महाराष्ट्रातील दुष्काळ - २

श्री. अण्णासाहेबांना शिबिरात अनेक जिज्ञासूंनी पाणी वापर, शेती व ग्रामोद्धारासंबंधी विचारलेल्या निवडक प्रश्नांना त्यांनी दिलेली लेखी उत्तरे हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ठय मानावे लागेल.  ग्रामीण अर्थशास्त्रज्ञ शेती अभ्यासक व पाणी प्रश्नावर कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांना ही प्रश्नोत्तरे नित्य मार्गदर्शन करण्यास सदातत्पर संगणकासारखी आहेत असे म्हटले तर त्यात अतिशयोक्त नाही.  विशेष उल्लेखनीय म्हणजे जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगातून जात असताना त्यांनी हा ग्रंथ संपादित करण्याचे कष्टप्रद कार्य केवळ ह्या विषयावरील प्रगाढ प्रेमामुळेच केले !  असा हा बहुपदर व ग्रामोद्धाराच्या हेतूने प्रेरीत झालेला ग्रंथ अनेकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला आहे.

चर्चा शिबिर यशस्वी करण्यासाठी अनेक ज्ञात व अज्ञात हात मदतीला होते.  त्यात प्रतिष्ठानचे निरसल व्यासंगी व बहुश्रुत पितामह आचार्य वि. स. पागे यांना चपखल योजकतेने शिबिर-संचालन केले.  महाराष्ट्राच्या युयुत्सू प्रवृत्तीचे प्रतीक आणि कै. यशवंतरावांचे मानसपुत्र श्री. शरद पवार ह्यांनी शिबिरातील विचार-अवलोकनास आखीव व रेखीव बनवले.  श्री. शंकरराव कोल्हे, प्राचार्य वाघमारे, शान्तारामजी गरुड, इंजीनियर नामदेवराव शिंदे, डॉ. शेखावत, कविवर्य महानोर, शंकरराव गेडाम, बापू उपाध्ये आणि इतर अशासारख्या महाराष्ट्रातल सर्व भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नामध्ये आस्था ओतून शिबिराचे प्रयोजन सिद्ध केले होते.  ह्या सर्वांचे प्रतिष्ठान ॠणी आहे.  ह्या सर्वांच्या विचारांचे प्रतिबिंब ग्रंथात पानोपानी उमटलेले दिसेल.

ह्या विषयाशी आवश्यक ते तपशील व प्रासंगिक सहाय्य व मसलत देणारे प्रा. देसरडा, दीपक पाटील, दिलीप शिंदे, ग्रंथ सूची तयार करण्यात सहकार्य देणारे मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल प्रा. अविनाश टिकेकर, आवश्यक त्या लेखांचे सहाय्य देणारे टाइम्स ऑफ इंडिया मधील संदर्भ-विभागप्रमुख सौ. विजया दिघे, महाराष्ट्र टाइम्सचे श्री. प्रकाश बाळ व सतीश कामत, श्री. ज्ञानेश्वर खैरे, प्रा. रतनलाल सोनाग्रा, नियोजन मंडळाचे श्री. कवडे व नलावडे इत्यादींचे आभार मानावे तेवढे कमीच होतील.  महाराष्ट्र टाईम्स आणि सकाळ (पुणे) ह्या दैनिकांच्या प्रकाशकांनी काही लेखांबाबत दिलेल्या अनुमतीबद्दल प्रतिष्ठान ॠणी आहे.

प्रकाशन कार्य तडीस जावे म्हणून प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी श्री. जि. ल. परब व त्यांचे सहकारी श्री. संजय बनसोडे व अरूण शिंदे, विविध टेप्सवरून भाषणे तयार करण्यात सहकार्य देणारे श्री. भालेराव व कुमार नाईक यांचे सहकार्य नमूद करणे कर्तव्य ठरते.

हा ग्रंथ सुबकतेने छापून देणारे, व्यावसायिक दृष्टीपेक्षा प्रतिष्ठानच्या विशिष्ट दृष्टिकोनाशी सहमती दाखवून सहकार्य करणारे अक्षर प्रतिरूप श्री. अरूण नाईक, त्यांचे बंधू डॉ. राजीव नाईक व त्यांचे कुशल कामगार ह्यांच्यामुळे हा विविधलक्ष्यी ग्रंथ पूर्ण होऊ शकला.  युवक चित्रकार श्री. जयवंत शिंदे ह्यांनी विषयोचित मुखपृष्ठ तयार करून ग्रंथाच्या बाह्य आकर्षणात मोठी भर घातली.  प्रतिष्ठानच्या प्रकाश्न समितीने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.  विशेषतः ग्रंथ प्रकाशन समितीच्या वतीने प्रा. विजय पानसरे ह्यांनी ह्या ग्रंथाची संकल्पना, आखणी आणि साहित्याची जुळवाजुळव करण्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे; त्यामुळे ह्या ग्रंथ उभारणीमध्ये मा. अण्णासाहेबांना त्यांचे बहुमोल सहाय्य लाभले हे नमूद करणे प्रतिष्ठानचे कर्तव्य ठरते.

महाराष्ट्रातील ग्रामीण समस्या आणि शेती व पाणी विषयक जिज्ञासूंना, तसेच रचनात्मक कार्यकर्त्यांना व रसिक वाचकांना हा ग्रंथ प्रतिष्ठानच्या ह्या आधीच्या प्रकाशित ग्रंथांप्रमाणेच उपयोगी वाटावा अशी आशा करतो.  यशवंतरावांच्या चाहत्या रसिकांनी हा ग्रंथ खरेदी करून आम्हाला प्रोत्साहन द्यावे ही आग्रहपूर्वक विनंती.

प्रा. पी. बी. पाटील
सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
दसरा
१० ऑक्टोबर १९८९