यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३६-२६१०२०१२-२

मला वाटले आता काम सोपे झाले.  महाराष्ट्राचा कारभार मी हाती घेतला.  आणि आमचे मराठीतले एक मोठे विचारवंत अगदी माझे जवळचे मित्र माडखोलकर यांनी असा प्रश्न निर्माण केला होता की, 'महाराष्ट्राच्या निमित्ताने निर्माण होणारे राज्य हे मराठी राज्य आहे की मराठा राज्य आहे ?' मी त्यावेळी त्यांना सांगितले होते.  आपल्याला काय करायला पाहिजेल आहे हेही मांडले होते.  आणि आजही मी त्याला बांधील आहे.  हे मराठा राज्य मुळीच होणार नाही.  जोपर्यंत माझ्या हातात सत्तेची सूत्रे असतील तोपर्यंत निदान मी हे राज्य एका जातीचे-मराठ्यांचे किंवा आणखी एखाद्या जातीचे-होऊ देणार नाही.  ते तसे होत आहे असे वाटले तर महाराष्ट्राच्या कल्याणाकरिता, मराठा जातीत जन्माला आलो आहे यातून मला कदाचित एका बाजूला हटावे लागले तरी मी हटण्याचा प्रयत्‍न करीन.  पण ही गोष्ट मी होऊ देणार नाही.  आणि म्हणून साहित्यिकांना नि विचारवंताना मी विचारू इच्छितो की कशासाठी हा वाद आपण पुन्हा उभा करीत आहोत ?  ते संशय, त्या शंका, आणि त्या आशंका यामुळे मी खूप अस्वस्थ आहे.  माझे मन भरून येते आहे.  पुष्कळ वेळा मला बोलणे अवघड होते.  मी पुष्कळ वेळा सांगत आलो आहे, की मराठा हा शब्द जातीवाचक नाही.  आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्राला 'मराठा' हे नाव दिले ते काय तो शब्द जातीवाचक आहे म्हणून दिले ?  मराठा शब्दामागे महाराष्ट्राच्या एकजिनसी जीवनाची भावना आहे.  मराठा शब्दाचा हाच अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे आणि म्हणून मराठी राज्य हे कोणा एका जातीजमातीचे मुळीच होता कामा नये.  या गोष्टीवर माझा विश्वास आहे.  पण आपण म्हणता तसा हा जातीयवादी विचार सर्व समाजात आहे.  मी असे म्हणत नाही की मराठा समाजात जातीयवाद नाही.  ब्राह्मण समाजात नाही.  माळी समाजात नाही.  सगळ्याच समाजांत तो आहे, नाही कुठे ?  परंतु आम्ही विचारपूर्वक २५-२५ वर्षे ३०-३० वर्षे राष्ट्रवादी भावनेला वाहून घेतलेली माणसे आहोत.  जसे मराठ्यांबद्दल इतरांनी बोलता कामा नये, तसे मराठ्यांनीही इतरांबद्दल बोलता कामा नये असे माझे मत आहे.  तीस-पस्तीस वर्षापूर्वी मी ही मते मांडली.  त्यांच्याशी चिकटून राहिलो.  मी कधीही माझे मन जातींच्या जंजाळात अडकू दिले नाही.

ते पण साहेब, आज काय दिसते ?  गांधी निवडणुकीसाठी कोठून उभे राहिले असते ?  बाबासाहेबांनी देशाला घटना दिली.  ज्या महापुरुषाने घटना लिहिली त्यालाच पराभूत व्हावे लागले.  ज्या नेहरूंना आपण आदर्श मानून आयुष्य घालवले.  ते नेहरू कोठून उभे राहिले असते ?  ते ज्या काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले त्या जातीची लोकसंख्या किती ?  त्यांचे डिपॉझित तरी राहिले असते का ?  मी अनेक ग्रंथ लिहिले.  म्हणून मला कुणी ब्राह्मण म्हणेल काय ?  निवडणुकांचा विचार तरी आम्ही भटकेविमुक्त करू शकतो काय ?  आम्हाला लोकशाहीच्या परिघाबाहेर ठेवून घटनेची तरफदारी करण्यात काय अर्थ आहे ?  मी पार्लमेंटवर बॉम्ब टाकला पाहिजे असे म्हणालो याचे आपणास दुःख झाले.  पण साहेब, आमचा जन्मच दुःखात आहे, त्याचे काय ?

