कथारुप यशवंतराव-प्रश्न महाराष्ट्राच्या भावनेचा आहे !

प्रश्न महाराष्ट्राच्या भावनेचा आहे  !

इतर राजकीय नेत्यांमध्ये सहसा न आढळणारा एक मोठा सदगुण यशवंतरावांकडे होता. तो म्हणजे सामाजिक हितासाठी व्यक्तिगत अहंकार बाजूला सारण्याची क्षमता. अनेकदा विरोधकांच्या गोटात त्यांच्या पुढा-यांकडे स्वत:च अनाहूतपणे जाऊन त्यांनी सामाजिक स्वास्थ टिकविण्याचा प्रयत्न केला. अशीच ही एक घटना.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईतील गोळीबारात जे १०६ क्रांतिकारक शहीद झाले त्यांचे एक स्मारक फ्लोरा फाऊंटन ( हुतात्मा चौक ) या ठिकाणी समितीच्या नेत्यांनी उभारले. या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यासाठी यशवंतरावांनी यावे अशी समितीच्या नेत्यांची मनापासून इच्छा नव्हती, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ( औपचारिक का होईना ) निमंत्रण देणे गरजेचे होते. मग त्यांनी एक शक्कल लढविली. यशवंतरावांना निमंत्रण पत्रिका मुद्दामच उशिरा पोचविण्यात आली. त्यांना उपस्थित रहायला अवधी मिळू नये असाच हेतू यामागे होता. निमंत्रण पत्रिका मिळाल्यावर यशवंतराव अस्वस्थ झाले. आपण कार्यक्रमाला जावे की जाऊ नये असा प्रश्न क्षणभर त्यांना पडला. दुस-याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि थोड्याच वेळात ते समारंभस्थळी दाखल झाले. त्यांना अनपेक्षितरित्या आलेले पाहून सारेच चपापले. विरोधकांचा अंदाज चुकला. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या वीरांना अभिवादन करण्याची संधी यशवंतरावांनी चुकविली नाही. काही लोक म्हणाले, ' यशवंतरावांनी मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा कमी केली.'

साहेब म्हणाले, ' मुख्यमंत्रीपदाची काहीएक प्रतिष्ठा आहेच. पण मराठी माणूस ही आमरण मिळालेली पदवी आहे आणि मराठी माणसांचा प्रतिनिधी म्हणूनच मी या सोहळ्यास उपस्थित राहिलो. कारण प्रश्न महाराष्ट्राच्या भावनेचा आहे.'