शब्दाचे सामर्थ्य १५७

विचार

५४

संयुक्त महाराष्ट्राचे साध्य

‘संयुक्त महाराष्ट्र हे मी साध्य कधीच मानले नाही, ते एक साधन आहे,' असे माझे मत आहे. मराठी मने एकसंध करणे हे पहिले साध्य आहे, असे मी मानले आहे. विदर्भाच्या प्रश्नावरून ही गोष्ट ध्यानात येईल. विदर्भाची मागणी आपण तपासून पाहिली, तरी तिच्यामागे दोन प्रवृत्ती दिसतात. एकतर विदर्भातील मराठी मनास अजून इकडच्यांप्रमाणे जाग आलेली नाही; केवळ अशा अर्थानेच, की इकडे मराठी माणसांचे मन ज्या घटनांनी, ज्या प्रतीकांनी उचंबळून आले, तसे ते तितक्या प्रमाणात तिकडे आले नाही. एकजुटीचे जे Emotional Appeal इकडे दिसले, ते तिकडे तितक्या प्रमाणात दिसत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्‍न करावे लागतील. दुसरी गोष्ट, आपल्याबद्दल तिकडे संशय आहे. त्यांना असे वाटते की, ही मंडळी आपल्यावर डॉमिनेट करतील किंवा आपल्याकडे दुर्लक्ष करतील. भौगोलिक दृष्ट्या एकत्र आले, म्हणजे मनातला हा संशय दूर होईल, असे मुळीच नाही. त्यासाठी खटपट केली पाहिजे. या प्रश्नाला शासनयंत्रणेच्या दृष्टीनेही एक बाजू आहे. आमचे अधिकारी तेथे राज्य किंवा वरचढपणा गाजवण्याच्या भूमिकेत जातात. त्यांनी मिशनरी वृत्तीने गेले पाहिजे, नाही तर मित्रांपेक्षा शत्रूच उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत. यातही आणखी एक पथ्य पाळले पाहिजे. तिकडे कारभार करताना जसा अहंगंड असता कामा नये, त्याचप्रमाणे उपकाराची भावनाही (पॅट्रनेज) मनातून काढली पाहिजे. ही दोन टोके सोडून तेथील कारभार मध्यममार्गाने होणे आवश्यक आहे. हे मी नेहमी अधिका-यांना सांगतो. मला असा विश्वास वाटतो की, आपण विदर्भ-मराठवाड्याचे मन जिंकू व सगळा मराठी समाज एकसंध करू शकू. त्या भागातही असा विश्वास हळूहळू उत्पन्न होत आहे. तेथील अनेक मंडळी आता तसे बोलतात. पण मी किंवा आणखी काही थोडी माणसे यांच्या विश्वाससंपादनाने हे काम पुरे होणार नाही. माझ्याबद्दल चांगुलपणाची भावना वाटली, तरी Men Succeed but Missions Fails अशी स्थिती होणे हितावह नाही. आपले कार्य यशस्वी झाले पाहिजे.

मराठी मन एकसंध करावयाचे, तर जातिवादाचाही निरास केला पाहिजे. या बाबतीत केवळ ब्राह्मणब्राह्मणेतर प्रश्नच आहे, असे नाही. अस्पृश्यतेचा, नवबौद्धांचा प्रश्न घ्या. या बाबतीत नव्या मराठी राज्याने खटपट केली पाहिजे. दलित समाजाच्या बाबतीतील उपेक्षा आपण सोडली पाहिजे. महारवतनाचा कायदा आपण अगदी अलीकडे केला. ते वतन नष्ट करण्यासंबंधीची मागणी न्याय्य होती.

कूळकायदा, जमीनविषयक कायदे, इत्यादी कायदे आपण करीत आलो, तेव्हाच प्रथम दहा वर्षांपूर्वी महारवतनाचा कायदा केला असता, तर त्या समाजात विश्वास निर्माण झाला असता, असे मला आज वाटते. ही चूक आपण दुरुस्त करू या. 'गेले ना नवबौद्ध आपल्यांतून, जाऊ द्यात', असली उपेक्षाबुद्धी एकसंध समाजनिर्मितीच्या आड आल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना त्यांच्या प्रश्नाला योग्य तो अग्रक्रम द्यावयास हवा. समाजातील विविध गटांतील लोकांचे प्रश्न वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून समजावून घेऊन सोडविण्याचे व्रत नव्या राज्याने घेतले पाहिजे. सामाजिक उदारता अंगी बाणल्याशिवाय हे व्रत पार पडणार नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. पूजा गुणाची, जातीची नाही, असे मी म्हणतो, ते याचकरिता. बहुजनसमाज म्हणजे काय, याविषयीची आपली भावनाही व्यापक बनवून, त्यात सर्व कष्ट करणारांचा समावेश व्हावयास हवा.