यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ९२

''भाऊसाहेबांच्या वाङ्मयात निदान मी कधी अमावास्या पाहिली नाही.... हा चांदण्यांचा लेखक आहे.  प्रकाशाचा लेखक आहे.''  या शब्दांत ते खांडेकरांचा गौरव करतात.  (कित्ता २४३).

त्यांच्या मते ह. ना आपटे ''हे राष्ट्रीय उषःकालाचे कादंबरीकार होते.'' (कित्ता, २१२), तर डॉ. धनंजयराव गाडगीळ हे 'बहुजन हिताय बहुजनसुखाय या थोर तत्त्वाचे प्रतीक़' आणि तत्त्वचिंतक रचनाकार होते (कित्ता, १९४).

गांधीजींचे युगप्रवर्तकत्व सांगताना यशवंतराव युगप्रवर्तकाची पुढीलप्रमाणे व्याख्या देतात :

''व्याकरणाचे जुने नियम तो जणू फेकून देतो.  जुनी फुटपट्टी तो मोडून टाकतो, स्वतःच्या गायकीला साजतील, असे नवीन स्वर आणि ताल बसवितो आणि नवे सूर आळवू लागतो.'' (कित्ता, १३२).

यशवंतरावांनी रंगवलेल्या व्यक्तिचित्रांमध्ये सर्वाधिक प्रभावी ठरली आहेत, ती त्यांच्या मातोश्री विठाई आणि पत्नी वेणूताई यांची व्यक्तिचित्रे.  कारण एक तर या दोन्ही व्यक्ती त्यांच्या 'जीवनाला आकार आणि आशय देणा-या' होत्या.  आणि दुसरे असे की, त्यांची व्यक्तिचित्रे लिहायची, म्हणून स्वतंत्रपणे ठरवून न लिहिता प्रसंगवशात आपापतः लिहिण्याच्या सहज ओघात ती आलेली असल्यामुळेही ती अधिक हृदयस्पर्शी उतरली आहेत.

आई हा विषय तर भल्याभल्या प्रतिभावंतांना झपाटून टाकणारा आहे.  माती आणि माता यांच्याशी एकरूप होणे हा आपला जन्मजात स्वभाव असल्याचे यशवंतरावांनी अनेकदा मान्य केले आहे.  ते म्हणतात,

''तीर्थतूल्य मातेच्या दर्शनाने माझे अष्टसात्त्वि भाव जागे होतात.  अंतर्मन निथळू लागते.  पौर्णिमेच्या चंद्रातून अमृतबिंद ठिबकावेत, अशी तिची प्रेमळ दृष्टी माझ्यावर वर्षावर करते आणि नकळत पायगत झालेल्या पापण्या, हृदयाच्या चौफाळ्यावरील पावले धुंडाळू लागतात'' (कित्ता १२२).

शास्त्रज्ञ आणि अध्यात्मी जीवनाचे जे रहस्य सांगतात, त्याचा साक्षात्कार आपल्याला मातीच्या आणि मातेच्या सान्निध्यात होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  त्यांच्या शब्दांत,

''तिच्या अंतःकरणाच्या अवकाशात मी स्थिरावतो, प्रशांत मनोभूमीवर पहुडतो, आत्मतेजाने तेजाळून निघतो, प्रेमामृताने ओलाचिंब होतो आणि श्वासात श्वास मिसळून जातो.'' (कित्ता, १२३).

''कवी यशवंतांना आईची आठवण झाली आणि घराघरातली आई जागी झाली.''  ('युगांतर', २४६) या शब्दांत वी यशवंतांचा गौरव करणा-या यशवंतरावांनी ज्या शब्दांत आपल्या निरक्षर भोळ्या मातेचे ॠण व्यक्त केले आहे, ते यशवंतांच्या कवितेलाही मागे टाकणारे आहे.  सत्काराला उत्तर देताना एका ठिकाणी ते म्हणतात,