विविधांगी व्यक्तिमत्व-४६

यशवंतरावांचे नेतृत्व सर्वंकष होते. समाजाचा व राष्ट्राचा विकास त्यांचा निदीध्यास होता. म्हणजे देशात सुबत्ता व शांतता कशी आणता येईल ते त्यांचे पहिले अवधान होते. पण मनुष्य हा कलाप्रेमी आहे. आर्थिक सुबत्ता आल्यानंतर येणारी विश्रांतीची संधी व हातातील संपत्ती योग्य मार्गाने जर वापरली नाही, योग्य करमणूक साधने जनतेला उपलब्ध करून दिली नाहीत तर समाज अनीतिमान भोगतृष्णेमध्ये वाया जातो याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच लोकांपुढे अभिजात संगीत नाटक आणि इतर कला मनोरंजन झाले पाहिजे, कलांचे उन्नयन झाले पाहिजे. मागच्या बाजूस दूर माळावर अंधार्‍या जागी होणार्‍या करमणुकीच्या कार्यक्रमातील हीन नष्ट करायचे असेल तर लोककला, लोकनाटय सभ्य स्त्री-पुरुषासमोर झगझगीत प्रकाशांत सादर करा, म्हणजे त्यातील अश्लील, अनैतिक अंधार आपोआपच नष्ट होईल असे ते म्हणत. त्यांच्या या आग्रहातूनच महाराष्ट्रात तमाशाचे लोकनाटयांत रूपांतर झाले.

नाटयकलेला उत्तेजन देण्यासाठी २.१६ लाख रुपयांची एक योजना आखली. नाटकांच्या पुस्तकांना बक्षिसे, हौशी कलावंतांचा नाटय महोत्सव, खुल्या नाटयगृहांची निर्मिती, विपन्नावस्थेतील कलावंतांना आर्थिक सहाय्य, संगीत, नृत्य आणि नाटयशाळांना अनुदान, तमाशांना पारितोषिके आदी गोष्टी महाराष्ट्रामध्ये यशवंतरावजींनी सर्वप्रथम सुरू करून प्रशासकीय गुणाबरोबरच आपल्या रसिक व कलाप्रेमीवृत्तीचा परिचय त्यांनी जनतेला करून दिला. नाटयकलेच्या विकासासाठी नाटय महोत्सव, शिबिरे यांना प्रोत्साहन दिले. एप्रिल १९५७ पासून चित्रपटांना करमणूक करात सूट देण्याची नवी पद्धत लागू केली. कलावंतांना शासनातर्फे आर्थिक सहाय्य देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. बालगंधर्वांना त्यांच्या विपन्नावस्थेत तीनशे रुपये मासिक मानधन सुरू केले.

या देशातील सांस्कृतिक घडामोडी आजपर्यंत जुनाट आणि कालबाह्य अशा सामाजिक रचनेच्या केंद्राभोवतीच फिरत आलेल्या आहेत. तेव्हा केंद्रच बदलावे लागेल. ते बदलायचे असेल  तर लोकांपर्यंत ज्ञान घेऊन जावे लागेल, नाटय - चित्रपट या माध्यमाद्वारे हे समर्थपणे करता येईल असा त्यांचा विश्वास होता.

सामाजिक नि सांस्कृतिक समृद्धीमध्ये कलावंताचे स्थान बर्‍याच वेळा डळमळीत होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कलावंतांना समाजात प्रतिष्ठा मिळावी, त्यांचे जीवन समाधानी असावे यासाठी त्यांनी कलावंतांच्या अस्मितेची नेहमीच जपणूक केली. कधी स्वत: ते कलावंतापर्यंत श्रोते आस्वादक म्हणून बसले, मैफलीत सामील झाले, तर कधी त्यांना सन्मानाने आमंत्रित करून कृतज्ञतेची पोचपावती सर्वांसमोर दिली. कलावंत हा कलेनेच ओळखला जातो, तेथे प्रांतभेद-जातिभेद-धर्मभेद कधीही मानायचे नसतात, असे आदर्श त्यांनी आपल्या कृतीने निर्माण करून ठेवले आहेत.

संगीत - स्वर, सूर, शब्द या तिन्हीवर आणि त्यांच्या निर्मात्यावर यशवंतरावांचे प्रेम होते. या संदर्भात सुधीर फडके यांच्याबाबतीत घडलेला प्रसंग सांगण्यासारखा आहे. 'सह्याद्रि' या निवासस्थानी सुगम संगीत व गीतरामायणाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपवून सुधीर फडके जाण्यासाठी निघाले. तेव्हा यशवंतराव म्हणाले, ''थोडे थांबा, आपणाला कधी मोकळेपणाने गप्पा मारता आल्या नाहीत. म्हणून सुधीर फडके यांना बाजूला घेऊन गेले. दोघेच होते. 'सुधीर मी तुम्हाला केव्हापासून ओळखतो माहीत आहे? १९४१ च्या शेवटी कर्‍हाडला आला होता पं. देशपांडयांच्याकडे, त्यावेळी तुम्ही आजारी होता. कासेगावकर वैद्य तुम्हाला औषध देत होते, त्यावेळेपासून मी तुम्हाला ओळखतो.''

पं. भीमसेन जोशी यांनी कला व कलावंत या संदर्भातील मा. यशवंतराव चव्हाणांच्या संबंधी सांगितलेल्या आठवणी पुढे नमूद करीत आहे. त्यावरून पं. भीमसेन जोशीसारख्या ख्यातनाम गायकावर यशवंतरावांच्या संगीत व कलाप्रेमाचा केवढा पगडा आहे हे दिसून येतो.