माझ्या राजकीय आठवणी २३

याप्रमाणें आम्हीही खेडयापाडयांतूनहि प्रचारकार्य करीत होतो. महात्मा गांधींचा मोर्चा सुरू झाला. त्यावेळीं सातारला एक सत्याग्रही शिबीर सुरू झाले. सत्याग्रही मिळविण्याचे कार्य धर्मवीर बटाणे यांचे नेतृत्वाखाली आम्ही सुरू केले. या कार्याचे केंद्र अर्थातच आमचा व्यापारी छापखाना होता. प्रयत्नांनी आम्ही ४५० स्वयंसेवक सातारचे शिबीरास पाठविण्यात आले. त्यावेळी वैशाख महिना होता. आमच्या श्री शिवछत्रपती मंडळाच्या श्री शिवजयंती उत्सवाची तयारीहि जोरांत चालू होती. कार्यक्रमांत खेडयापाडयाच्या लोकांच्या आवडत्या नामांकित भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम ठेवण्यांत आला होता. तसेंच पोवाडे व व्याख्यानें वगैरे कार्यक्रमहि होते. जाहिर व्याख्यानाचा कार्यक्रम श्री. पन्नालाल लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाला. त्या सभेंत अचानकपणें ठरविले नसताहि स्वयंसेवक अश्विनीकुमार या नांवाच्या सत्याग्रहीनें बेकायदेशीर मीठ विकण्याचा कार्यक्रम सुरू केला. या सभेस पोलिस हजर होतेच. पोलिसांनी अश्विनीकुमारास ताबडतोब अटक केली. कराड तालुका काँग्रेसचा अध्यक्ष मीच होतो. त्याच सभेंत दुसरे दिवशी मिठाचा सत्याग्रह असल्याचे जाहिर करण्यात आले. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर रात्री नामवंत भजनी मंडळींचे भजनास प्रारंभ झाला. खेडयापाडयाचे हजारो लोक सदर कार्यक्रमासाठीं आले होते. त्यांनाहि धर्मवीर बटाणे यांनी दुस-या दिवशी श्रीकृष्णाबाईंच्या घाटावर मीठाचा सत्याग्रह होणार असल्याचे जाहिर केले.

आमचे मंडळांत मी मिठाचा सत्याग्रह करावयाचा असे ठरले. त्याप्रमाणें दुसरे दिवशीं श्रीकृष्णाबाईचे घाटावर मिठाच्या सत्याग्रहाची सभा भरली. सत्याग्रहांत भाग घेण्याबद्दल जनतेतून चढाओढ सुरू झाली. सत्त्याग्रही कुमार बळवंत दत्तात्रय निकम, कोल्हापूर याने बेकायदेशीर मीठाचे पुडीचा लिलाव पुकारला. चढाओढीत पहिली पुडी कराडचे नागरिक पण हल्ली सांगली मुक्कामी असलेले सुप्रसिद्ध व्यापारी श्री. शामजी राजपाल शहा यांनी घेतली. त्याचा हा सत्त्याग्रह आम्हाला अनपेक्षित व उत्स्फुर्त असाच वाटला. दुस-या पुडीचा लिलाव सत्याग्रही नंदलाल चतुर्मुज शहा, सांगली यांनी जाहिर केला, तो मी घेतला. सभेचा कार्यक्रम संपला. त्यावेळीं येथील पोलीस प्रमुख इन्स्पेक्टर नाईक व सब् इन्स्पेक्टर जाधव यांनी आम्हा चौघांना अटक केली व पोलीसांनी आणलेल्या मोटारीतून नेण्याचा प्रयत्न केला पण जनतेच्या इच्छेनुरुप सत्याग्रहीना मिरवणुकीने जेलकडे न्यावे लागले. दुसरे दिवशी खटला चालला. कोर्टाच्या कामात भाग घ्यावयाचा नसल्यानें ताबडतोब निकाल देण्यांत आला. चौघांना प्रत्येकी तीन महिने साधी कैद अशी शिक्षा झाली. फक्त श्री शामजी राजपाल शहा यांना या शिक्षेशिवाय ५० रुपये दंडाची शिक्षा झाली. आम्हा चौघांची शिक्षा पूर्ण झाल्यावर जेलमधून आमची सुटका झाली. कराडला आलो. चळवळ जनतेंत उत्साहपूर्वक चालली होती. त्यांत मीहि सामील झालो. सभा भरविणें प्रभातफे-या काढणे हा नित्याचा कार्यक्रम असे. या गुन्ह्याखाली माझेसह १०।१२ लोकावर निरनिराळे ५।६ खटले भरण्यात आले. त्यात मला आणखी ६ महिन्याची शिक्षा झाली. या शिक्षेची मुदत पूर्ण न होताच गांधी आयर्विन कराराप्रमाणें अपुरी भोगावी लागली.

काळी निशाणे व गव्हर्नरांचे स्वागत

कायदेभंगाची चळवळ देशांत जोराला लागली होती. महाराष्ट्रांत सातारा, नगर, पुणे, सोलापूर जिल्हे आघाडीवर होते. कराड तालुक्यांत अंबोली, मसूर, तांबवे, काले येथेंहि जंगलसत्त्याग्रह झाले. तुरुंग भरत चालले होते. या सुमारास जुलै महिन्यांत सातारा जिल्ह्यामध्यें मुंबईच्या गव्हर्नरांचा दौरा जाहिर झाला. कांहीं स्वार्थी व लाचार लोक स्वागताच्या तयारीची भाषा बोलू लागले. तसेंच रावसाहेब, रावबहादूर, खानसाहेब, सरसाहेब अशा सातारा जिल्ह्यांतील मंडळींनी स्वागताची तयारी केली कराड शहर काँग्रेसमार्फत गव्हर्नरांच्या आगमनप्रसंगी काळ्या निशाणानीं करण्याचे ठरविण्यांत आले. गव्हर्नराच्या आगमनाचे रस्ते व त्यावरील घराघरांची झडती पोलिसांनी घेऊन कडेकोट बंदोबस्त करण्यांत आला. तरुण विद्यार्थ्यांची प्रभावी संघटना झाली होती. काँग्रेस कमिटीचे नेते दे. भ. पांडुआण्णा शिराळकर, गणपतराव आळतेकर, बाबुराव गोखले, राघुआण्णा धोपाटे वगैरे मंडळी पोलिसांनी अडथळें निर्माण केले तरी रस्त्यांच्या दुतर्फा जनसमुहाला बरोबर घेऊन काळ्या निशाणासह उभे होते. गव्हर्नरला ता. १३ जुलै १९३० रोजीं कोयना पुलापासून कृष्णानदीवरील फरशीपर्यंत लोकांनी काळी निशाणे एवढया मोठ्या प्रमाणांत दाखविली कीं, नोकरशाहीला घामच फुटला.