इतिहासाचे एक पान. २१९

या विविधतेंतहि एकता आहे आणि ती असली पाहिजे असं आवाहन करतांना यशवंतरावांनी सांगितलं, “विविधतेनं जीवनाला जसं सौंदर्य येतं, तसं एकतेतून जीवनाचं सामर्थ्य प्रतीत होतं. विदर्भ, मराठवाडा आणि पश्र्चिम महाराष्ट्र यांची भाषिक एकता तर आहेच, पण शिवाय लोकांच्या चालीरीति, परंपरा आणि सामाजिक संघटनेचं एकूण स्वरूप हेहि सारखं आहे.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक व राजकीय इतिहासच याची साक्ष देतो. प्राचीन काळी विदर्भ व मराठवाडा हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी होते. शालिवाहन व चालुक्याची राजधानी मराठवाड्यांतल्या पैठण इथे होती, तर वाकाटक या राजघराण्यानं महाराष्ट्राचा सर्व प्रदेश आपल्या छत्राखाली आणला होता. वाकाटक हे विदर्भाचे राजे होते व त्यांची राजधानी चांद्याजवळ भांदक इथे होती. देवगिरीच्या यादवांच्या काळांत महाराष्ट्राची व मराठी भाषेची विशेष भरभराट झाली. मराठीचे आद्य व श्रेष्ठ कवि मुकुंदराज, ज्ञानेश्र्वर आणि नामदेव याच काळांत झाले. चक्रधर या महानुभाव-पंथाच्या संस्थापकाचा एक शिष्य महिंद्र व्यास, यानं सुमारे सातशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘लीला-चरित्रां’त महाराष्ट्राचं जे वर्णन केलं आहे ते असं-

साठी पक्ष देश महाराष्ट्र । तेथिचे शिहाणे सुभटू ।
वेदशास्त्र चातुर्याची पेठू । भरेली तिये देशी ।।
ऐसे ते महाराष्ट्रराये सुंदरू । वरी महाराष्ट्रभाषा चतुरू।
तेही वसविले गंगावेरू। क्षेत्र त्र्यंवकूवे-ही ।।
पश्र्चिमे त्र्यंबकूपूर्व सागरवे-ही । द्वादशयोजने उभय गंगातीरी ।
ऐसे ते गंगातट महाराष्ट्री । वसिजे पुण्यातन ।।
देश म्हणजे खंडमंडळ । जैसे फलेठाणापासौनि दक्षिणेसि ।
म-हाठी भाषा जे तुलां ठाइं वर्ते ते एक मंडळ ।।
तयासि उत्तरे बालेघाटाचा सेवट असे । ऐसे एक खंडमंडळ ।
मग उभय गंगातीर तेहि एक खंडमंडळ । आन तयापासौनि मेघकर घाट ते एक मंडळ ।।
तयापासौनि आवघे वराड। तेहि एक मंडळ ।
पर आघवीचि मिळौनि महाराष्ट्रचि बोलिजे ।।

यापुढच्या काळांत राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र जरी भंगला, तरी संत-कवींनी महाराष्ट्राची सांस्कृतिक एकता सतत टिकवून ठेवली. संत-कवींच्या कार्याचं हे मर्म आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ज्ञानेश्र्वरापासून तो तुकारामापर्यंत सुमारे चारशे वर्ष संतांनी वारकरी सांप्रदायाच्या द्वारे सामाजिक समतेच्या तत्वांचा प्रसार करून सर्व मराठी जनतेचं ऐक्य साधलं. संतांची ही शिकवण महाराष्ट्र कधीहि विसरणार नाही. नव्या महाराष्ट्रांत ही एकता अधिक दृढ केली पाहिजे. महाराष्ट्रांत गेली चार-पांच वर्ष राज्य-पुनर्रचनेचा प्रश्र्न सतत तेवत राहिल्यानं जनतेचं मन विचलित राहिलं; व त्यामुळे विकासकार्याकडे द्यावं तितकं लक्ष जनतेनं दिलं नाही, ही वस्तुस्थिति आहे; परंतु या कार्याची आता हेळसांड होऊ न देता लोकांनी त्यावर आपलं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

महाराष्ट्र आता एकसंघ होत आहे त्याचं फार मोठं श्रेय विदर्भ व मराठवाड्यांतले नेते व विचारवंत यांनी या दिशेनं केलेल्या प्रयत्नाला आहे, यांत मुळीच शंका नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर हे एकीकरणाचं कार्य संपलं असं मानण्याची चूक कोणी करूं नये.