यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ९४

पंतप्रधानपदासाठी तुमचा हक्क पहिला असून तुम्ही उभ्या राहणार नसल्यास आपण राहू असे सांगून, यशवंतरावांनी आपली बाजू कमकुवत केल्याची टीका महाराष्ट्रात पुढील काळात होत असे. पण ती गैरमाहितीवर आधारलेली होती. यशवंतरावांनी इंदिरा गांधींना जे सांगितले ते वास्तव परिस्थितीचा विचार करूनच सांगितले होते. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांतील कामराज, अत्युल घोष, स. का. पाटील, निजलिंगप्पा, संजीव रेड्डी यांपैकी कोणीही आपल्याला पाठिंबा देणार नाहीत, हे यशवंतरावांनी ओळखले होते. ज्या मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा जाहीर केला त्यांत वसंतराव नाईक सोडल्यास इतरांचे मत यशवंतरावांना मिळणे अशक्यप्राय होते. याखेरीज खुद्द इंदिरा गांधी पंतप्रधानपद मिळवण्यास राजी नसतील यावर त्यांचा पूर्ण विश्वास नव्हता तसेच नेहरूकन्या म्हणून मतदारांत त्यांना अधिक पाठींबा मिळेल, हे कोणालीही समजण्यासारखे होते.

इंदिरा गांधींच्या मनस्थितीसंबंधात इंदर मल्होत्रा यांचे पुस्क उपयुक्त आहे. त्यांनी लिहिले आहे की, लालबहादूर शास्त्री यांनी इंदिरा गांधी यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले खरे, पण नंतर अनेक वेळा त्यांची उपेक्षा केली. पंतप्रधान झाल्यानंतर लगेच राष्ट्रकुलातील देशांची बैठक लंडनमध्ये होती. शास्त्री आजारी होते म्हणून त्यांनी कृष्णाम्माचारी व इंदिरा गांधी यांना पाठवले. तिथे त्यांना सरदार स्वर्णसिंग यांना परराष्ट्रमंत्री नेमल्याचे वृत्तपत्रांवरून समजले. ही बातमी प्रसिद्धी झाली तेव्हा इंदर मल्होत्रा लंडनमध्ये होते व ते इंदिरा गांधींना भेटले तेव्हा स्वर्णसिंगांबद्दलची बातमी वाचली काय, असा प्रश्न विचारून इंदिरा गांधी रागानेच म्हणाल्या की, आपल्याला हे पद नको होते, पण आपण व कृष्णम्माचारी यांच्याशी विचारविनिमय करायला हरकत नव्हती. नंतर तामिळनाडूमध्ये हिंदीच्या प्रश्नावरून मोठे आंदोलन सुरू झाले तेव्हा इंदिरा गांधी स्वतःहून मद्रासला गेल्या. आंदोलन पेटले असताना शास्त्री वा कामराज यांपैकी कोणीच मद्रासला गेले नाहीत. तथापि शास्त्री यांना इंदिरा गांधींची ही मद्रासभेट पसंत पडली नाही. त्या आपल्या डोक्यावर नाचत असल्याचे ते आपल्या वर्तुळातल्या लोकांशी बोलताना म्हणाले. मल्होत्रा यांनी हा विषय काढला तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या की, त्या केवळ आकाशवाणी खात्याच्या मंत्री नसून नेत्या आहेत. हे सरकार फार काळ टिकेल असे तुम्हांला वाटते काय? असा इंदिरा गांधींचा प्रश्न होता. पुन्हा असे काही घडले तर आपण असेच वागू, असेही त्या म्हणाल्या. लालबहादूर शास्त्री यांना इंदिरा गांधीबद्दल आत्मीयता नव्हती तशीच, इंदिरा गांधींना शास्त्री यांच्याबद्दल नव्हती. यासंबंधी यशवंतरावांना आलेला अनुभव त्यांनी मला सांगितला होता. तो होता शास्त्री यांच्या वाढदिवसाच्या वेळचा. वाढदिवसाच्या निमित्ताने लालबहादूर यांच्या निवासस्थानी मंत्री, खासदार व इतर अनेक लोक यांनी हारतुरे व मिठाई वगैरे आणून बरीच गर्दी केली होती. यशवंतराव गेले तेहा इंदिरा गांधी एका बाजूला एकट्याच उभ्या असलेल्या दिसल्या म्हणून ते त्यांच्यापाशी गेले. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या हे सर्व अधिकारपदामुळे चालू आहे. पण ते किती काळ चालणार?

पाकिस्तानने घुसखोरी नंतर सैन्य काश्मीरमध्ये धाडले तेव्हा इंदिरा गांधी काश्मीरमध्ये गेल्या व आपल्या सैनिकांना भेटल्या. त्यांचे मोठे स्वागत झाले. मग परतल्यावर त्यांनी एक टिपण लिहून शास्त्रींना दिले. यासंबंधात त्यांनी मल्होत्रांना सांगितले की, शास्त्री यांनी ते हातात घेतले आणि याचे काय करायचे असे त्यांचे सचिव धर्मवीर यांना विचारले. धर्मवीर म्हणाले, आपल्याकडे ते द्यावे. पुढे शिखांच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी शास्त्री यांनी मंत्र्यांची एक समिती नेमली व इंदिरा गांधींना तिचे अध्यक्ष केले. समितीचा अहवाल लिहिण्यापूर्वी पंतप्रधानांना त्याची कल्पना देऊन काही सूचना असल्यास विचारावे म्हणून इंदिरा गांधींनी मागितलेली भेट मिळाली नाही आणि मिळाली तेव्हा कृष्णम्माचारी यांना शास्त्री यांनी त्याच वेळी बोलावल्यामुळे इंदिरा गांधी घरी परतल्या. (इंदिरा गांधी, ए पर्सनल अँन्ड पोलिटिकल बायोग्राफी, पुष्ठे ८२-३)

इंदिरा गांधी पंतप्रधानपदावर असताना लेले यांनी मुलाखत घेतली असता त्या म्हणाल्या, की ६५ सालचे युद्ध हे शास्त्रीचे युद्ध मानले गेले असेल, पण त्या युद्धाचे काही वाईट परिणामही झाले. या त्यांच्या विधानाबाबत लेले यांनी यशवंतरावांचे मत विचारले तेव्हा ते म्हणाले की, युद्ध शास्त्री यांनी सुरू केले नाही. ते आपल्यावर लादले गेले होते आणि प्रत्येक युद्धाचे बरे व वाईट परिणाम देशावर होतात. तसे ते ६५च्या युद्धाचेही झाले.