थोरले साहेब - २१९

साहेब आणि इंदिराजींची दोन मिनिटांत चर्चा संपली.  इंदिराजींनी साहेबांकडं परराष्ट्रमंत्रीपद देण्याचं ठरविलं.  साहेब 'ठीक आहे' म्हणाले.  इतरांना कुठली खाती दिली याबद्दल दोघांत चर्चा झाली.  साहेब गंजूच्या लेकींना आणि जावयांना आशीर्वाद देऊन निवासस्थानी परतले.  

परराष्ट्र खात्याची सूत्रं साहेबांनी ११ ऑक्टोबर १९७४ रोजी स्वीकारली.  यावेळचा बदल सरळ झाला.  यापूर्वीचे बदल त्या खात्यात संघर्ष निर्माण झाल्यानं करण्यात आलेले.  संरक्षण, गृह, अर्थ या खात्यांचा कारभार प्रत्यक्ष पंतप्रधानांकडे असायचा.  नंतर तो साहेबांकडे देण्यात यायचा.  भारताचं परराष्ट्रधोरण नेहरूजींनी दूरदृष्टीनं आखलेलं.  अलिप्‍ततावाद भारतीय परराष्ट्रनीतीचा कणा.  नेहरूजींनी अलिप्‍ततावादाचा पुरस्कार केल्यानं जगातील अनेक राष्ट्रे या धोरणाकडे आकर्षित झाली.  साहेबांनी अलिप्‍तता धोरण मर्यादित देशाची शक्ती न राहता ती चळवळ बनावी,  परराष्ट्रीय धोरणाला बळकटी मिळावी यादृष्टीनं सातत्यानं प्रयत्‍न केला.  परराष्ट्रधोरण केवळ राजकीय मुत्सद्देगिरीपुरतं संबंधित नसून आर्थिक धोरणाला चालना देण्याकरिता घ्यावयाच्या निर्णयाचा सतत पाठपुरावा करण्याची जबाबदारी परराष्ट्र खात्याला निभवावी लागते.  

जागतिक शांतता हे भारताच्या परराष्ट्रनीतीचं मूलभूत तत्त्व आहे.  साहेबांनी अमेरिका-भारत, भारत-रशिया, भारत-पाकिस्तान, भारत-बांगलादेश, भारत-चीन व भारत-मध्यपूर्वेतील राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत व्हावे व दीर्घकाळ ते टिकून राहावेत यादृष्टीनं आपल्या कार्याची आखणी केली.  शेजारील राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याकरिता साहेबांनी मुत्सद्देगिरीनं पावलं टाकली.  साम्राज्यशाही व वसाहतवादी धोरणाविरुद्ध जो विचार असेल त्याला बळ पुरविणं हा भारतीय परराष्ट्रनीतीचा गाभा आहे.  या सर्व सूत्रांना पूरक असं वातावरण निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्‍न साहेबांनी केला.

नोव्हेंबर ७४ ला श्रीलंका व डिसेंबर ७४ ला बांगलादेशाला भेटी दिल्या.  एकमेकांबद्दल विश्वासाचे संबंध निर्माण करण्यात यश मिळविलं.  युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांच्याशी राजनैतिक चर्चा करण्याकरिता १९ जानेवारी १९७५ ला युगोस्लाव्हियाला पोहोचले.  टिटो हे पाश्चिमात्य देशांत प्रथम क्रमांकाचे राजनैतिक मुत्सद्दी म्हणून ओळखले जायचे.  साहेबांच्या राजकीय मुत्सद्देपणाची, राजकीय डावपेचांची, राजनीतीज्ञ म्हणून जगाला ओळख होऊ लागली.  परदेशात भारताची प्रतिमा उजळ करण्याच्या प्रयत्‍नात साहेब गुंतलेले; पण देशामधील राजकीय वातावरण अस्थिरतेच्या भोवर्‍यात सापडलेलं.

आणीबाणी लादण्यापूर्वी साहेब मे ७५ ला माँटेगोबे या जमेकामधील शहरात मुक्कामाला होते.  त्या ठिकाणाहून ४ मे रोजी त्यांनी पत्र लिहिलं.  एकंदरीत दिल्लीच्या राजकारणात त्यांच्या मनाची होणारी घुसमट त्यात व्यक्त केली.  साहेब आपल्या पत्रात लिहितात,