यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch ३०

३०. ग्रंथवाचन हा नित्यनेम (राम खांडेकर)

यशवंतरावांनी आपल्यातील अनेक गुणांबरोबर साहित्यिक गुणांची जोपासना केली.  ते गुण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न केले.  साहित्य व साहित्यिकांचा सहवास हा त्यांच्या आयुष्यातील मोठा 'विरंगुळा' होता.  यशवंतरावांवरील जबाबदारीबरोबरच वाढत गेला तो साहित्य-सहवास.

यशवंतरावांना वाचण्याची इतकी आवड निर्माण झाली की रोज १२ ते १५ तास सतत काम केल्यानंतर तास-दीड तास तरी वाचन केल्याशिवाय ते झोपत नसत.  कामाचा शीण घालविण्याचे त्यांचे हे फार महत्त्वाचे साधन होते.  यशवंतरावांना दोन गोष्टींची फार चीड होती.  एक-ते सरकारी काम करण्यास बसले असताना कोणी अडथळा आणला तर व दुसरे वाचन चालू असताना कोणी आले तर.

साधारणतः ते रोज रात्री जेवणानंतर ९-३० च्या सुमारास सरकारी कागद पाहून झाल्यानंतर ते सर्व कागद व्यवस्थित बंद करून नंतर ते पुस्तक हातात घेत.  अर्था घड्याळाकडे लक्ष न देता त्यांचे वाचन चालू असे.  डोळे थकले म्हणजेच वाचन बंद करीत.  हा कालावधी कधी तास-दीड तास, तर कधी त्यापेक्षा जास्त असे.  दिवसाही जशी सवड मिळेल तसे अधूनमधून त्यांचे वाचन चालू असे.  पण कमी.

यशवंरावांची वाचनाची शैली मात्र वेगळीच होती.  ते एकाच वेळी पाच-सहा पुस्तके हाती घ्यायचे व प्रत्येकातील काही पाने वाचायचे.  प्रवासात वाचण्याची पुस्तके व मासिक निराळी असायची.  दिल्लीत आल्यानंतर त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे पुस्तकांचे विषयही अनेक होत गेले.  दर महिन्यात ५-२५ पुस्तके तरी त्यांच्या संग्रही यायची.  पुस्तकांची निवड ते बारकाईने करीत.  दैनिके, साप्‍ताहिके, मासिके यांतील पुस्तकांची यादी व परीक्षणे वाचून ती पुस्तके ते त्यांच्या पत्‍नी सौ. वेणूताईंकडून मागवीत.  दिल्लीत जर पुस्तके मिळाली नाहीत तर मुंबईहून मागवत.  न्यूज वीक व टाइम ही परदेशी मासिके त्यांना फार उपयुक्त वाटायची.

पुस्तके ते मनन करून वाचीत असत.  त्यांनी वाचलेल्या पुस्तकातील मजकूर ते विसरत नसत.  संग्रही असलेल्या पुस्तकाचे व लेखकाचे नाव त्यांच्या लक्षात राहात असे.  मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या आत्मचरित्राचा दुसरा खंड लिहिण्याची तयारी सुरू केली होती.  यासाठी त्यांना संयुक्त महाराष्ट्रावरील ५ पुस्तके हवी होती.  त्यातील 'वाटचाल' लेखक नाना कुंटे व 'दैव देते कर्म नेते' शंकरराव देव ही दोन पुस्तके वाचल्याचे व ती घरात असल्याचे त्यांनी मला सांगितले.  मराठी पुस्तकांची आलमारी व रजिस्टर शोधूनही ही पुस्तके मिळाली नाहीत.  ती पुस्तके घरातच आहेत असा यशवंतरावांना आत्मविश्वास होता.  शेवटी ती पुस्तके त्यांच्या सांगण्याप्रमाणे घरातच मिळाली.  लेखकाने दिलेले पुस्तक उपयोगी आहे की नाही हे न पाहता त्यांच्या भावना लक्षात घेऊन ते संग्रही ठेवावयाचे हा त्यांचा स्वभाव.  कोणतेही पुस्तक रद्दीत द्यायचे नाही असा त्यांचा कडक आदेश.