सह्याद्रीचे वारे - ४८

विकासाचा विचार करतांना ज्या क्षेत्रांमध्यें, ज्या भागामध्यें, ज्या प्रदेशामध्यें विकास करावयाचा आहे, त्यांच्या दृष्टीनें विकासाचा विचार व्हावयास पाहिजेच. परंतु त्याचबरोबर ज्या गोष्टींचा आपणांस विकास करावयाचा आहे तो कोणत्या हेतूनें करावयाचा आहे, याचाहि विचार योजनेच्या विचारांमध्ये व्हावयास पाहिजे.

हा जो दुसरा विचार आहे तो गेल्या पांचदहा वर्षांमध्यें प्रामुख्यानें डोळ्यापुढें येऊं शकला नाहीं, आजपर्यंत आला नाहीं, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून योजनेच्या विचारामध्यें प्रादेशिक विकासाचेंच अंग असतें असा समज निर्माण झाला. त्यामुळें मी असें पाहत आहें की, योजनांचा विचार करणा-या माणसांच्या मनामध्येंहि या विचारालाच हल्लीं जास्त प्राधान्य येऊं लागलें आहे.

कोणत्याही राज्यामध्यें उत्पादनाची जी वाढ होते, जे उद्योगधंदें निघतात त्यांचा विचार करून त्या राज्याच्या विकासाची प्रगति सरासरीच्या पद्धतीनें दाखविण्याचा एक मार्ग आहे. परंतु हा वाढलेला विकास त्या राज्यांतील सर्व प्रदेशांत किती पोहोंचला ह्याहि विचाराला सध्यां प्राधान्य  मिळत आहे. एवढेंच नव्हे तर प्रदेशांमध्यें विकासाचा हा विचार पोहोंचल्यानंतर समाजाच्या निरनिराळ्या थरांत हा वाढलेला विकास कोठवर जाऊन पोहोंचला, हाहि विचार आतां महत्त्वाचा होऊं लागला आहे. आणि म्हणूनच कोंकणच्या विकासाचा प्रश्न कांहींसा दुखावलेला प्रश्न आहे असें जें मीं म्हटलें, त्याच्या पाठीमागें कांहीं अंशीं हें कारण आहे. या प्रश्नाची ऐतिहासिक मीमांसा थोडीफार करतां येईल, पण मी त्या मीमांसेंत जाणार नाही. आपणहि गेलां नाहींत तरी चालेल असें मला वाटतें.

माझ्या दृष्टीनें, ज्या प्रदेशाचा विकास करावयाचा असतो त्या प्रदेशांतल्या कांहीं बाबींचा विचार करणें आवश्यक असतें. त्याशिवाय त्या प्रदेशाच्या विकासाचा आपणांस विचार करतां येणार नाहीं. निसर्गानें त्या प्रदेशाला दिलेलें मनुष्यबळ आणि इतर साधनसामुग्री या दोन्हींचा विकासाच्या प्रश्नांत प्रामुख्यानें विचार करावयास पाहिजे. या दृष्टीनें कोंकणच्या विकासाचा विचार करतां कोंकण ही एक भाग्यवान भूमि आहे असें मला वाटतें. कांहीं बाबतींत निसर्गानें त्याच्यावर अन्याय केला आहे असें आपणांस सकृद्दर्शनीं वाटतें. पण ज्या बाबतींत हा अन्याय झाला आहे असें आपल्याला वाटतें, त्याच बाबी कोंकणच्या फायद्याचीं आणि शोभेची स्थानें ठरलीं आहेत असा आतांपर्यंतचा अनुभव आहे.

कोंकणचें पहिलें महत्त्वाचें साधन म्हणजे कोंकणचीं माणसें असें मी मानतों. कोंकणामध्यें कर्तबगार, बुद्धिमान असें मनुष्यबळ आहे, पण त्याला आपल्या बुद्धिमत्तेचें व कर्तृत्वाचें पाणी दाखविण्याकरितां कोंकणची सरहद्द ओलांडावी लागते ही गोष्ट कांहींशी खरी आहे. परंतु विकासाच्या कुठल्याहि योजनेमध्यें माणूस हा अतिशय महत्त्वाचा भाग आपण मानला पाहिजे. कारण विकास हा जरी विकासाचीं साधनें निर्माण करण्यामुळें मुख्यतः होत असला तरी त्या साधनांचा वापर करणारा जो मनुष्य आहे त्याचा विकास हीच योजनेंतील शेवटीं फार महत्त्वाची गोष्ट असते.