थोरले साहेब - १६५

''माझा विश्वासू सहकारी म्हणून मी तुमच्यावर संरक्षणमंत्र्याची जबाबदारी टाकू इच्छितो.  तुम्ही दिल्लीला माझ्या मदतीकरिता आलं पाहिजे.'' पंडितजी.

''मला संरक्षण खात्याचा अनुभव नाही.  मी ही जबाबदारी पार पाडू शकेल की नाही याचा विचार करायला मला थोडा अवधी दिला तर बरं होईल.'' साहेब.

''मी तुम्हाला दोन दिवसांचा अवधी देतो; पण हे लक्षात असू द्या की, ही गोष्ट या कानाची त्या कानाला कळता कामा नये.  उत्तर 'हो' किंवा 'नाही'.'' पंडितजी.

''मला एका व्यक्तीशी विचारविनिमय करण्याची परवानगी हवीय आपली.'' साहेब.

''अशी कोण व्यक्ती आहे की, ज्या व्यक्तीशी तुम्हाला विचारविनिमय करणं आवश्यक आहे ?''

पंडितजींचा आवाज किंचितसा चढलेला साहेबांना जाणवला.

''आहे अशी एक व्यक्ती, त्यांचं नाव आहे सौ. वेणूताई चव्हाण-माझी धर्मपत्‍नी.  आतापर्यंत मी संघर्षसमयी जे निर्णय घेतले ते सौ. चव्हाण यांच्याशी विचारविनिमय करूनच.  त्यात मला यशही आलेलं आहे.''  साहेब.  

पंडितजी फोनवर खळखळून हसले व म्हणाले, ''सौ वेणुताई चव्हाण यांच्याशी तुम्ही विचारविनिमय करायला माझी काहीच हरकत नाही.  मला दोन दिवसांनी तुमचा निर्णय कळवा.  मी तुमच्या होकारार्थी निर्णयाची वाट पाहतो.''

६ नोव्हेंबर १९६२ ला दुपारी साहेब आणि नेहरूजी यांच्यात हा संवाद झाला.