थोरले साहेब - १८८

परदेशी शस्त्रास्त्रांवर अवलंबून न राहता देश शस्त्रास्त्र निर्मितीच्या बाबतीत स्वयंभू झाला पाहिजे या विचारानं साहेबांचं मन पेटलं होतं.  लष्करी साहित्यनिर्मितीमध्ये जास्तीत जास्त संशोधन करून आधुनिक शस्त्रे लष्कराच्या हाती द्यायला पाहिजेत.  नेफामध्ये लढताना शत्रूसैन्याजवळ ऑटोमॅटिक रायफल्स होत्या.  आमचे वीर शिपाई शंभर वर्षांपूर्वीच्या '३०३ एन्फिल्ड' या रायफलीनं शत्रूसैन्याचा मुकाबला करीत होते.  सेमी ऑटोमॅटिक रायफल्स निर्मितीच्या बाजूचे कृष्ण मेनन होते; पण लष्कर आणि संशोधन खात्यातील वजनदार अधिकारी परदेशी निर्मित्याबरोबर सहकार्याच्या मताचे होते.  नेहरूजींनी लोकसभेला माहिती दिली.  आम्ही सेमी ऑटोमॅटिक बंदुकांचे उत्पन्न सुरू केले आहे.  लवकरच आम्ही ऑटोमॅटिक बंदुका लष्कराच्या हाती सोपवू.  साहेबांनी कलकत्ता येथील ऑटोमॅटिक रायफल्स बनविण्याच्या कामाचा आढावा घेतला असता त्यांच्या असे निदर्शनास आले की, अद्याप या निर्मितीला सुरुवातच झाली नाही.  ही निर्मिती बेल्जियममधील एफ. एन. या रायफल्स निर्मितीच्या बाजूनं असलेल्या प्रशासकीय अधिकारी व भारतीय रायफल्स बनविणार्‍या अधिकार्‍याच्या वादात अडकून पडलेली आहे.  नेहरूजींना चुकीची माहिती देऊन त्यांनी संसदेची दिशाभूल केली होती.  शस्त्रविषयक संशोधन व निर्मितीमधील काही अधिकारी अशा मताचे होते की, परदेशी रायफल्स बनावटीची हुबेहूब नक्कल आपण करीत आहोत.  कोर्टकचेर्‍याच्या फेर्‍यात ही रायफल अडकून पडेल.  या सर्व अधिकार्‍यांच्या मतांच्या विरोधात ठामपणे एक अधिकरी होते.  त्यांचं नाव होतं एस. जे. सहानी.

सहानी हे ऑर्डनन्स फॅक्टरीचे डायरेक्टर जनरल या हुद्द्यावर कार्यरत होते.  अत्यंत तल्लख बुद्धीचा अधिकारी.  त्यांचा आत्मविश्वास व चिकाटी वाखाणण्यासारखी होती.  त्यांनी साहेबांची भेट घेतली.  साहेबांनी शस्त्र संशोधन विभागातील व कॅबिनेट सेक्रेटरीमध्ये अभ्यासगटाचे उमदे अधिकारी सुभाष मुखर्जी आणि सहानींची भेट  घालून दिली.  सहानी, मुखर्जी यांनी श्रमपूर्वक एक अहवाल तयार केला.  कॅबिनेट सेक्रेटरी एस. एस. खेरा यांची मान्यता घेऊन साहेबांकडे पाठविला.  या अहवालावर साहेबांनी एफ. एन. गटाला विचारण्यासाठी सहानी व मुखर्जीच्या साहाय्यानं एक प्रश्नावली तयार केली.  संरक्षणमंत्री म्हणून साहेबांनी एफ. एन. धार्जिण्या अधिकार्‍यावर एकामागून एक प्रश्नांचा मारा केला.  एफ. एन. धार्जिणे अधिकारी निरुत्तर झाले.  कलकत्त्याच्या इशापूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सहानी यांच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यांच्या आत ऑटोमॅटिक रायफल्स निर्मितीला सुरुवात झाली.  साहेबांनी हा घेतलेला निर्णय लष्कराच्या सक्षमतेला हातभार लावणारा ठरला.  सहानींसारखे प्रामाणिक अधिकारी जोपर्यंत लष्करात आहेत तोपर्यंत भारत सुरक्षित राहील असं मत साहेबांनी व्यक्त केलं.

सप्टेंबर १९६३ उजाडला.  सप्टेंबर हा महिना साहेबांच्या बुद्धिकौशल्याची चुणूक दाखविणारा ठरला.  संपूर्ण भारताला नेफा पराभवानं ग्रासलं होतं.  त्या पराभवाची चिकित्सा लोकसभेत होणार, संसदेत विरोधक या अहवालावरून सत्ताधार्‍यांना धारेवर धरणार याची कल्पना साहेबांना होती.  या अहवालाबाबत नेहरूजींनी साहेबांना दिलेली कल्पना.  कौल यांना न्याय मिळाला पाहिजे अशी नेहरूजींची सुप्‍त इच्छा.  देशाच्या नेतृत्वावर पराभवाचे शिंतोडे येऊ नये याची घ्यावयाची काळजी या सर्वांच्या इच्छेच्या दबावाखाली व विरोधकांच्या मान्याला तोंड देण्याच्या इराद्याने साहेब लोकसभेकडे निघाले.  लोकसभेत सभासदांची इच्छा लक्षात घेता संरक्षणमंत्र्यांनी हे निवेदन न वाचता संसदेला सादर करावं.  नंतर चर्चा होईल, असा आदेश सभापतींनी दिला.  अहवालाविषयी सर्वांची कुतूहलता शिगेला पोहोचली.  १९ व २० सप्टेंबरला लोकसभा आणि राज्यसभेत या निवेदनावर चर्चा झाली.  साहेबांनी अहवालासंबंधी आपले विचार मनमोकळेपणाने संसदेसमोर मांडले.  आत्मविश्वासाने साहेब संसदेला सामोरे गेले.  

चर्चेनंतर खा. मणी चर्चेस सुरुवात करताना म्हणाले, ''मी संरक्षणमंत्र्यांचे आभार मानतो.''  त्यांचं भाषण तोलूनमापून होतं.  

सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करताना, ''साहेब सभागृहाचे खरे नेते आहेत.  त्यांनी सभागृहाला विश्वासात घेऊन प्रांजळ मनानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे ॠणी आहोत.''