यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३६-२६१०२०१२-३

डॉ. आंबेडकरांनी त्या समाजात नवी जागृती निर्माण केली होती.  अनेक बुद्धिमान, विचार करणार्‍या कर्तृत्ववान तरुणांचा एक वर्ग त्यांनी या समाजात निर्माण केला.  एवढ्या मोठ्या संख्येने हा समाज आपल्यासोबत वावरला आणि ज्याला अस्पृश्य म्हणून बाजूला फेकले त्या समाजाचा स्वाभिमान आज जागृत झाला आहे.  या समाजातील या होतकरू तरुणास जवळ केले पाहिजे, आपलेसे केले पाहिजे.  आम्हाला कोणाची सहानुभूती नको आहे.  आमचा जो हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो आम्ही तो मिळवणारच.  या जिद्दीने काम करण्याची कुवत त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे.  तिचे आम्ही स्वागत केले पाहिजे.  आपले जुने राग, द्वेष दूर केले पाहिजेत.  आपल्या वागणुकीने त्यांच्यात भागिदारीची जाणीव निर्माण केली पाहिजे.  डॉ. आंबेडकरांच्या हयातीमध्ये महार वतनांचा प्रश्न अधिक उदारपणे, अधिक समजूतदारपणे आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो असतो तर त्यांच्या अनुयायांमध्ये आणि आमच्यामध्ये आज जो एक प्रकारचा मानसिक तुटकपणा निर्माण झाला आहे तो कदाचित निर्माण झाला नसता.  यापुढे जाणत्या बुद्धीने, भागिदारीच्या भावनेने महाराष्ट्रातील आपण आपल्या या लोकांचा प्रश्न सोडवला पाहिजे.  म्हणून मी वतनाचे बिल आणले.  ते पास केले.  बाबासाहेबांचे स्वप्न मला या निमित्ताने पुरे करता आले.  तसे तुमचाही प्रश्न मी सोडवू शकलो असतो पण कसे माहीत नाही पण राहून गेले.  थाडे कमिशन नेमून नेहरूंनी मला यांच्या तारा तोडताना दिलेला शब्द पाळायचा होता.  नेहरू म्हणाले होते.  अस्पृश्य आदिवासींच्या सवलती तर यांना द्याच पण एवढ्याने भागणार नाही.  यांच्या पुनर्वसनाचा स्वतंत्र प्लॅन तयार करा.  मी थाडे कमिशन यासाठी नेमले होते.  पण मी महाराष्ट्रातून दिल्लीला गेलो आणि हा साराच प्रश्न नीट हाताळला गेला नाही.  हे अस्पृश्य आदिवासी आहेतच, कित्येक वर्षे या सवलती यांना मिळतातच या समजात मी स्वतः होतो हे मला कबूल केले पाहिजे.  लक्ष्मण, आता हा प्रश्न सोडवल्याशिवाय थांबायचे नाही.  

सुप्रिया, माणसे किती मोठी असतात हे मी चव्हाणसाहेबांच्या रूपात पाहत होतो.  तुझे बाबा या प्रश्नात लक्ष घालतात पण ते नेटाने पुढे का रेटत नाहीत ते मला माहिती नाही.  चव्हाणसाहेब त्यांच्याशीही या प्रश्नावर बोलले होते.  म्हणून साहेब गेल्यापासून आम्ही तुझ्या बाबांबरोबर आहोत.  सोडवला तर तेच हा प्रश्न सोडवतील ही माझी श्रद्धा आहे.  इतरांना हा प्रश्न समजेलच असे नाही.  आणि आजचे राजकारण पाहता ही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय सुखाने सुटेल असेही वाटत नाही.  लोकशाहीत दुबळ्यांचे संरक्षण कायदा करतो तो कायदा हातात घेतला जाणार नाही आणि पिंजर्‍यातून सोडलेला पोपट जसे फार लांब उडून जात नाही, तो सोडला तरी पुन्हा पुन्हा पिंजर्‍यावर येऊन बसतो, याउपर तुला काय सांगू ?  तुझ्याही मतदारसंघात पाचपन्नास हजार मते या समाजाची सहजपणे आहेत.  पुन्हा लोकांनी चोर्‍यामार्‍या खुनखराबा करीत हिंडावे की त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायचे हे तुम्ही राज्यकर्त्यांनी ठरवायचे आहे.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका