साहेब यशवंतरावजी चव्हाण-१३

नाटकाच्या शेवटच्या प्रवेशाला संभाजीच दिसतो हा-
कोणत्याही क्षणी तो ते स्वगत म्हणू शकेल:
“….मरणाचा कुणाला अनुभव नाही म्हणून:
पण, माझी ही अवस्था म्हणजेच मरण असेल का?
काही दिसत नाही, काही भासत नाही,
विखारलेलं मस्तक सुन्न झाल्यामुळें काही सुचत नाही,
आठवत नाही, कळत नाही-
जीव जड झाला आहे आणि
शरीर हलंक वारे मोल झालं आहे;
अरेरे, काय झालं हे?... मराठयांचा राजा,
मो-यांची कैदी झाला- वाघाची गरीब गाय झाली!
मर्दाचा मातीमोल मुडदा झाला- होत्याचं नव्हतं झालं,
आता काय व्हायचं राह्यलंय?”

येरवडा जेलचा दरवाजा-
छे:! दरवाजा नव्हताच तो;
वाघाचा जबडा वाटला, वाघाचा जबडा-
माझ्या कोवळया मनाला!!

काटेरी कुंपणाचं हे भलमोठठं वर्तुळ, तंबूच्या बराकी...
सत्याग्रहींनी ओळीनं जाऊन जेवणाची थाळी, पाण्याचं भांडं
बिस्तरा काखोटीला मारला-
आणि आमची ‘रपेट’ आत निघाली!
(थोडा वेळ जागच्या जागीच ‘वन टू’ ची ड्रिल करणे)
येरवडयाला आचार्य भागवत होते,
रावसाहेब पटवर्धन होते...
आम्हाला सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावलेल्या,
पण, (सौम्य हसून)
इतक्या जणांना देता येईल,
एवढं कठीण काम तिथं होतंच कुठं?
“दगड गोळा करा!” “करतो-“
“रस्ता बांधा!”  “बांधतो!”
(हसून) तो कधीच पुरा झाला नाही!!
“कापडी पट्टे विणा-“ “विणा तर विणा!”
बाकी सगळा दिवस मोकळा- (गंभीर होत)
आचार्य भागवत मला म्हणाले,
“मिळतील ती पुस्तकं वाचून काढ-“
ह. रा. महाराजींनी ‘शाकुंतल’ वाचनाचा वर्ग सुरू केला...
आचार्यांनी शेक्सपियरचं “ज्युलियस सीझर’’ शिकवलं-
(ऍक्शन) “ब्रुटस् यू टू? देन फॉल् सीझर!”
(खुर्चीत कोसळतात)
(संथपणे, मान वर करून)
ज्यांच्यावर भरोसा ठेवला,
तीच माणसं नंतर माझ्यावर उमटली,
हा अनुभव मी पुढं उत्तर आयुष्यात घेतला
तेव्हा त्या अवघ्या सहा शब्दात केवढं प्रचंड नाटय भरलेलं आहे, ते जाणवलं;
आणि शेक्सपियर ४०० हून अधिक वर्षं का टिकला, तेही कळलं!
(रंगमंच पूर्ण उजळतो)