यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-मंत्रालयातील वर्षे-ch १३

विभाग ३. - मंत्रालयातील वर्षे

१३.  मंत्रालयातील कारकीर्द
यशवंतरावांच्या शब्दांत संरक्षण, गृह, अर्थ खात्यातील कारकीर्द, समीक्षालेख, संबंधित अधिकार्‍यांच्या मुलाखती

श्री. यशवंतराव चव्हाणांनी भारत सरकारात संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र संबंध ही चार अत्यंत महत्त्वाची खाती समर्थपणे सांभाळली व उत्कृष्ट प्रशासक व पेचप्रसंगात नेतृत्व करणारे कार्यक्षम मंत्री म्हणून स्वतंत्र भारताच्या प्रशासकीय इतिहासात स्थान मिळविले.  त्यांचे चरित्रकार श्री. टी. व्ही. उन्हीकृष्णन् यांनी त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती घेऊन 'चव्हाण ऍंड द ट्रबल्ड डीकेड' हे पुस्तक १९७३ मध्ये प्रकाशित केले.  एक प्रकारे चव्हाणांचेच ते आत्मकथन होते.  या पुस्तकातील संरक्षण व गृहखात्याविषयी या प्रकरणात चव्हाणांच्या शब्दांत व त्यांच्या कारकीर्दीचे जे वर्णन केले होते त्याचा अनुवाद येथे दिला आहे.  'अर्थमंत्रिपदाची चार वर्षे' हीसुद्धा 'केसरी'च्या प्रतिनिधीने घेतलेली चव्हाणांची मुलाखतच आहे.  ती १९७२ च्या 'केसरी'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.

संरक्षणदलांना पुन्हा आत्मविश्वास देणारे संरक्षणमंत्री

नोव्हेंबर १९६२ मध्ये, 'हिमालयाच्या साहाय्याला सह्याद्री धावून गेला' अशा शब्दांनी वर्णन केली गेलेली एक घटना घडली.  चिनी आक्रमणाच्या अनपेक्षित आपत्तीला तोंड देण्यासाठी नेहरूंच्या विनंतीवरून, यशवंतराव चव्हाणांनी संरक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारली.  नेहरूंना त्या वेळी चव्हाणांनी असे सांगितले होते, की एक देशभक्ती सोडली, तर या पदासाठी आवश्यक अशी अन्य कोणतीही विशेष पात्रता त्यांच्याजवळ नाही.  मुंबईहून दिल्लीला जाण्याचा आपला निर्णय कितपत शहाणपणाचा आहे याबद्दलही ते थोडे साशंकच होते.  सुरुवातीच्या काळात तर अनेकदा त्यांना आपले मुंबईतले दिवसच बरे होते असे वाटण्याचे प्रसंग आले.  परंतु संरक्षण व्यवस्थेत उपयुक्त बदल आपण करू शकत आहोत आणि सैन्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आणि अभिमान निर्माण करण्यातही आपल्याला यश येत आहे, ही गोष्ट ध्यानी आल्यावर राष्ट्राच्या सेवेला चव्हाणांनी आपल्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा कालखंड स्थिरबुद्धीने अर्पण केला.  संरक्षणमंत्री म्हणून काम करत असताना 'भारत काय आहे' ही गोष्ट जशी चव्हाणांच्या लक्षात आली; तशीच 'चव्हाण ही काय चीज आहे' ही गोष्टही उभ्या भारताला समजली.  चार वर्षांच्या कारकीर्दीनंतर नोव्हेंबर १९६६ मध्ये खात्याची सूत्रे खाली ठेवताना, तो वियोग त्यांना त्रासदायक वाटला होता.  ते म्हणाले होते, ''तसा मी थोडासा हळवाच आहे.  संरक्षण खात्यातली माझी ही वर्ष अतिशय फलदायी ठरलेली आहेत.''

- चव्हाणांना संरक्षण खात्याबद्दल ही जी ओढ निर्माण झाली होती ती उगीच नव्हे.  खात्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून पहिल्या काही दिवसांतच नेफा, काश्मीर, राजस्थान इ. आघाड्यांना भेटी देऊन सैनिक आणि अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क त्यांनी साधला.  त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्‍न केला.  नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे सेनादलातील अधिकार्‍यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला होता, तो बळकट करायला हवा होता.  एकंदर सर्वच सैन्यात निराशा आणि एक प्रकारची अपमान झाल्याची खंत निर्माण झालेली होती.  सैनिकांच्या प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन, त्यांच्याशी गप्पागोष्टी करून, त्यांच्याबरोबर खाना घेऊन, त्यांच्याशी जवळकी साधण्याचा चव्हाणांनी प्रयत्‍न केला.

- यशवंतरावांना हे खाते तसे नवे होते.  देशाच्या एकंदर संरक्षण स्थितीचा नेमका अंदाज त्यांना करता येईना.  दिल्लीतल्या, संरक्षणाचे डावपेच आखणार्‍या तज्ज्ञांचाही प्रासंगी त्यांना फारसा उपयोग होऊ शकला नाही; कारण या तज्ज्ञ मंडळींनाच चीनची नेमकी उद्दिष्टे कोणती ते लक्षात येत नव्हते.  युद्धबंदीनंतर चीनने केलेल्या काही कृतींचा तर त्यांना अर्थच लागत नव्हता.  उदा. भारतीय सैन्याने माघार घेताना जागेवरच सोडून दिलेली अमेरिकन स्वयंचलित शस्त्रे आणि रशियन हेलिकॉप्टर्स चिन्यांनी गोळा केली; ती साफसूफ केली आणि त्यांची नीट यादी वगैरे करून भारतीयांना परत केली.  या असल्या कृतींनी आपले तज्ज्ञ सतत गोंधळातच पडत होते.  चव्हाणांनी पार्लमेंटमध्ये असे सांगितले होते - ''चीन आज काय करेल, उद्या काय करेल, या आठवड्यात आणि मग त्याच्या पुढच्या आठवड्यात काय करेल ?  एवढाच विचार आम्ही सतत करीत होतो.''

- चव्हाणांच्या असे लक्षात आले की, सैन्यात आणि प्रत्यक्ष संरक्षण मंत्रालयातही तट पडलेले आहेत.  खात्याच्या तांत्रिक पैलूंचा आवाका घेऊन त्यावर प्रभुत्व मिळवायला त्यांना थोडा वेळ लागला.  कारण राज्याचा मुख्यमंत्री म्हणून चव्हाणांना अवगत असलेल्या गोष्टींपेक्षा या खात्यांची परिभाषा, कार्यपद्धती वगैरे गोष्टी अगदीच वेगळ्या होत्या.  ''माझ्यासमोरच्या समस्या वेगळ्या होत्या.  चर्चिल्या जाणार्‍या समस्यांची व्याप्‍ती निराळीच होती, भाषा वेगळी होती आणि शासनपद्धतीही'' असे स्वतः चव्हाणांनीच म्हटले आहे.