपंतप्रधानपद स्वीकारण्यास कांही हरकत नसावी असा सल्ला दिला. कांही खासदारांनी मात्र विरोध दर्शविला. या सूचनेमागे इंदिराजींची राजकीय खेळी असण्याची शक्यता असल्याचे यशवंतरावांना सांगितले. 'जनता पक्ष' अधिक खिळखिळा करण्याची इंदिराजींची मनीषा होती आणि त्यासाठी यशवंतरावांनी उपपंतप्रधानपद स्वीकारावे असा त्यांचा आग्रह होता. त्याबरोबर चरणसिंगांवर सूड उगविण्यासाठी त्यांना कोंडीत पकडायचे आणि पंतप्रधानपदावरून हुसकावून लावायचे असाही इंदिराजींचा डाव होता. जनता पक्ष सरकारचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री या नात्याने चरणसिंगांनीच इंदिराजींना अटक करण्याची कारवाई केली होती. तो राग इंदिराजींच्या मनात खदखदत होता. चौधरी चरणसिंग हे पंतप्रधानपद मिळाल्याबद्दल मनातून खूष होते, समाधानी होते. इंदिराजींचे डावपेच त्यांना उमगले नाहीत. कांही दिवसांनी चरणसिंगांना दूर करण्याचे प्रयत्‍न सुरू करण्यात आले.

इंदिराजींच्या भोवतालच्या लोकांनी त्यांना सावध केले. चरणसिंग गेले आणि चव्हाण हे पंतप्रधान बनले तर तुम्ही काय करणार असा इषारा दिला गेला. मग चव्हाणांना पंतप्रधानपद मिळू नये या दृष्टीने खेळी सुरू झाली. चरणसिंगांचा पाठिंबा काढून घ्यायचा, त्यांचे सरकार कोसळू द्यायचे पण यशवंतरावांना पंतप्रधानपद मिळू द्यायचे नाही या दृष्टीने इंदिराजींनी हालचाली सुरू केल्या. त्यांना साथ देणारे काँग्रेसचे कांही मुखंड चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अगोदरच घुसवून ठेवलेलें होते. चरणसिंग यांचा यशवंतरावजींवर विश्वास होता. त्यांच्या सल्ल्यानुसारच चौधरी साहेबांनी कांहीजणांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते. ही मंडळी कृतघ्न बनतील, चरणसिंग आणि यशवंतराव या दोघांनाही एकाच वेळी दगा देतील याची कल्पना कित्येकांना नव्हती. कट, कारस्थान, भाऊबंदकी, दगाबाजी याबद्दल दिल्लीची जी ख्याति होती तिचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. मंत्रिमंडळ कोलमडल्यावर लोकसभा बरखास्त करून नव्याने निवडणूका घेण्यात आल्या.

या निवडणुकीपूर्वी १९७८ मध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटला. इंदिरा गांधी यांनी ''भारतीय राष्ट्रीय काँग्रेस'' ऐवजी स्वतःच्या नांवाने ''इंदिरा काँग्रेस'' या पक्षाची स्थापना केली. १९६९ मध्ये काँग्रेस पक्ष फुटून ''सिंडिकेट'', ''इंडिकेट'' असे दोन भाग पडले होते. तेव्हांपासून इंदिराजींनी हुकूमशहाची भूमिका अंगिकारली होती. दिल्लीतील विठ्ठलभाई पटेल सदनमध्ये एके दिवशी इंदिरानिष्ठ काँग्रेसजन एकत्र जमले. त्यांनी आपल्या भाषणातून इंदिराजींची आरती ओवाळली आणि पितृसंघटनेतून फुटून नवा पक्ष काढण्याचा मानस व्यक्त केला. त्यांत महाराष्ट्रातील वसंत साठे होते आणि नासिकराव तिरपुडे पण होते. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस अशी दोन छकले केंद्रस्थानी पडल्यावर त्याची प्रतिक्रिया राज्याराज्यातून उमटली. जागजागी ''आय'' काँग्रेस आणि ''आर'' काँग्रेस अशा वेगवेगळ्या राहुट्या उभ्या राहिल्या. एका व्यक्तीच्या नांवाने वेगळा काँग्रेस पक्ष स्थापन करण्याची कल्पना यशवंतरावांना कशीशीच वाटली. ते बेचैन झाले. त्यांना सुरत काँग्रेसच्या वेळचे लोकमान्य टिळक आणि अन्य नेते यांच्यातील मतभेद आठवले. सुभाषचंद्र बोस आणि इतर नेते, आचार्य कृपलानी आणि इतर नेते यांच्यातील मतभेद आठवले. परंतु या प्रसंगी काँग्रेस पक्ष फोडून स्वतःच्या नांवाचा नवा पक्ष कोणी काढलेला नव्हता. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसची दोन छकले पडली आणि विरोधकांना आनंदाच्या उफळ्या फुटल्या. बहुतेक मतदारसंघात ''आय'' काँग्रेसचा आणि ''आर'' काँग्रेसचा असे दोन उमेदवार उभे राहिल्याने विरोधकांना वाटले की, आपण सहज जिंकू. तथापि घडले वेगळेच.