यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ४०

त्या त्या काळाच्या गरजा, वैशिष्टये व अपेक्षा यांनी तिला घाट दिलेला असतो. त्यामुळे साहित्यकृतीच्या आस्वादाच्या, आकलनाच्या आणि मूल्यमापनाच्या संदर्भात तत्कालीन परिस्थितीचा परामर्श ते घेतात. जवळजवळ सर्वच महत्वाच्या साहित्यप्रकारावर त्यांनी भाष्य केले आहे. प्रासंगिक पण विचारपूर्वक स्फुटलेखन करणारे विचारवंत म्हणून सामान्य वाचक यशवंतरावांना ओळखतो. त्यांचा व्यासंग, तर्कशुद्ध चिकित्सा, सडेतोडपणा, सुगम प्रतिपादन शैली आणि कलाकृतीच्या व कलावंतांच्या व्यक्तिमत्वाच्या सूक्ष्म छटा शोधणारी सौंदर्यवादी दृष्टी यामुळे यशवंतरावांची साहित्यमीमांसा भरीव आणि साहित्यसमीक्षा रोचक बनली आहे. कारण त्यांची भूमिका ही बोधकाची नसून शोधकाची होती.

यशवंतरावांकडे साहित्यकृतीचे आकलन करण्याइतका व्यासंग आणि आस्वाद घेण्याइतकी संवेदना होती. अनुभवाविषयी संबंधित शास्त्रांचे, कलांचे ज्ञान त्यांना होते. साहित्याचा सांस्कृतिक अनुबंध लक्षात घेण्याची क्षमता त्यांच्याजवळ होती. त्याचप्रमाणे उपकारक ठरणा-या अनेक शास्त्रांची माहिती त्यांना होती. साहित्याविषयीचे उदंड प्रेम त्यांच्याकडे होते. तसेच अनेक साहित्यकृतींच्या चिकित्सक वाचनातून यशवंतरावांची साहित्यदृष्टी तयार झालेली होती. यशवंतरावांसारख्या समीक्षकाने सर्व प्रकारचा वाङ्मयप्रकार मग तो हिंदी, इंग्रजी अथवा मराठी भाषेतला असो तो सारख्याच जिज्ञासू बुद्धीने तपासला. मिळतील तेथून वाङ्मयाच्या अंतर्बाह्य स्वरुपासंबंधीचे साहित्य त्यांनी गोळा केले. भाषेचा, राष्ट्राचा, धर्माचा, विशिष्ट मतप्रणालीचा अभिमान बाळगून आपली दृष्टी संकुचित न होऊ देता ललित कलांचा डोळस आस्वाद त्यांनी घेतला. त्यामुळे साहजिकच विविध ललितकलांविषयी त्यांच्या मनात जिज्ञासा व जिव्हाळा निर्माण केला.

यशवंतरावांसारखा एखादा समीक्षक ज्या वेळी एखाद्या पुस्तकाची, लेखनाची किंवा साहित्य प्रकाराची आपल्या वाचनासाठी निवड करतो तेव्हा त्या साहित्याची प्राथमिक चांगुलपणाची साक्षच देत असतो. काय निवडावे व काय निवडू नये याविषयी त्यांची विवेकबुद्धी जागरूक होती. चांगल्या वाईटाच्या त्यांच्या काही कल्पना निश्चित होत्या. आणि त्यांच्या आधारे विविध साहित्यकृतीवर अभिप्राय व्यक्त करताना समीक्षा जन्म घेत असते. यशवंतरावांनी अनेक साहित्यकृतींचा शोध घेतला. त्या साहित्यकृतींचे वर्णन, विश्लेषण केले. त्या कृतीतील मर्म सांगितले. अभ्यासाची समग्रता, लेखनाची सभ्यता, तर्कशुद्धता इ. मर्यादा ओळखून अनेक साहित्य कृतींचे विवेचन यशवंतरावांनी केले आहे.

यशवंतरावांनी वेगवेगळ्या साहित्यकृतीचा आणि साहित्यप्रकारचा आस्वादक दृष्टिकोनातून आणि स्वागतशील दृष्टीने विचार करुन साहित्य समीक्षेच्या क्षेत्रात आपली मते नोंदवली आहेत. कविवर्य सुधांशु ( ह. न. जोशी ) यांच्या 'स्वर' या काव्यसंग्रहाबद्दल ते आपले मत असे प्रगट करतात, " कल्पनाशक्ती शापही आहे आणि वरही आहे. अशी तरल कल्पनाशक्ती असल्याशिवाय सरस साहित्य निर्मिती होणे कठीणच, परंतु हा शाप जीवनातल्या अनंत वेदना शब्दरुप करणारा आहे. स्वत:च्याच नव्हे, तर सहसंवेदनेने अनेकांच्या भावनांना शब्दरुप देऊन निर्भेळ आनंदाची निर्मिती करणारा असा हा शाप एखाद्या भाग्यवंतालाच पूर्वपूण्याईने लाभतो. कवि 'सुधांशु' कल्पनाशक्तीचे हे असेच वरदान घेऊन वाचकापुढे या 'स्वर' रुपात आले आहेत." दत्त दिगंबर दैवत माझे' या भक्तीमधुर गीताने कवि सुधांशु सर्वांना परिचित होते. अशा कवीच्या काव्य संग्रहाबद्दल सौंदर्यपिपासू पण संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वातून आपले विचार त्यांनी नोंदवले आहेत.

यशवंतरावांनी आस्वादक समीक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्या त्या कलाकृतीने वाङ्मयीन विहंगमावलोकन त्यांनी केले आहे. कोणत्याही पूर्वग्रहदूषित अशा भावना मनामध्ये न ठेवता स्वच्छ मनाने परंतु डोळस अशा दृष्टिकोनांतून त्यांनी चिंतनपूर्वक रसग्रहणे केलेली आहेत. 'संघर्ष' या मीना जोशी संपादित इंदिरा गांधींच्या जीवनावरील कादंबरीला प्रस्तावना लिहिताना ते त्यांचे मोजक्या शब्दांत वर्णन करतात, "हिंदूस्थानसारख्या एका विशाल देशात अखिल सामान्यजनांच्या विश्वात असणारी ही एक व्यक्ती म्हणजे एक शक्ती आहे.