लक्ष्मण, मी तुमच्या सर्व भावनांशी सहमत आहे.  पण कसे झालेय सांगू ?  स्वातंत्र्य मिळाले या आनंदातच आमची पाच-दहा वर्षे गेली.  लग्नाच्या गडबडीत असलेल्या वर्‍हाडी मंडळींना जसे परसदाराच्या विहिरीत लहान मूल पडून मरून जावे आणि याची खबरही वर्‍हाडी मंडळींना नसावी असे आमचे झाले.  स्वातंत्र्याच्या जल्लोषात मागे पडलेले वर्ग लक्षातच नाही आले.  माझ्यापुरते म्हणाल तर मी सांगतो, पण त्यासाठीची अपराधीपणाची भावना मी मुळीच नाकारीत नाही.  आमचा नाकर्तेपणाही मी नाकारीत नाही.  तुम्ही तरुण आहात.  मी दिल्लीला गेलो ते मारुतराव कन्नमवार या बंधूच्या हाती मुख्यमंत्री पदाची सूत्रे देऊन.  ते अल्पकाळ राहिले हे खरे.  त्यांचे अकाली निधन झाले.  ते ज्या भटक्या बेलदार समाजातले होते त्यांना कसे मुख्यमंत्री करता आले असते ?  पण मी कर्तेपणाने ते केले.  त्यानंतर लमाण समाजातल्या वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री केले.  तेही तुमच्या समाजातले.  तब्बल बारा-तेरा वर्षे ते मुख्यमंत्री होते.  तरीही तुमचा प्रश्न रखडला ही गोष्ट मला मान्य करायलाच पाहिजेल.  प्रश्न माझा आणि तुमचा नाही.  जी मानसिकता आहे ती मला महत्त्वाची वाटते.  तुमच्या मनातली कटूता मी समजू शकतो.  तुम्ही जे गांधी-नेहरूंबद्दल सांगितले ते खरेच आहे.  आज उच्च वर्णीय समाजाची मानसिकताही तुमच्यासारखीच आहे.  बुद्धीची, ज्ञानाची सेवा करण्याचे काम ज्या समाजांनी आजपर्यंत केले, देशाच्या अलिकडच्या इतिहासातही ज्यांनी वैचारिक नेतृत्व केले त्यांच्याही मनात तुम्ही म्हणता तशीच मानसिकता आहे.  गेली २५-३० वर्षे निवडणुकांचे राजकारण तपासून पाहिले तर जातींच्या संख्याबळावर काही माणसे पुढे जात असतात.  आपल्या गुणांची उपेक्षा आणि अवहेलना होते आहे अशी भावना वाढताना दिसते आहे.  आपल्या जातींच्या कारणासाठी आज आपण मागच्या बाकावर बसण्याची तयार केली पाहिजे का ?  तुमचे तर आभाळच फाटलेले आहे.  ही मने कशी सांधावीत हेच कळत नाही.  जेव्हा हातात ताकद होती तेव्हा तुम्ही नव्हता.  आज तुम्ही आहात प्रश्न सांगता आहात, आकांत करीत आहात आणि माझ्या हातात काही नाही.  हा सल लक्ष्मण, काळजाला झालेल्या कुरूपासारखी मनाला टोचणी लावते आहे.  म्हणून तर यापुढचे आयुष्य तुमच्या कामात घालवण्याचा निर्णय मी केला आहे.  असाच निकडीचा प्रश्न त्याकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचा होता.  बाबासाहेबांनी धर्मातर केले होते.  त्याची मोठी कटूता सवर्ण म्हणून जगणार्‍यांच्या मनात होती.  तोही प्रश्न असाच लटकला असता कारण सत्तेत इतरांना सामावून घेण्याची तयारीच उच्चवर्णीय म्हणवणार्‍या समाजाची नव्हती.  बाबासाहेब तर गेलेच होते.  पण माझ्या हातात हुकूमाची पाने होती.  सर्वांच्या पाठबळाने मला हिंमत आली.  ज्याचे होते त्याला द्यायलाच हवे होते.  मी काही माझ्या पदरचे देणार नव्हतो.  प्रसंगी सत्ता गेली तर गेली असा मनाने कौल दिला आणि मी माझ्या मनाचा कौल महत्त्वाचा मानला.