यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १८-७९२०१२

पत्र - १८
दिनांक ७९२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

मागील पत्रात मी तुला टकले बोरगावच्या अत्याचारासंबंधी लिहिले होते, तो मे महिना असावा.  २६ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली.  देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली.  वृत्तपत्रांनी अग्रलेखाच्या जागा कोर्‍या सोडल्या होत्या.  सेंसॉरशिप लागली होती.  देशभरातील राजकीय पुढार्‍यांना अटका झाल्या होत्या.  काहीही समजण्यास वाव नसल्याने अफवांचा पूर वाहत होता.  आम्हीही इंदिरा गांधी, काँग्रेस यांच्याविरोधी होतो.  आणीबाणीला आमचाही विरोध होता.  शक्यतोवर जाहीर भूमिका न घेता भूमिगतांना मदत करण्यापर्यंत तो होतो.  जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाशी आमचे चांगले संबंध होते.  विशेषतः आबासाहेब वीर, चव्हाणसाहेब, यांच्याशी आमच्या संघटनेचे आणि डॉ. दाभोळकरांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे आम्हापैकी कुणालाही अटक झाली नाही.  बाकी जिल्ह्यातले आमचे साथी कुणी येरवड्यात कुशी नाशिकला जेलमध्ये होते.  काही भूमिगत होते.  साधना साप्‍ताहिक आणीबाणीविरोधी लिखाण करतच होते.  कालांतराने त्याच्यावरही बंदी आली.  मग मधू वाणी आणि इतर मित्रांनी एक अनियतकालिक काढले.  साधनेचे अंक आमच्याकडे असत.  ते जवळ बाळगणे तसे धोक्याचे होते.  पण हे अंक आम्ही आबासाहेब वीरांना देत होतो.  'समाजप्रबोधन पत्रिका', 'नवभारत', 'साधना' यांसारखे अंक आबा वाचत असत.

आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेलो की, आम्हाला फार सन्मानाने वागवत असत.  आमची कामे आम्ही विश्वासाने करीत असू.  इंदिराजींनी २१ कलमी कार्यक्रम जाहीर केला होता.  त्यात अनेक चांगल्या गोष्टी होत्या.  सावकारीपाशातून मुक्त होण्याचे एक कलम होते.  सामाजिक चळवळींचा भाग म्हणून त्याही स्थितीमध्ये आम्ही ग्रामीण भागात काम करीत होतो.  त्याने आबासाहेब वीरांशी आमचे चांगले संबंध झाले होते.  आम्हाला लागेल ती मदत ते करत असत.  आमचे पुढारी दिवसभर काँग्रेसविरोधी बोलत असले तरी रात्री काँग्रेस पुढार्‍यांशी गप्पा मारीत बसलेले असायचे.  आम्ही तरुण पोरे मात्र डोक्यात राख घालून क्रांतिकार्य करत असायचो.  असा आणीबाणीचा काळ गेला, आणीबाणी उठली.  इंदिराजींनी राजबंद्यांना मुक्त केले आणि निवडणुका जाहीर झाल्या.  ७७ साली काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला.  काँग्रेसची पीछेहाट झाली.  स्वतः इंदिरा गांधी पडल्या.  जनता पक्षाचे सरकार आहे.  यशवंतरावजी विरोधी पक्षाचे नेते झाले.  पुन्हा काँग्रेस फुटली.  इंदिरा काँग्रस, रेड्डी काँग्रेस दोन शकले झाली.  चव्हाणसाहेब रेड्डी काँग्रेसमध्ये राहिले आणि ७८ साली, महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक झाली.  जनता पक्षाची दिशा विनाशाकडे जात होती.  पण आम्ही कुणीही जनता पक्षात गेलो नाही.  आमचे अनेक साथी आग्रह करीत होते.  पण सातारच्या आम्ही मित्रांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जाणे शक्य नाही, असे सांगून जनता पक्षाला लांबूनच सलाम केला.  आमची सहानुभूती मात्र जनता पक्षाला होती.  निवडणुकांचे राजकारण करायचे नाही.  त्यापेक्षा परिवर्तनाच्या चळवळी गतिशील करायच्या, या भावनेने 'एक गाव एक पाणवठा' सारख्या चळवळीत आम्ही होतो.  

एके दिवशी आम्ही धामणेरहून सातार्‍याकडे येत होतो.  डॉ. दाभोळकरांची स्कूटर ते चालवीत.  मी मागे बसलेला असे.  गावागावांत आम्ही 'दलित हक्क समिती' नावाने संघटना चालवत होतो.  राजकारणात नसलो, तरी सगळ्यात होतो आणि कशातच नव्हतो !  नरूभाऊ म्हणाले, 'अभयसिंह महाराजांना जनता पक्षाचे तिकीट द्यायचे आहे.  तसा अण्णाचा निरोप आहे असे समजले.  चल, आपण त्यांना भेटू.'  वाटेतच सातारा-कोरेगाव रस्त्यालगत विसावा विहीर आहे.  ती महाराजांची आहे.  तिथे अभयसिंह महाराजांचा ऊसाचा मळा होता.  विहिरीवर इंजिन होते.  ते इंजिन दुरुस्त करत अभयसिंह महाराज बसले होते.  रुंद पायांचा पायघोळ पायजमा, अंगात बाह्यांचा ओपन शर्ट.  त्यावेळी ती फॅशन होती.  भव्य कपाळ, अत्यंत शांत, प्रसन्न चेहरा, ओठातल्या ओठात बोलणे, इंजिनाच्या तेलाने हात काळेभोर झालेले.  काही तेलाचे डाग पायजमा-शर्टावर.  दोन्ही चवड्यांवर बसलेले महाराज आमच्याकडे, म्हणजे रस्त्याकडे पाठ करून बसले होते.  आम्ही जवळ गेलो तरी ते त्यांच्याच तंद्रीत होते.  आम्ही अगदी जवळ गेल्यावर एकदम दचकले.  सावरत म्हणाले, 'काय डॉक्टर, काय काढलेत ?'  अत्यंत सभ्य, पापभीरू, सरळ, मितभाषी, मृदू नरूभाऊंनी त्यांना निरोप सांगितला.  एखादी पाल अंगावरून झटकावी तसे त्यांनी नरूभाऊंचे शब्द झटकले.  'डॉक्टर, अहो असलं काही मी कधी मनातही आणलं नाही.  आमचेच प्रश्न आम्हाला निस्तरता निस्तरता नको झाले.  हे झंझाट कशाला ?  ते राजकारण-बिजकारण आमचे दादा महाराज बघत होते.  आम्ही बाकीचे लोक आपापले उद्योग करीत असतो.  तिकडे अदालत वाड्यावर आईसाहेब महाराज आहेत.  त्यांना भेटा.  त्या सांगतील तुम्हाला.'  डॉक्टर म्हणाले, 'महाराज, अत्यंत नामी संधी आहे.  देशातलं वातावरण चांगलं आहे.  आपण नुसते उभे राहिलात तरी जिंकून याल.'