थोरले साहेब - १८६

दुसरं पत्र साहेबांनां आलं ते विजयालक्ष्मी पंडित यांचं.  त्या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या.

त्या आपल्या हृदयस्पर्शी पत्रात म्हणतात, ''आपल्या प्रवासाच्या बातम्या वर्तमानपत्रातून वाचून आपण किती भटकंती करता याची चिंता वाटतेय.  आपल्या आजाराची बातमी वाचून मी अस्वस्थ झाले.  नेहरूजींच्या नंतर भटकंती करणारे आपण आहात.  त्यांना नियतीचं वरदान आहे.  आपण त्यांची बरोबरी करू शकत नाहीत.  आपण आज अत्यंत जिकरीचे काम करीत आहात.  आपली देशाला गरज आहे.  डॉक्टर देतील तो सल्ला अवश्य अमलात आणा. मी हे पत्र लिहिण्याचे कारण मी आपणास माझा धाकटा भाऊ मानते.  हे लिहिण्यास मला खंत वाटत नाही.''

नाशिकहून साहेब मुंबईला आले.  मीही दिल्लीहून मुंबईला पोहोचले.  आम्ही आईच्या सान्निध्यात आठ दिवस घालविले.  वर्तमानपत्रात अनेक अंदाज साहेबांच्या प्रकृतीबद्दल वर्तविले जाऊ लागले.  शेवटी डॉक्टरांनी आपला निष्कर्ष वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला.  केवळ अजीर्ण झाल्याने हा त्रास झाला.  हृदयाला कुठलाही धक्का नाही.  अनेकांनी डॉक्टरांचे आभार मानले तर काहींची निराशा झाली.

आपल्या कार्यकुशलतेनं साहेबांनी संपूर्ण संरक्षण मंत्रालय आपलंस करून टाकलं.  सनदी अधिकारी आणि लष्करी अधिकार्‍यांत समन्वय निर्माण केला.  संरक्षण मंत्रालयात विश्वासाचं वातावरण खेळू लागलं.  ब्रिटिश राजवटीत अंदाजपत्रातील खर्चाचं प्रमाण हे शेपूट ते दात असं होतं.  ते साहेबांनी बदलून दात ते शेपूट असं केलं.  आघाडीवरील सैनिकांत यामुळं आत्मविश्वास निर्माण झाला.  चीनच्या आक्रमणाबद्दल साहेबांनी माओच्या नेतृत्वाचा अभ्यास केला.  माओच्या युद्धनीतीचे तीन निष्कर्ष साहेबांनी काढले.  एक - सैन्याच्या हालचालीचा वेग विद्युतवेगाला मागे टाकणारा असावा व धक्का तंत्राचा वापर करावा.  दोन - युद्धातील सर्व सूत्रे आपल्याकडे राहावीत आणि त्याची कार्यवाही आपल्या मर्जीप्रमाणे करता आली पाहिजे.  तीन - अपुर्‍या तयारीविना हल्ला करू नये.  आपल्याला विजयाबद्दल शंका असल्यास तिथे युद्धात गुंतून पडू नये.  पुढील पाकिस्तानच्या युद्धात साहेबांनी दोन क्रमांकाच्या युद्धनीतीचा अवलंब केला. 

संरक्षण खात्याच्या मागण्यांमध्ये साहेबांनी एक कल्पना मांडली.  पर्वतीय क्षेत्राच्या संरक्षणाकरिता एक स्वतंत्र विभाग असावा.  या क्षेत्रातील सैनिकांना सक्षम असं शिक्षण द्यावं.  पर्वतीय क्षेत्रातील वातावरणाशी हे सैनिक समरस झाले पाहिजेत.  अद्ययावत युद्धसाहित्य निर्माण करून त्यांना सुसज्ज सैनिक केलं पाहिजे.  यासोबत वायुदलाचाही विस्तार केला पाहिजे.  परदेशाच्या युद्धसामुग्रीवर अवलंबून न राहता आपणच युद्धसाहित्य निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी.  या सर्व मागण्या साहेबांनी लोकसभेत मंजूर करून घेतल्या.  संरक्षण व परराष्ट्र धोरणाची सांगड घालून तातडीचे नियोजन आणि लांब पल्ल्याचे नियोजन याचा तपशील संसदेसमोर मांडला.  या विवेचनाचं लोकसभेनं तोंडभरून कौतुक केलं.  सेनादल व मंत्रालयातील कारभार गुप्‍ततेच्या नावाखाली संसदेत सादर करण्यात येत नव्हता.  साहेबांनी ती प्रथा मोडून संपूर्ण संरक्षण खात्याची माहिती संसदेसमोर ठेवली.  कुठल्या बाबतीत गुप्‍तता पाळायची ते संरक्षणमंत्री ठरवतील असं धोरण ठरविलं.  साहेबांच्या या धोरणाची संसदेनं प्रशंसा केली.  साहेबांनी संसदेचा विश्वास संपादन केला.