यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १५-२५८२०१२

पत्र - १५
दिनांक २५-०८-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

माझे लहानपण संपूर्णपणे खेड्यात गेले.  आम्ही पोटासाठी गावोगाव हिंडत होतो.  त्यातला मी एक.  लिहिता-वाचता येईल एवढेच शिकवण्याचे ठरवून, गावोगावच्या मास्तर लोकांच्या हातापाया पडून वडिलांनी मला वाचण्या-लिहिण्यापुरते शिकवले.  मी शेकडो शाळांमध्ये माझ्या प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले.  माझा पिंड पोसला तो या खेड्यांमध्ये.  फलटणला होतो तरी माझी पक्की नाळ जोडली होती ती गावाशिवाशी.  वाढलो फक्त गावकरी संस्कारात हे मला कबूल केले पाहिजे.  मी मॅट्रिक झालो.  एस.एस.सी. पास झालो.  पुढच्या शिक्षणासाठी आता योग्य शहरात जावे लागणार.  फलटणला महाविद्यालय होते.  तिथे माझे निभणार नव्हते.  तिथे लेबर स्कीम नव्हती.  मला तर हाताने काम केल्याशिवाय पुढचे शिक्षण घेता येणार नव्हते.  त्यावेळी भटक्या-विमुक्तांना कसल्याच सवलती नव्हत्या.  फक्त बाराशे रुपयांच्या आतल्या उत्पन्नाची आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाची सवलत.  आणि अशा जातवार काही सवलती असतात याचे भानही नव्हते.  मिळेल ते काम करायचे आणि शिकायचे.  शिकण्यासाठी काम करायचे.  मला लेबर स्कीममध्ये प्रवेश हवा होता.  तो कोल्हापूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात मिळाला.  तो सारा प्रसंग इथे सांगणे अप्रस्तुत आहे.  पण मन फार व्यथित होते ते मला आता माझे खेडे अंतरणार, मी मोठ्या शहरात जाणार या कल्पनेने.  

ज्या खेड्यात मी काळ कंठला ते काही माझे नव्हते.  त्यात माझे काहीच नव्हते.  घरदार, शेतीवाडी, शिवार काहीच नव्हते.  तरी ते माझे होते.  खेडणे म्हणजे जमीन कसणे, आणि खेडू म्हणजे जमीन कसणारा.  जमीन कसणारा तो खेडूत.  खेडूची जी वस्ती म्हणजे खेडे.  गावगाडा, गावकी, गावमुकादम, गावपंचायत, भावकी, भाऊबंदकी, कोणतेही गाव असू दे.  त्याला दोन भागांत वाटलेले असते.  मध्ये पांढरी आणि भोवताली काळी.  या पांढरीत गावची वस्ती असते.  बहुतेक गावाला तटबंदी असायची ती आता मोडकळीस आली आहे.  पण तिला वेस म्हणत.  ही वेस म्हणजे गावचा कडेकोट बंदोबस्त.  गावची वेस म्हणजे गावकूस.  या वेशीच्या बाहेर राहणारे एक अस्पृश्यांचे गाव आणि गावात राहणारे स्पृश्यांचे गाव.  या अस्पृश्यांच्याही पलीकडे आम्ही लोक हागणदारीत किंवा माळावर पाले ठोकून राहणार.  हे तात्पुरते वसलेले तिसरे गाव.  या गावाला आम्ही 'जातगाव' म्हणत असू.  वेशीच्या आतले लोक मेलेली जनावरे खात नाहीत.  ते त्याला माती म्हणतात.  तर वेशीबाहेरचे लोक मेलेल्या जनावरांना फाडून भाजी म्हणून खात असत.  आम्हा लोकांना गावातले लोक त्यामुळे शिवून घेत नव्हते.  अभक्ष्य भक्षण हा अस्पृश्यतेचा एक निकष घटनेने मान्य केला आहे.  हे मृतमांस खाणार्‍या जाती म्हणजे महार, मांग, गावकुसाबाहेर बाहेर बंजारा, वडार, कैकाडी, फासेपारधी.  या जंगली जातीची पाले माळावर.  म्हणजे, एक गाव एक नसतो, तो तीन ठिकाणी वाटलेला असतो.  एक शेती करणार्‍यांचे सुवर्ण गाव.  एक अस्पृश्यांचा गाव तर एक फिरस्त्यांचा गाव.  अशी तीनतीन गावे मिळून एक गाव.  पुन्हा जातींची घरे विस्कटलेली नसतात.  घरांची रचना जातवार असते.  जातींची घरे सलग असतात.  माळीआळी, सुतारआळी, कोळीवाडा, रामोसवाडा, महारवाडा, मांगवाडा, भिलाटी अशी नावे असतात.  भिल्ल कोळी, रामोशी, कैकाडी, वडार, पारधी, या जमातींना गावगाडाकार अत्रे 'तुफानी जाती' असा मार्मिक शब्द वापरतात.  तुफानी म्हणजे जंगल पहाडातून आलेले आक्रमक लोक.  म्हणून या जाती गुन्हेगार जाती !  लूटमार, चोरी, दरोडे, एवढेच नव्हे; जे जे नीतीबाह्य, ते ते या लोकांनी करावे अशी रचना.  जे अस्पृश्य गोमांस किंवा पड खात नाहीत अशा ढोर, चांभार, भंगी यांची वस्ती एक तर गावकुसाच्या आत गावाच्या शेवटी किंवा गावकुसाबाहेर अगदी गावाला खेटून.  अस्पृश्य, भटके-विमुक्त यांच्या वस्त्या गावकुसाबाहेर पूर्व दिशेला.  वारा पश्चिमेकडून वाहतो ना ?  म्हणून कोणत्याही गावात अस्पृश्य जातींची वस्ती गावाच्या पूर्वेला असते.  गावाला शुद्ध हवा हवी.

सुप्रिया, मेलेले ढोर ओढणे म्हणजे काय असते, हे ते ओढल्याशिवाय कसे कळावे.'   जनावरे ओढणे, ती फाडणे, मांस वाटून घेणे, ओले मांस वाळवत ठेवणे-दोर्‍या बांधून ते वाळवायचे.  त्या चाण्या वाळलेल्या मांसाचे तुकडे करायचे.  त्या बोट्या बोट्या घागरीत भरून उतरंडीला लावायच्या.  पावसाळ्याच्या दिवसांत त्या सुगडात शिजवून पोट भरायचे.  बदल्यात येस्कराचे काम करायचे.  महारालाच येस्कर म्हणतात.  महार गावचा वतनदार असे इरावती कर्वे या समाजशास्त्रज्ञ म्हणतात.  महार ही महाराष्ट्राची खूण.  जिथवर महार, तिथवर महाराष्ट्र.  एकही गाव असा नाही, जिथे महार नाही.  महाराष्ट्र हे महार राष्ट्र आहे.  हे महारांचे राज्य आहे.  बाकी सारे विस्थापित.  त्यांचा पराभव कसा झाला याचा इतिहास उपलब्ध नाही.  तो इतिहास तुला मुळातून वाचावा लागेल.