थोरले साहेब - १६०

साहेब म्हणाले, ''आपल्याला महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधावयाचा आहे.  सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी समतेवर व न्यायावर आधारित निर्णयाची कास आपल्याला धरावी लागेल.  शिक्षण, उद्योग आणि शेती हे एकमेकांचे स्पर्धक न ठरता ते विकासाचे समांतर केंद्रबिंदू ठरले पाहिजेत.  एकमेकाला पूरक असं धोरण आखावं लागणार आहे.  शेतीच्या विकासाकरिता शेती उत्पन्नावर आधारित उद्योग उभारावे लागतील.  तरुणाच्या हाताला आणि बुद्धीला महाराष्ट्राच्या विकासप्रवाहात सामील करून घ्यावं लागणार आहे.  हे हात आणि बुद्धी विध्वंसक मार्गाला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.  हे राज्य 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' याकरिता झटलं पाहिजे.  जे काही निर्णय शासन घेईल त्याची नीट अंमलबजावणी अधिकारीवर्ग करतो किंवा नाही याच्यावर देखरेख ठेवावी लागणार आहे.  उपेक्षित घटकाला त्वरित न्याय मिळाला पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात शासनकर्त्या जमातीकडून रयतेस त्रास होता कामा नये, असे आदेश दिले होते.  रयतेला त्रास झाल्यास ती रयत म्हणेल, 'मोगल काय वाईट होते ?'  लोकशाहीत त्यांना न्याय मिळाला नाही तर ते म्हणतील, 'इंग्रज काय वाईट होते ?'  हे ऐकण्याची वेळ आपल्यावर येऊ नये याकरिता आपल्याला अधिक काम करावे लागणार आहे.  ज्ञानोबा-तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, जोतीबा फुले, लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा धागा धरून आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र निर्माण करावयाचा आहे.  समाजवादाची मुहूर्तमेढ आपण महाराष्ट्रात प्रथम रोवूया.  समाजवाद म्हटल्यानंतर काही मंडळींचं पित्त खवळेल.  त्यांच्या बुरसटलेल्या विचारांकडे कानाडोळा करून आपल्याला बहुजनांचे हित साधावयाचे आहे.  ते हित साधण्याकरिता आपण कटिबद्ध होऊ या.''

साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी जे धोरण जाहीर केलं त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं पावले उचलण्यास सुरुवात केली.  साहेब जिथे जिथे कार्यक्रमाच्या निमित्तानं जात तिथे तिथे आपल्या ध्येयधोरणाचा ऊहापोह करीत.  महाराष्ट्राच्या उत्कर्षाच्या निमित्तानं परिसंवाद, शेतीविषयक मेळावे, सहकाराची ध्येयधोरणं, बँकांचे पतपुरवठ्याचे धोरण, साहित्य संमेलनं, सिंचनाचे प्रश्न, शाळा-महाविद्यालय-विद्यापीठाची निर्मिती ... जातील तिथं महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करू लागले.  बहुजनांच्या हिताचे निर्णय घेऊन राबविण्यास प्राधान्य देऊ लागले.  घेतलेल्या निर्णयाची विनाविलंब कार्यवाही करू लागले.  कामगार आणि कारखानदार यांच्यात समन्वयाचे वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊ लागले.  महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात व वर्गात साहेबांविषयी आत्मीयता निर्माण होऊ लागली.  साहेब सर्वांचा विश्वास संपादन करू लागले.

महाराष्ट्रभर सामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्या प्रश्नांची उकल करण्याच्या प्रयत्‍नात साहेब गुंतले.  साहेब जातील तिथे बहुजनांच्या हिताच्या निर्णयाची चर्चा करू लागले.  त्यातून बुद्धिजीवी वर्गाच्या डोक्यातील विकृत प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढू लागली.  बहुजन समाज म्हणजे एक विशिष्ट वर्ग म्ळणजेच मराठा, असा अपप्रचार सुरू झाला.  बहुजन समाज म्हणजे मराठा काय ? अशी विचारणा होऊ लागली.  ही गोष्ट साहेबांच्या कानापर्यंत पोहोचली.  एका सभेत साहेबांनी या विकृत मनोवृत्तीची दखल घेतली आणि त्यांना बहुजन समाजाची व्याख्या समजून सांगितली.  म्हणाले, 'ज्यांची सुखदुःखे समान आहेत तो बहुजन समाज.'  जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरं.

जळीत प्रकरणातील लाभार्थी ब्राह्मण वर्गानं साहेबांचा जाहीर सत्कार सांगलीत आयोजित केला होता.  या सत्काराला उत्तर देताना कर्जमाफी आणि ब्राह्मण वर्गाविषयी आपले विचार व्यक्त केले.