थोरले साहेब - १८२

साहेबांनी टी.टी.के.च्या लुडबुडीला आताच कुठं पायबंद घातला होता तरीपण संरक्षण साहित्यनिर्मितीच्या कामात जरा कुठे ढिलाई झाली की लगेच आकाश कोसळल्याच्या आविर्भावात नेहरूजींकडं ते कागाळी करीत असत.  यांच्याबाबतीत नेहरूजींची भूमिका अजूनही डळमळीत होती.  नेहरूजींचा रोष साहेबांनी दोन कार्यवाही केल्यानं ओढवून घेतला होता.  जनरल कौल यांच्या राजीनाम्याचा स्वीकार आणि नेफाच्या पराभवाची सुरू केलेली चौकशी.

''नेहरूजींचे खास दूत म्हणून परराष्ट्र व संरक्षण खात्यासंबंधी अधिकार्‍यांशी चर्चा करणार, अशा आशयाची मुलाखत पटनाईक यांनी अमेरिकेतील वर्तमानपत्राला दिली.  तसेच ते अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे व क्षेपणास्त्रे मिळतील काय याची चाचपणी करणार आहेत.  युद्धाच्या बाबतीत अमेरिकेनं लष्कराच्या अनुभवाचा फायदा भारत घेण्यास उत्सुक आहे.  तसेच भारतीय लष्कराच्या पुढील हालचाली काय राहतील याची वाच्यता या नेहरूजींच्या बगलबच्चाने जाहीर केली.  या उतावळ्या राजकारण्याची मजल इथपर्यंत गेली की, मेमध्ये नेहरूजी आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार आहेत.  त्यात संरक्षण खाते पटनाईक यांच्याकडे दिले जाईल आणि साहेबांना आपल्या राज्यात पाठविले जाईल.... हा सर्व गदरोळ मार्च महिन्यातील.  

सैन्यातील भावी हालचाली, बेत, शक्ती याबद्दल हा माणूस बेधडक वक्तव्ये करू लागला.  संसदीय वर्तुळात खळबळ माजली.  काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार महावीर त्यागी यांनी पटनाईक यांच्या वर्तनावर पहिली तोफ डागली.  

त्यागी म्हणाले, ''पटनाईक यांनी संरक्षण खात्याबद्दल अमेरिकेत केलेलं वक्तव्य अत्यंत बालिशपणाचं आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळात येण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्‍न पाहून मला वाटतं ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत.''

पटनाईक यांच्या वक्तव्यानं साहेबांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.  साहेब फक्त संरक्षण खात्याचे कुंकवाचे धनी आहेत.  नामधारी संरक्षणमंत्री म्हणून साहेबांकडे पाहिलं जाऊ लागलं.  या सर्व घडामोडींचा परिणाम असह्य झाला.  साहेबांनी ही बाब तत्काळ नेहरूजींच्या निदर्शनास आणून दिली.  आपली कडवट प्रतिक्रिया साहेबांनी नेहरूजींकडं व्यकत केली.  साहेबांची नाराजी नेहरूजींच्या लक्षात आली.

नेहरू म्हणाजे, ''पटनाईक यांच्या वक्तव्यानं मीही व्यथित झालो.  आपण दोघेही एकाच नावेतून प्रवास करीत आहोत.  पटनाईक दिल्लीत परत येईपर्यंत आपण कसल्याच प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये.  काँग्रेस पार्लमेंटरी वर्तुळात जो नाराजीचा सूर उमटला याची मला कल्पना आहे.''

हे उपद्व्यापी पटनाईक २४ मार्चला अमेरिकेची वारी संपवून आपल्या कामगिरीचा अहवाल देण्याकरिता नेहरूजींना भेटले.  नेहरूजींनी त्यांना साहेबांना भेटण्यास सांगितले असावे.  ते साहेबांना भेटले.  साहेबांनी भेटीचा सोपस्कार पार पाडून त्यांची बोळवण केली.

२५ तारखेला काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रघुनाथ सिंग व विविध पक्षांचे दहा सभासद मिळून १ लक्षवेधी सूचना दिली.