इतिहासाचे एक पान. ३१५

सिंडिकेटशीं मिळतं-जुळतं घ्यावं अशी इंदिराजींना मुळीच घाई नव्हती. बंगलोरमध्ये सिडिकेटनं त्यांचा चांगलाच पाणउतारा केला होता. राष्ट्रपतिपदाची निवडणूक होईपर्यंतच्या काळांत लढाऊ पवित्रा स्वीकारण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ-श्रेष्ठ मात्र आतुर बनलेले होते, तर यशवंतराव हे त्यांनी दिलेल्या वचनांतून कसं मुक्त होतां येईल यासाठी प्रयत्नशील होते. इंदिरा गांधी यांच्या पुरोगामी धोरणाला आपला संपूर्ण पाठिंबा द्यायचा आणि त्याच वेळी सिंडिकेटशी क्षणैक स्वरुपाचे निर्माण झालेले संबंध चालू ठेवायचे, याचा समतोल राखणं त्यांना कठीण झालं होतं.

अखेर २२ जुलैला इंदिराजींनी, संजीव रेड्डी यांच्या उमेदवारी-अर्जावर मान्यतेची स्वाक्षरी केली. काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकींत सर्वांच्या उपस्थितींतच ही सही झाली. त्याच बैठकींत उपराष्ट्रपतिपदासाठी काँग्रेसनं, गोपालस्वरुप पाठक यांची उमेदवारी मान्य केली. निजलिंगप्पा हे संसदीय काँग्रेस-पक्षाचे सदस्य नव्हते. तरीहि त्यांना संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी निमंत्रण द्यावं आणि त्यांनी रेड्डींना पाठिंबा देण्याच्या संदर्भांत सभासदांना आवाहन करावं, असंहि बैठकींत ठरवण्यांत आलं. ब-याच ओढाताणीनंतर या बैठकीचा दिवस मग एकदाचा निश्चित झाला. पंतप्रधान आणि निजलिंगप्पा या दोघांच्याहि गटांतील लोकांना त्यासाठी बरीच धांवपळ करावी लागली होती. त्या दोन्ही गटांत कमालीचे मतभेद निर्माण झालेले असतांनाहि, अशी संयुक्त बैठकीपर्यंत मजल गेली याचा अर्थ, पुढच्या काळांत आता गोष्टी हळूहळू सुरळीत घडूं लागतील अशी त्या वेळीं यशवंतरावांची समजूत झाली; परंतु नंतरच्या काळांतहि पंतप्रधान आणि काँग्रेस-नेते यांच्यांतील मूलभूत मतभेद वाढततच राहिले.

पक्षाच्या संघटनेमध्ये काँग्रेस-कार्यकारिणी श्रेष्ठ की पंतप्रधान श्रेष्ठ, हा मुख्य वाद होता. परंतु पक्षाचं धोरण ठरवण्याबाबत आणि ते राबवण्याबाबत कार्यकारिणीच ठिसूळपणा, निरनिराळ्या पक्षांतील राजकीय गुंतागुंत आणि त्यांतून काँग्रेस-अंतर्गत निर्माण झालेले तणाव, ओढाताण यांमुळे नेमकी कशाची निवड करायची हें मोठं कठीण ठरलं. स्वतंत्र आणि जनसंघ हे दोन पक्ष सिंडिकेटला जवळचे वाटत होते, तर उजवे कम्युनिस्ट आणि द्रविड मुन्नेत्र कळहमू हे इंदिरा गांधींच्या गटाला पाठिंबा दण्याच्या पवित्र्यांत होते.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक नजीक येऊन ठेपतांच पक्षोपपक्षांतील हालचालींना जोर चढला. जनसंघ, स्वतंत्र आणि भारतीय क्रांतिदल यांनी मधेच राष्ट्रपतिपदासाठी चिंतामणराव देशमुखयांची उमेदवारी पुढे केली. परंतु या पक्षांतील ब-याच जणांचा कल सिंडिकेटकडे म्हणजेच रेड्डींकडे असल्यानं देशमुख यांना विजयी करणं अवघड आहे, असं लवकरच त्यांच्या लक्षांत आलं. रेड्डींना विजयी करायचं, तर पंतप्रधानांचा पाठिंबा असल्याशिवाय हें घडणार नाही याची निजलिंगप्पा यांचीहि आता खात्री झाली होती.  इंदिराजींनी रेड्डींच्या उमेदवारी-अर्जावर स्वाक्षरी केली होती हें खरं, परंतु त्यानंतर त्यांनी कमालीचा थंडपणा धारण केला होता. त्यामुळे निजलिंगप्पा आणि त्यांचे सहकारी यांनी काँग्रेस उमेदवारासाठी अन्य पक्षांची मदत घेण्याचं ठरवलं.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यांतच मग निजलिंगप्पा यांनी, इंदिराजींना अंधारांत ठेवून, जनसंघाचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष एम्. आर. मसानी यांना न्याहारीसाठी बोलावून त्यांच्याशी आणि डाह्याभाई पटेल, एन्. दांडेकर यांच्याशी चर्चा केली, काश्मीरचे नेते बक्षी गुलाम महंमद यांनाहि त्यांनी गाठलं.