यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ६७

गांधीवादी पर्यायही नाकारला

समाजवादाचा रॉयप्रणीत आराखडा जसा चव्हाणांनी नाकारला, तद्वतच गांधींनी समाजवादाच्या विचारसरणीला एतद्देशीय स्वरूपात मांडण्याचा केलेला प्रयत्नही चव्हाण स्वीकारू शकले नाहीत.  पश्चिमी समाजवादाला पर्याय म्हणून रॉय यांचा नवमानवतावाद होता.  तसाच गांधींचा सर्वोदय विचार होता.  पण चव्हाण त्या विचारापासूनही अलित्पच होते.  गांधी-नेहरू असा संयुक्त उल्लेख ते करीत असले, तरी त्यांचा कल स्पष्टपणे नेहरूंच्या बाजूने होता.  'स्वतःला कधीच गांधीवादी न म्हणवून घेणारा मला भेटलेला पहिला नेता.' असे त्यांचे वर्णन वेलेस हँजेन या लेखकाने केले आहे. ('हू आफ्टर नेहरू ?' १३२).  भूमिगत चळवळीच्या खडतर वाटचालीत त्यांचे राजकीय संगोपन झाले असल्यामुळे असेल किंवा जहाल व झुंजार सातारा जिल्ह्याच्या 'समाजवादी' संस्कारांमुळे असेल; पण गांधीप्रणीत अहिंसा-सत्य-अस्तेयादी व्रतस्थ जीवनादर्शाचे त्यांना कधीच फारसे आकर्षण वाटले नाही.  वैयक्तिक जीवनातही विरक्तपूर्ण आचरणाचे त्यांनी स्तोम माजवले नाही.  सुखवस्तू जीवनपद्धती त्यांना आवडायची.  गांधींची आध्यात्मिकताही त्यांना मानवणारी नव्हती.  गांधी-विचारांविरुद्ध बंडखोरी त्यांनी कधी केली नसली, तरी वर्तमानकाळात गांधीवादाची बरीच तत्त्वे गैरलागू झाली आहेत, याबद्दल ते निःशंक होते.  स्वतः खादी वापरीत असले, तरी खादीचे संपूर्ण तत्त्वज्ञान त्यांनी कधीच स्वीकारले नव्हते, आणि गांधीमार्गातील विधायक कार्यक्रम, क्रियाशील कार्यकर्ते, जनसंपर्क वगैरेंबद्दल त्यांना आस्था असली, तरी समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवून देशाला नवे आधुनिक रूप द्यायचे सामर्थ्य त्या कार्यक्रमांत आहे काय ?  या प्रश्नाचे त्यांचे उत्तर स्पष्ट नकारार्थी होते.  ('कृष्णाकाठ' : १५६).  त्यामुळे गांधीप्रणीत समाजवादाचा पर्याय त्यांनी गंभीरपणे विचारात घेतलाच नव्हता.