भूमिका-१ (115)

२१. परराष्ट्रिय धोरणाची दिशा

'गतिमान'(१९७५) दिवाळी अंकातील
मुलाखतीच्या आधारे.

गेल्या वर्षात जागतिक स्तरावर परिणाम करणा-या दोन अतिशय महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली व्हिएटनाम युद्धाची समाप्ती आणि दुसरी हेलेसिंकीत भरलेली युरोपीय समझोता परिषद. आंतरराष्ट्रिय क्षेत्रात या वर्षात घडलेल्या या दोन अतिशय महत्त्वाच्या घटना आहेत. व्हिएटनामी जनतेने प्रदीर्घकाळ चाललेल्या युद्धात जो विजय मिळविला आहे, त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, की शस्त्रास्त्राच्या दृष्टीने सामर्थ्य असणारी कोणतीही मोठी शक्ती राष्ट्रवादावर आधारलेल्या जनसामर्थ्याविरुद्ध कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. जनशक्तीचा व पुरोगामी राष्ट्रवादाचा हा विजय आहे.

दुस-या महायुद्धानंतर पहिल्या प्रथमच इंडोचायनामध्ये शांतता व स्थिरता स्थापित होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शांतता हा विचारच मूलत: एकजिनसी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात शांततेच्या दिशेने पडलेली पावले जागतिक शांततेला अंतत: शक्ती देणारीच गोष्ट ठरत असते. व्हिएटनामच्या विजयाचे या दृष्टीने महत्त्व आहे, असे मला वाटते.

हेलेसिंकी इथे झालेली परिषद व तिथे झालेले करार-मदार ही युरोपच्या इतिहासातील एक महत्त्वाची आणि भविष्याला कलाटणी देऊ शकणारी आशादायी घटना आहे. युरोपात शांतता व सामंजस्य प्रस्थापित होण्याच्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे मला वाटते. अर्थात या करारामुळे युरोपमध्ये असलेल्या लष्करी गटांच्या या अस्तित्वावर परिणाम झालेला नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यांतील संघर्ष संपला, असेही म्हणता येणार नाही. परंतु त्यांच्यांत सहकार्य निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे, असे मला वाटते. म्हणूनच जागतिक शांतता प्रस्थापनेच्या दृष्टीने या दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत, यात शंकाच नाही.

युरोपमध्ये शांतता परिषदेच्या यशस्वी वाटाघाटीनंतर कदाचित सोवियत रशिया या प्रश्नांना चालना देण्याची व त्याच्या पाठीमागच्या तत्त्वाची मांडणी करण्याची शक्यता आहे. परंतु आशियाई सुरक्षा कराराच्या कल्पनेची अजूनही सुनिश्चितपणाने व तपशिलवार मांडणी झालेली नाही. सोवियत नेते व तज्ज्ञ यांनी या बाबतीत एक गोष्ट केली आहे, की ही योजना कोणाही राष्ट्राच्या विरुद्ध मांडलेला असा लष्करी करार किंवा योजना नाही.

या पार्श्वभूमीवर सोवियत रशिया व चीन यांचे संबंध या कारणामुळे बिघडावेत, असे समजायला सबळ कारणे दिसत नाही. सोवियत रशियाची व भारताची मैत्री अनेक संकटप्रसंगी तावून सुलाखून निघालेली आहे व ती दोन्ही राष्ट्रांच्या परस्पर हिताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तरीसुद्धा ही मैत्री भारताचे चीनशी संबंध सुधारण्याच्या आड यावी, याचे मला तरी कारण दिसत नाही. आमची ही भूमिका आम्ही अनेक वेळा स्पष्ट केली आहे. दुर्दैवाने आमची ही विचारसरणी चीनने अजूनही स्वीकारलेली नाही किंवा समजावून घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही.