यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ७-१६ जून २०१२

पत्र - ७
दिनांक १६ जून २०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

दिवस पावसाळ्याचे व्हते.  आमचा फलटणचा पाऊस म्हणजे बिनभरवशाचा खेह.  शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला.  शेती हा तसा नेहमीच आतबट्ट्याचा खेळ.  पावसानं ओढ दिलेली, त्यानं खरीपातल्या पेरण्या रखडलेल्या.  बाजरीची हिरवीगार कणसं रानात डोलू लागली की, जीव कसा कापसाच्या बोंडावाणी फुलतुया.  पण चातकासारखी वाट बगून बी पावसाचा काळा ठिपकासुद्धा आभाळात दिसत नव्हता.  नुसतं भनाना वारं सुटायचं.  आमच्या शाळा सुरू झाल्यात्या.  शाळांच्या वर्गखोल्यांचे उकिरडे झालेले असायचे.  पयला आठवडा शाळांच्या जमीन करायच्या.  सार्‍यांनी श्रमदान करायचं.  खोलीतले खड्डे मुरमानं भरायचे.  मुरमाची वाहतूक पोरांनी रांगा लावून करायची.  मुलींनी गावभर हिंडून शेण गोळा करायचं, शेणाचा काला करायचा, शाळा सारवायची. अशी कामाची वाटणी असायची.  वर्गातली सारावल्याली जमीन वाळंस्तोवर शाळा पटांगणात, लिंबाच्या झाडाखाली भरायची.

दुपारच्या लघवीची सुट्टी झाली आसंल, ऊन मैंदाळ तावत व्हतं.  आमी निरगुडीतच व्हतो.  पावसाळ्याचं चार महिने आम्ही गावात असायचो.  माझी शाळा चार महिने बिनधोकपणे चालायची.  त्यानं खूप मजा यायची.  मी रमून जायचो.  पावसाळा संपला, की सारी कैकाडआळी पोट भरायला निरगुडीतनं बाहेर पडायची.  मंग कुणी कुठं जावे तं ठराचं, तर पावसाळा एका जागी काढायचा.  मी नुकताच शाळेत जात व्हतो.  मोठा झालो तरी पयलीतच बसत व्हतो.  मागच्या वर्षी दर दसर्‍याला शाळंत नाव घातलंतं.  ज्या गावात जाईन, तिथल्या शाळंत बसायचं.  काही शाळा चांगल्या असायच्या.  शिक्षक वर्गात बसू द्यायचे.  पण काही शिक्षक खडूस असायचे.  शिव्या देत.  'तुझ्या बापानं अशी दोन दिवसांत शाळा शिकली होती का ?'  मास्तर बापाला लय बोलायचा.  मास्तरच्या पाया पडून बा बेजार व्हायचा.  आली दया, तर बसू द्यायचा.  नाहीतर बा पाट्या वळायला शाळंच्या भिंतीला टिकून बसायचा आन् मी वरांड्यात बसून मास्तर जे शिकवतो ते बगत, ऐकत बसायचो.  खूप राग यायचा.  सत्तेपुढं शहाणपण चालत नाही, आसं बा म्हणायचा.  माझी शाळा आशी सुरू तर झालीती. आन् दोन पारचं देशपांडे मास्तर आम्हा सार्‍या पोरांला गप बसवत म्हणाले, 'सारे उठून उभे राहा.'  आम्ही रेटारेटी करत उभे राहिलो.  धुराळा, खकाना उडाला.  पोरं ठसकायला लागली.  कायबाय खोटं खोटं खोकायला बी लागली.  देशपांडे मास्तर म्हंजे धोतर, सदरा, काळ्याभोर झुपकेदार मिशा नि डोक्याला काळी कॅनव्हासची टोपी.  मोठ्यानं खाकरले तशी पोरं चिडीचीप उभी राहिली.  गुरुजींचा चेहरा फार रडवेला झालाता.  त्यांनी सांगितलं, 'डोक्यावरल्या टोप्या काढा, खाली ठेवा आन् गपचिप उभे राहा.  आज मातृहृदयी सानेगुरुजींची पुण्यतिथी.  दोन मिनिटं मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.'  आम्ही सारे शांतपणे उभे राहिलो.  मला काही कळून येत नव्हतं.  'खाली बसा' म्हणाले, बसलो.  सानेगुरुजींची आवडती प्रार्थना सुरु झाली- 'खरा तो एकची धर्म-जगाला प्रेम अर्पावे'.  देशपांडेगुरुजींचं छोटं भाषण झालं.  आणि भंडरेगुरुजींनी सांगितलं, 'आता शाळेला सुट्टी आहे.  उद्या मोठ्या पोरांनी लवकर यायचं आहे.  सकाळी आठ वाजता.  बोडक्याच्या वाडीला जायचं आहे.  बोडक्याच्या वाडीला शाळेच्या इमारतीचं उद्‍घाटन आहे.  त्याला मुख्यमंत्री मा. ना. यशवंतरावजी चव्हाणसाहेब येणार आहेत.'

माझ्या डोसक्यात फार बसलं नाही, पण सुट्टी मिळाली याचाच आनंद जास्त व्हता.  मोठी पोरं गाण्यांचा कार्यक्रम करणार व्हती.  जगतापगुरुजींनी गाणी बसवली व्हती.  मोठा उत्साह व्हता पोरांच्यात.  राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच आमच्या परिसरात येणार व्हते.  लाल बावटावालेसुद्धा आनंदून गेले व्हते. पण तसं दाखवीत नव्हते.  तालुक्यातल्या झाडून सार्‍या शाळांतली मोठी पोरं-पोरी, मास्तर, गावातले पुढारी, सारे खादीचे कपडे घालून खादीच्या टोप्या घालून दुसर्‍या दिवशी निगाले.  मला खूप रडायला यायला लागलं.  मी बाच्या मागं लागलो, मला यायचंय.  बाला माझं वझं नको होतं.  गावातली सारी पोरं निगाली व्हती.  मला कुणी नेत नव्हतं.  'लहान हायेस, चेंगारशील, पळताबी यायचं नाही.  मोठं झाल्यावर निहीन.'  'मला यशवंतरावास्नी बगायचं हाय' मी रडत मागं लागलो.