यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ४३

लेखकाची निर्मिती आणि वाचकाचा आस्वाद हे दोन्ही प्रकार विशिष्ट असतात. एक विशिष्ट साहित्य प्रकारातून आपल्या अनुभवांची अभिव्यक्ती करणारे लेखक आणि विशिष्ट साहित्य प्रकाराच्या आस्वादातून जीवनाचा कलात्मक प्रत्यय घेऊ पाहणारे रसिक जीवनाकडे पाहण्याचा आपला वृत्तीधर्मच प्रकट करीत असतात. दलित साहित्य प्रकारातून आविष्कृत होणारी साहित्यकृती जेव्हा दलित लेखकांच्या साहित्य प्रकारातून अवतरते तेव्हा तिच्या मुळाशी असलेल्या अनुभवाची वेगवेगळी अंगे प्रकाशात येतात व त्यांची बांधणीही वेगळ्या प्रकाराने होते. सुमारे १९६०-६५ च्या दरम्यान दलित साहित्याच्या निर्मितीस प्रारंभ झाला.' शिक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य यामुळे आत्मभान जागृत झालेल्या दलित तरुणांच्या प्रक्षुब्ध मनाचा आविष्कार म्हणजे दलित साहित्य होय." दलित साहित्याच्या आविष्कारात जात अपेक्षित नसते. तर अन्यायाविरुद्ध झुंज देणारी प्रवृत्ती महत्त्वाची असते. हे साहित्य अज्ञान, दारिद्रय, पिळवणूक यांना नकार देते. सारांश आत्मोद्धार हेच दलित साहित्याचे प्रयोजन आहे. या परिवर्तनवादी व विद्रोही दलित साहित्याची समीक्षा करताना यशवंतराव लिहितात, "दलित समाजातून आलेल्या नव्या मराठी साहित्यिकांनी जे साहित्य निर्माण केले ती मराठीतील एक मोलाची भर आहे असे मी मानतो. उच्चभ्रू साहित्यांचे किंवा त्यांच्या संकलप्नाचे मानदंड लावून त्याला जोखणे चुकीचे आहे. उच्चभ्रू साहित्यात पाश्चात्य वळणाची अश्लीलता आपणास चालते. दलित समाजातून येणा-या साहित्यिकांच्या भाषे, मात्र आपण नाके मुरडतो. हा नैतिक भेदभाव आहे. दुहेरी मानदंडाची भावना त्यामागे आहे, असे मला वाटते. म्हणून ज्या सामाजिक थरातून लेखक आलेला असेल, त्याची भाषा त्याच्या साहित्यात आली तर ती स्वागतार्ह मानली पाहिजे." असे यशवंतराव लिहितात. दलित साहित्याने मराठी साहित्याच्या कक्षा विस्तारल्या. आतापर्यंत मराठी साहित्यातून चित्रित न झालेले एक मोठे समाजजीवन या दलित साहित्याच्या रुपाने साकार झाले आहे. कविता, कथा आणि आत्मकथा या तीन वाङ्मयप्रकारामध्ये दलित लेखकांनी अपूर्व अशी निर्मिती करून मराठी साहित्याचीही दालने अत्यंत समृद्ध केली. दलित साहित्याकडे पाहण्याचा समीक्षकांचा पारंपारिक दृष्टिकोन दलित साहित्याने बदलून टाकता आहे. म्हणून उच्चभ्रू साहित्याचे निकष लावून या साहित्याकडे पाहणे योग्य नाही असे यशवंतराव सुचवतात.

दलित साहित्य हे आंबेडकरवादी साहित्य आहे. या साहित्यातून जरी लेखकाची व्यक्तिमनाची निर्मिती होत असली तरी तिच्यातून सामाजिक जाणीवही प्रभावीपणे प्रकट केली जावू शकते. मानवतावादी समाजव्यस्थेची निर्मिती करणे ही या साहित्याची भूमिका आहे. माणसाला त्यांच्या दास्यातून मुक्त करून त्याला परिपूर्ण असा स्वतंत्र माणूस म्हणून उभा करणारे हे साहित्य आहे. या संदर्भात यशवंतराव म्हणतात, "उपेक्षित सामाजिक स्तरांच्या भावनांची जी कोंडी इतकी वर्षे झाली होती ती आज फुटली आहे त्याचा सामाजिक सुधारणेसाठी व सामाजिक प्रक्रियेसाठी उपयोगी होईल जी समाजसंस्था जुनी झाली आहे, तिच्याविषयी संबंधित सामाजिक गटांना काय वाटत होते. तिचा जाच या गटांना कसा होत होता, त्यांचा सामाजिक अनुभव काय होता याचे जे दर्शन या साहित्यातून घडते ते सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे." असा विचार या साहित्याच्या अनुरोधाने यशवंतराव मांडतात. कित्येक वर्षांपासून अन्याय, अत्याचार, सहन केलेल्या एका समूहाला आता शब्द मिळाले आहेत. असह्य कोंडमारा आणि असीम वेदना वर्षानुवर्षे सहन करणा-या दलित वर्गाला स्वत:चा असा एक स्वर सापडला आहे. आपल्या स्वत:च्या साहित्य आपण निर्माण केले पाहिजे ही इच्छा त्याला झाली आहे. हीच नव्या अनुभूतीची खूण आहे. हे साहित्य समृद्ध, समर्थ आणि चिरकाल टिकणारे श्रेष्ठ साहित्य निर्माण होऊ पाहात आहे. त्यामुळे कोणास काय वाटते त्यापेक्षा त्या समूहाचे दु:ख काय हे महत्त्वाचे आहे. अशा या साहित्यातून अस्वस्थतेचा, वेदनेचाच प्रामाणिक आविष्कार स्पष्टपणे दिसतो. म्हणून एखादा समूह आपल्या दडपलेल्या भावनांची अभिव्यक्ती दलित साहित्याद्वारे करीत असेल तर ही घटना सामाजिक दृष्टीने सुद्धा स्वागतार्हच आहे असे यशवंतरावांना वाटते.