शब्दाचे सामर्थ्य १८१

अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण लो. टिळक व म. गांधींनी काँग्रेसला आणि कार्यकर्त्यांना दिली, याचे कारण अन्याय हा गरिबांविरुद्ध, मागासलेल्यांच्या विरुद्धच होत असतो, हे त्यांनी देशात आणि परदेशांतही पाहिले होते, अनुभवले होते. म्हणूनच ते लहानमोठ्या अन्यायांविरुद्ध सातत्याने उभे राहिले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या शिकवणुकीची कसोशीने पाळणूक केली पाहिजे. समाजाला एकजिनसी बनवावयाचे, तर कार्यकर्त्यांनी व्रत म्हणून हे स्वीकारणे अत्यावश्यक आहे. आपल्या गावापासूनच कार्यकर्त्यांनी याचा प्रारंभ करावा. गावातले कोणते घर, कोणते कुटुंब दारिद्र्याच्या पेचात सापडले आहे, कोणत्या घरातले हात मिळवते नाहीत, याची माहिती, त्या गावातल्या कायकर्त्यांना असलीच पाहिजे. तरच गावात नव्याने उदयास येणा-या संस्थेत कोणाला आग्रक्रमाने सामावून घ्यावयाचे, याचा आग्रह ते धरू शकतील.

सामाजिक, आर्थिक संधी ज्या उपलब्ध होत आहेत, त्यांचे रक्षण करणे, त्या वाढविणे, गरीब शेतक-यांना, शेतमुजरांना, हरिजनांना रोजगार मिळवून देणे, जाती-पोटजातीची प्रतिबिंबे कामात पडू न देणे, 'एक गाव, एक पाणवठा' यासारखे प्रतीकात्मक कार्यक्रम प्रामाणिकपणे राबविणे, गावागावांतून त्याची कसोटी लागते, की नाही, हे पाहणे, आणि जेणेकरून समाज एकजिनसी बनेल, आर्थिक विषमता दूर होईल, हाच स्वतंत्र भारतासमोरचा प्रमुख कार्यक्रम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर गेल्या तीस वर्षांत काँग्रेसने याच कार्यक्रमाचा पाठपुरावा केला. देशात निर्माण झालेल्या नव्या परिस्थितीत तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा एक नवा कार्यक्रम म्हणून जिद्दीने, आत्मविश्वासाने, कसोशीने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावयाची आहे. गावागावांत ज्यांच्या शब्दाला वजन आहे, प्रतिष्ठा आहे, असा कार्यक्रम राबविण्याची ज्यांच्याजवळ साधनांची अनुकूलता आहे, किमानपक्षी हा कार्यक्रम राबविण्याची ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांनी हे काम अग्रक्रमाने हाती घेणे उचित ठरेल. काँग्रेससाठी कार्यक्रम काय, अशी विचारणा करणा-यांना माझे हे आवाहन आहे.

काँग्रेससमोर, देशांतर्गत नव्या परिस्थितीने उभे केलेले आणखी एक महत्त्वाचे कार्य आहे, ते विशिष्ट विचाराने बांधलेल्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे होय. एका विचाराने बांधलेले कार्यकर्ते असल्याशिवाय पक्ष बनत नाही, हे खरे, परंतु राजकीय पक्ष हा जेव्हा जन-आंदोलनाच्या स्वरूपाचा, लोकांचा पक्ष बनतो (मास पार्टी), त्या वेळी एकाच विचाराने बांधलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून त्याचे स्वरूप मर्यादित करणे अवघड ठरते, तसे ते आवश्यकही नसते. कारण सर्वच कार्यकर्ते समान अनुभवाचे राहतील, याची शाश्वती नसते.

'मास-पार्टी' आंदोलनाच्या रूपाने काम करीत असते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या रूपाने कार्य करीत राहिला. सर्व समाजाचे प्रश्न हाती घेऊन या पक्षाला काम करावयाचे असल्याने, काँग्रेस पक्ष हा बांधीव पक्ष बनू शकला नाही. पक्षाचे व्यापक स्वरूप हे त्याचे एक कारण आहे. कम्युनिस्टांप्रमाणे किंवा रा. स्व. संघासारखी या पक्षाला आपली बांधणी करणेही परवडले नाही. आवश्यक वाटले नाही.