यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ४६

यशवंतरावांच्या काळात वा. म. जोशी, न. चिं. केळकर, वि.स. खांडेकर यांसारखे प्रसिद्ध प्रस्तावनाकार लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्याच काळात यशवंतरावांनी काही पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. या प्रस्तावनांमध्ये वाङ्मयप्रकार, त्यांची वृत्ती-प्रवृत्ती आणि विकास, या विकासप्रक्रियेत स्वत: लेखक, संपादक यांचे त्या वाङ्मयप्रकारात स्थान, त्यांची मराठी वाङ्मयाला उपयुक्तता याचा विचार प्रामुख्याने त्यांनी केलेला दिसतो. तद्ननंतर संबंधित वाङ्मयप्रकार. त्यामधील विषय. त्या विषयाचे महत्त्व याचेही विवेचन केले आहे. त्यामुळे या सर्व प्रस्तावनांमध्ये यशवंतरावांसारख्या विचारशील माणसाचे चिंतन दिसते. त्यांच्या प्रस्तावनेतून कलात्मक रंजन आणि भाष्यात्मक प्रबोधन यांचा सुंदर समन्वय साधला गेला आहे. त्यामुळे यशवंतरावांच्या प्रस्तावना वैचारिक निबंधच वाटावे असे त्यांचे स्वरूप वाटत. आस्वादक समीक्षेचा एक नमुना म्हणून या प्रस्तावनांचा निर्देश करावा लागेल.

प्रस्तावना लिहिताना यशवंतरावा अंत:करणपूर्वक लिहितात. त्यामध्ये मूलभूत विचार प्रकटन करतात. ज्या वाङ्मयप्रकाराबाबत प्रस्तावना ते लिहितात त्यामध्ये सदर वाङ्मय प्रकाराचे महत्त्व, त्या वाङ्मय निर्मितीच्या प्रक्रियेतील उणिवा, त्याचे इतर वाङ्मयप्रकाराशी साम्यभेद कसे जाणवले, लेखनास कसे प्रवृत्त केले गेले किंवा त्या कलाकृतीसंबंधी मनात कोणते विचार, कोणत्या भावना जागृत झाल्या याचे काही वेळा स्थूल तर प्रसंगी सूक्ष्म तपशील देऊन ते विवेचन करतात. त्यानंतर एकूण वाङ्मयाच्या क्षेत्रात संबंधित कलाकृतीच्या लेखकाचे अथवा संपादकाचे स्थान निर्धारण करून मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात त्यांचे महत्त्व स्पष्ट करतात. याचबरोबर संबंधित वाङ्मयप्रकार. त्यामधील विषय. त्या विषयाचे काळपरिस्थिती संदर्भात महत्त्व इत्यादी मुद्द्यांचे विवेचनही यशवंतराव करतात. या सर्वांच्या अनुषंगाने यशवंतरावांच्या प्रस्तावनेमध्ये त्यांचे फक्त चिंतन 'मुक्तपणाने' येऊन जाते. यशवंतरावांचे हे मुक्त चिंतन विचारशील माणसांचेच चिंतन असते.

यशवंतरावांना अनेकदा उपचार म्हणून, प्राप्त कर्तव्य म्हणून 'प्रस्तावना', 'दोन शब्द', 'आशीर्वाद', लिहावे लागले आहेत. अशा औपचारिक लेखनामधूनही त्यांचे साहित्यप्रेम, गुणग्राहक वृत्ती प्रकटली आहे. 'संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज यांचे चरित्र' (पांडुरंग बाळाजी कवडे; १९५४ ), 'माझ्या आठवणी व अनुभव,' (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे; १९५८ ), 'लोकसाहित्य साजशिणगार' (संपादिका डॉ. सरोजिनी बाबर १९६४) 'कर्मवीर भाऊराव पाटील व्यक्तिदर्शन' ( वसंत लोखंडे, १९६४), 'लता (गौरवग्रंथ)  (संपादिका- सरोजिनी वैद्य, शांता शेळके, वृंदा लिमये : १९६७ ) 'गगनात घुमविली जयगाथा' (गो.नी.दांडेकर : १९६६ ), 'अमृतपुत्र' ( भा. द. खेर, १९७०), 'पंडित नेहरु : एक मागोवा' ( डॉ. न. गो. राजूरकर व प्रा. नरहर कुरुंदकर : १९७३), 'सारंग' (कुमार धनवडे : १९८४ ), छत्रपती शिवराय ( महाकाव्य), ( महाराष्ट्र कवी यशवंत : १९६८ ), 'स्वर' ( कवी सुधांशु , ह. न.जोशी १९७० ) या सारखी कितीतरी उदाहरणे यशवंतरावांच्या प्रोत्साहनपर प्रस्तावना म्हणून सांगता येतील. या साहित्यकारांची साहित्यकृती व त्यांचे जीवन यांच्यातील परस्परसंबंध सूचित करण्याकडे यशवंतरावांच्या प्रस्तावनांचा रोख असतो. तर कधी लेखनातील आशयाचे कौतुक, कधी नव्या प्रयोगाचे स्वागत, कधी भावी लेखनासाठी शुभेच्छा, कदी वाचकांना केलेली शिफारस असे स्वरुप या प्रस्तावनांना प्राप्त झालेले आहे. संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज यांचे चरित्र; (बाळाजी कवडे ) १९५४ साली प्रकाशित झालेल्या २ -या आवृत्तीमध्ये तुकाराम महाराजांच्या कामगिरी संबंधी प्रस्तावनेत ते लिहितात, " त्यांनी आपल्या भक्तीपूर्ण, रसाळ व सोप्या परंतु अर्थपूर्ण अभंगातून जनतेमध्ये जागृती निर्माण केली. मृतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजीवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले, " असे यशवंतराव लिहितात.

यशवंतरावांनी लिहिलेल्या काही प्रस्तावना दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यामधून गंभीर स्वरुपाचा साहित्य विषयक विचार प्रकटला आहे. अशा प्रस्तावनांमध्ये सरोजिनी बाबर संपादीत 'लोकसाहित्य : साज शिणगार' या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा उल्लेख करता येईल. " जीवन पराकोटीचे समर्पित असेल तर ते कधीच जीर्ण होत नाही. चंद्र कधी जुना होत नाही. सूर्याला म्हातारपण येत नाही. दर्जा कधी संकोचत नाही. यातील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे. पण अनंत युगे लोटली तरी किनारा त्यांच्याजवळ पोहोचलेला नाही. काळाने त्यांना घेरलेले नाही. त्यांचा कधी कायापालट नाही. स्थित्यंतर नाही. ते विश्वसन अखंड आहे... कन्याकुमारीच्या प्रशांत परिसरात, कृष्णामाईच्या सानिध्यात, गंगा यमुनेच्या सहवासात, हिमालयाच्या कुशीत, माझी अशी भावसमाधी लागते. अधूनमधून लोकसाहित्याच्या भावगंगेत डुंबताना देखील मी हाच अनुभव घेतो." अशी रीतीने या ग्रंथाच्या प्रस्तावनेत यशवंतरावा जीवनानुभव व्यक्त करतात. याशिवाय यशवंतरावांची लोकसाहित्यविषयक चिंतनशीलता ही प्रकट होते. लोकसाहित्याचा विविध कलांशी संबंध आहे. "लोकजीवनाची व्यक्त दर्शने म्हणजेच लोकसाहित्य' अशी साधी व्याख्या ते करतात. लोकसाहित्य आपण चाखले पाहिजे. तसा हेतुपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. या साहित्याचा अनादर होता कामा नये असा विचार या प्रस्तावनेत मांडतात.