विविधांगी व्यक्तिमत्व-५६

राजकारणामुळे हरवलेला साहित्यिक

साहित्याविषयीचे प्रेम हा यशवंतरावांना लहानपणापासून लाभलेला एक छंद होता.

संस्कारक्षम मन असणे ही देणगी नियतीची! विचारांचे, कृतीचे, साहचर्याचे मनावर परिणाम घडत राहतात. संस्कारक्षम मन हे सर्व साठवीत राहते आणि त्यातून माणूस घडतो. यशवंतरावांना नियतीने संस्कारक्षम मन दिले आणि त्याच नियतीने उत्तम संस्कार करणारी माणसं आणि परिस्थिती यशवंतरावांच्या सभोवती निर्माण करून त्यांच्या मनाला घडविलं. त्यामुळे एक राजकारण, समाजकारण करणारा नेता म्हणून यशवंतरावांची प्रतिमा आपल्या मनासमोर उभी राहिली तरी त्यांच्या अंतरात सतत तेवणारी संस्कारज्योती मधूनमधून प्रसंगोपात प्रकाशाची किरणं दाखविते. आणि त्या प्रकाशात यशवंतराव म्हणजे एक सुशिक्षित, संस्कारसंपन्न साहित्यिकांचा बाज असलेला संवेदनाक्षम मनाचा माणूस असल्याचं प्रत्ययाला येतं.

यशवंतरावांना प्रतिभेचे देणे आईकडून उपजतच मिळाले होते. दळताना आईने म्हटलेल्या स्वरचित ओव्यांनी पहिला वाङ्मयीन संस्कार त्यांच्यावर केला होता. रामायण - महाभारताचे कथासार असणार्या बर्याच ओव्या त्यांच्या आईने रचल्या होत्या. आईबरोबर ऐकलेली कथा-कीर्तने, प्रवचने व पौराणिक आख्याने इत्यादीतून त्यांचे भाषाभान सतर्क झाले होते. कृष्णा - कोयनेच्या प्रीतिसंगमाकाठचा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला परिसर त्यांच्यातल्या सर्जनशील ऊर्मीना खतपाणी घालणारा ठरला. त्या परिसराने त्यांच्या मनात निसर्गसौंदर्याची ओढ रुजविली.

यशवंतरावांनी आपले 'ॠणानुबंध' हे पुस्तक कृष्णा-कोयनेच्या काठावर नांदणार्या 'कर्‍हाड' ला समर्पित केले आहे. ते या परिसराविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेतूनच. कृष्णा-कोयनेच्या 'या पाण्याने काही छंद लावले व काही श्रध्दा दिल्या' हे त्यांनी अर्पणपत्रिकेत नमूद केले आहे. देवराष्ट्र हे त्यांचे आजोळ. त्याच्या शेजारील सागरोबाचे शिवार, देवालये, तेथील पवित्र पाण्याची कुंडे, रम्य परिसर या परिसराने त्यांना इतका लळा लावला होता, की एखाद्या सुखस्वप्नासारखे त्यांनी आपले तिथले बालपण मर्मबंधातल्या ठेवीप्रमाणे जन्मभर जपले होते. सोनहिर्याच्या ओढयाच्या काठावर, धनगर्द आंबराईत कोकिळेच्या कुहूकुहू स्वरात स्वर मिसळून त्यांनी अर्धेअधिक मेघदूत मुखोदगत केले होते. डोंगरावर एकट्याने चढावे - उतरावे, कृष्णा-कोयनेच्या संगमात डुंबावे व त्या नद्यांचे एकात्म होऊन वाहणारे पाणी पाहात काठावर तासनतास चिंतन करावे हा त्यांच्या बालवयातला मुक्त जीवनक्रम, त्यांच्यातल्या सहित्यिकाच्या निकोप जडणघडणीस कारणीभूत झाला होता.

लोकमान्य टिळक यांच्या कार्याची सांगता आणि महात्माजींच्या कार्याचा उदय अशा कालावधीमध्ये यशवंतरावांचे बालपण गेले होते. फडके - खांडेकर युगात त्यांची पिढी वाढली होती. विशेषत: खांडेकरांच्या लेखनाचा आपल्या विचारावर व भावनांवर खोल ठसा उमटला होता हे यशवंतरावांनी नमूद केले आहे. या काळात आचार्य भागवत, वि. म. भुस्कुटे, ह. रा. महाजनी, एस. एम. जोशी वगैरे अनेक नेते तुरुंगात होते. त्यांच्या सान्निध्यामुळे तेथे राजकीय गप्पागोष्टी करता आल्या. याशिवाय 'माझी जन्मठेप', 'लो. टिळक चरित्र' वगैरे पुस्तके त्यांनी वाचली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 'कमलाकाव्य' आचार्य भागवत तुरुंगात समजून सांगत असत. त्याचा लाभ यशवंतरावांना तेथे झाला. तेव्हा आपणही दीर्घ काव्य लिहावे असे वाटून यशवंतरावांनी राष्ट्रीय चळवळीत स्वत:ला झोकून देण्याची तीव्र इच्छा असलेल्या ग्रामीण युवकाचे मनोविश्व चितारणारे दीर्घ काव्य लिहायला प्रारंभ केला होता. त्यांच्या काही कथा 'लोकक्रांती' नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झाल्या होत्या. एक कांदबरीही त्यांनी मनाशी आखून ठेवली होती.