यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ११४

मराठा-कुणबी जातिसमूहाच्या वर्चस्वाखाली स्थानिक पातळीवर बलिष्ठ असलेल्या इतर जातीच्या अभिजनांना सत्तापदे देऊन सामावण्याचे तसेच पक्षातील, सहकारातील व पंचायत राज्यातील पदांसाठी खुली स्पर्धात्मकता अस्तित्वात असल्याचे भासवून महाराष्ट्रात काँग्रेसचे वर्चस्व टिकवण्यात यशवंतराव १९७२ पर्यंत यशस्वी झाले.  १९६७ सालच्या निवडणुकीत आठ राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे सत्तेवर आली, तेव्हा तर काँग्रेसचा अभेद्य वाटणारा बालेकिल्ला महाराष्ट्रात अबाधित ठेवणा-या यशवंतरावांना दिल्लीच्या राजकारणात वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.  केंद्राशी वाटाघाटी करताना महाराष्ट्राचे पारडे स्वाभाविकच त्याकाळी जड होते.  

पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही.  राज्यपातळीवरचे नेतृत्व बलशाली असणे हे श्रीमती गांधींच्या राजकारणाला नामंजूर होते.  प्रधानमंत्री होताना त्यांनी राज्यस्तरीय नेत्यांना हाताशी धरले असले तरी नंतरच्या काळात लोकांशी साक्षात संवाद स्थापन करून लोकानुरंजनी राजकारण करण्यावरच श्रीमती गांधींचा भर होता.  राज्य पातळीवर बळकट पाळेमुळे असलेले यशवंतरावांसारखे पुढारी हे त्यांच्या या राजकारणाच्या आड येत असल्यामुळे त्यांची पाळेमुळे जाणीवपूर्वक छाटण्याचे काम श्रीमती गांधींनी केले.  मराठा जातीचे, पण जनाधार नसलेले नेते त्यांनी त्यासाठी हाताशी धरले.  मराठा नेतृत्वाकडून यास मिळालेला प्रतिसाद त्यांच्यातील अंतर्गत फाटाफुटीवर प्रकाश टाकणारा होता.  इंदिरानिष्ठ मराठा नेते विरुद्ध महाराष्ट्रात राजकीय-आर्थिक प्रतिष्ठा असलेले वसंतदादा पाटील असे द्वंद्व सुरू असतानाच यशवंतरावांच्या प्रच्छन्न पाठिंब्यावर शदर पवारांनी मराठ्यांची तिसरी फळी उभी केली.  बंडखोरी करून काही विरोधी पक्षांच्या सहकार्याने त्यांनी पुरोगामी लोकदलाचे सरकार १९७८ साली महाराष्ट्रात स्थापन केले.

यशवंतरावांचे एकजातीय वर्चस्वाखालील बहुजातीय राजकीय अभिजनवादाचे सूत्र १९७० नंतरच्या काळात अनेक दृष्टींनी संकटात सापडले.  वसंतराव नाईकांनी औद्योगिक हितसंबंधांना मोकळा वाव दिल्यामुळे नवश्रीमंत मराठा वर्गाचे हितसंबंध आणि औद्योगिक हितसंबंध यांच्यातील अंतर वाढत गेले.  यातून कधी शिवसेनेला फूस दिली गेली, कधी प्रादेशिक अस्मितेची ढाल पुढे करून दलितांना लक्ष्य केले गेले, (मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरण), तर कधी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली तरुण मराठा गोळा झाले.  अशा प्रकारे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचे आव्हान आणि अंतर्गत विसंगती यातून मराठा नेतृत्वात विस्कळीतपणा येत गेला (पळशीकर, पूर्वोक्त २९).  राज्य पातळीवर श्रीमती गांधीकडून लादण्यात आलेले मुख्यमंत्री आणि दुस-या बाजुने शिक्षणविस्तारातून पुढे आलेल्या नव्या पिढीची दडपणे अशा कात्रीत काँग्रेस पक्ष सापडला.  शरद पवारांच्या बंडखोरीने मराठा समाजातील तरुण रक्ताला हायसे वाटले.  पण तो त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.  पवारांनी आपली समांतर काँग्रेस मूळ पक्षात विसर्जित करून टाकली.