विरंगुळा - ९९

मला हेही कबूल केले पाहिजे की श्रीमतीजी माझ्याशी कधी सुडाने वागल्या नाहीत. Fair वागणे म्हणतात तसे गेली ६ वर्षे त्यांनी माझ्याशी व्यक्तीश: वर्तन केले. पण शेवटी हे सगळे वैयक्तिकच ना? सार्वजनिक जीवनांत आणि राजकारणात जी तत्त्वे मानली त्याच्या भविष्याचे काय?

आम्ही साऱ्यांनी वैयक्तिक विचार करूनच वागणे योग्य आहे का, असा संघर्ष मनात चालू आहे. निवडणुकीला उभे राहू नये आणि लोकात काम करीत रहावे किंवा निवडणूक करून, ती जिंकून सत्तेबाहेर राहावे असे दोन पर्याय आहेत. कोणता स्वीकारावा? पण निवडणुका तरी होणार आहेत का?

सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर आजची शक्ती राहाणार नाही, लोकांची दृष्टी बदलेल, दूर होतील. साधनांची कमतरता होईल. मग मनाने कष्टी होऊन एकाकी पडावे लागेल हेही शक्य आहे. पण त्याची तयारी नको का करायला?

जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांपासून दूर न होता, किंबहुना त्यांच्याशी एकरूप होऊन राहावयाचे म्हटले तर ही भीती कशासाठी?

मला महाराष्ट्र काँग्रेस पक्षालाच मार्ग दाखविला पाहिजे. छुपे शत्रू आणि आज वरवर दिसणारे मित्रही लांब जातील, विरोध करतील हे सर्व समजून उमजून निर्णय घ्यावा लागेल.

कुटुंबाचा विचार केला तर माझे कर्तव्य सर्वांच्या दृष्टीने माझ्या परीने मी पुरे केले आहे. संसारातले प्रश्न कधीच संपत नाहीत. माझे मन पूर्वीही त्यात नव्हते. आजही नाही. प्रश्न आहे तुझा नि माझा. तू धैर्याने साथीला मनापासून असलीस म्हणजे मला कशाची पर्वा नाही.

आयुष्याची शेवटची जी काही वर्षे आता राहिली आहेत ती तेजोभंग करून घेऊन काढण्यात अर्थ नाही.
माझ्या मनात काय चालले आहे ते स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामुळे ते मलाही अधिक स्पष्ट समजले आहे. निर्णय काहीच घेतलेला नाही. मनोव्यापार काय चालले आहेत ते माहीत व्हावे म्हणून लिहिले आहे.

एकमेकांच्या सल्ल्यानेच निकाल घेऊ. घाई कसलीच नाही. पण एक गोष्ट निश्चित की हा निर्णय 'हो' चा की 'नाही' चा - कसाही घेतला तरी तो माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि कदाचित शेवटचाच ठरणार आहे.