यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ६१

इंदिरा-पुनरागमन

१९८० च्या प्रारंभी श्रीमती गांधींचा इंदिरा काँग्रेस पक्ष प्रचंड बहुमत मिळवून विजयी झाला.  आणि यशवंतरावांच्या राजकीय जीवनाला पूर्णविराम मिळाला.  त्यानंतर काही काळ विरोधी पक्षात ते राहिले.  पण त्यांचे सर्व सहकारी इंदिरा काँग्रेसला क्रमाक्रमाने जाऊन मिळाले होते.  संघर्षाचा पवित्रा एकाकीपणे चालवण्यात हशील नव्हते.  मानहानी पत्करून यशवंतरावांनी पुन्हा 'स्वगृही' येण्याचा निर्णय घेतला.  श्रीमती गांधी यांनी त्यांना बराच काळ ताटकळत ठेवल्यानंतर पक्षात प्रवेश दिला.  त्यांना आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपद दिले.

पण यशवंतरावांच्या नेतृत्वाला ती पूर्वीची झळाळी पुन्हा कधीच येऊ शकली नाही.  पुनरागमन झालेल्या श्रीमती गांधींच्या नव्या राजकारणात यशवंतरावांसारख्या सात्त्वि व सच्चरित्र नेत्याला काहीही स्थान नव्हते.  संजय गांधींच्या अनुयायांच्या स्वरूपात इंदिरा काँग्रेसला यशदायी ठरलेल्या ज्या नव्या शक्ती सत्तारूढ पक्षात प्रविष्ट झाल्या होत्या, त्यांना यशवंतराव ज्या स्वातंत्र्य-लढ्यातील मूल्यांचे व राष्ट्रसभेच्या परंपरांचे प्रतिनिधित्व करीत होते, त्यांच्याशी काहीही देणे-घेणे नव्हते.  ज्येष्ठांबद्दल आदरभार किंवा मार्गदर्शनाची अपेक्षा या गोष्टींना त्यांच्या राजकीय संस्कृतीत काडीचेही स्थान नव्हते.

यशवंतराव निःशब्द व एकाकी होते.  आयुष्यभर प्रतिकूल परिस्थितीतही टिकवून ठेवलेल्या व त्यांच्या भाषणांमधून ओतप्रोत ओसंडत आलेला आशावाद पराभूत झाल्याचा विषण्ण अनुभव घेत ते दिवस कंठीत होते.  तरीही 'होपिंग अगेन्स्ट होप' म्हणतात, तसे ते मनाची उभारी जुळवीत प्रसंगांना तोंड देतच होते.  

श्रीमती गांधींची हत्या झाली.  महिन्याभरात त्यांच्या वारसदारांनी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.  कराड मतदारसंघातून नामांकन भरण्यासाठी यशवंतरावांनी कंबर कसली...

पण नियतीने त्यांना त्यांच्या मानसिक ओढाताणीतून कायमचे सोडवायचे ठरवले.  अल्पशा आजारानंतर २५ नोव्हेंबर, १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.