मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४१

४१.  व्यवहाराला चोख – चांदमल कटारिया

साहेबांच्या संबंधितांपैकी एक लग्नसमारंभ होता. लग्न लागण्याची वेळ जवळ येत होती. इतक्यात वेणूतार्इंनी मला हाक मारली आणि म्हणाल्या, ‘‘चांदमलशेठ, मुलीच्या अंगावर दागिने दिसत नाहीत. कुठून तरी घेऊन या.’’ वेळ साधण्याच्या दृष्टीने त्यांनी लाल दिव्यांची गाडी दिली. मी घाईघाईने दत्तात्रेय अष्टेकर सराफांकडे गेलो. तिथे तयार असणारे काही दागिने घेतले आणि लग्नमंडपात आलो. नवरी मुलगी लग्नाला उभी राहिली त्या वेळी तिच्या अंगाखांद्यावर दागिने होते.

हा प्रकार साहेबांच्या कानावर जाताच त्यांनी मला बाजूला बोलावून घेतले आणि म्हणाले, ‘‘आजचा काय व्यवहार आहे तो पूर्ण झाला पाहिजे. सर्व हिशेब चुकते झाले पाहिजेत.’’ ते व्यवहाराला अतिशय चोख होते. त्यांनी त्याच दिवशी हिशेब पूर्ण केले.

तीस वर्षांची आमची ओळख होती. पण मी कधीही कसलीही मागणी त्यांच्याकडे केली नव्हती. त्यांचा माझ्यावर उदंड विश्वास होता. पण कितीही जवळीक असली तरी त्यांना सार्वजनिक दृष्टीचे सतत भान असे. कुणाचीही त्यांना गळ पडत नसे. सेवासदन संस्थेच्या समारंभासाठी पंडित नेहरूंना आणावे म्हणून मी मालोजीराजे निंबाळकरांबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. ‘‘मी थाळीभर रूपये देणगी देऊ इच्छितो. नेहरूंच्या हस्ते संस्थेला देणगी द्यावी.’’ असे मी सुचविले. पण साहेबांनी ऐकले नाही. ते म्हणाले, ‘‘लाखो रूपये देणग्या देणारे देखील असे म्हणत नाहीत. तुमची अपेक्षा बरोबर नाही. असा प्रकार होणार नाही.’’ त्यांचा माझा खटका उडाला पण आग्रहाला ते बळी पडले नाहीत.