मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४५-२

यशवंतराव सभागृहात उपस्थित होते. शेवटी त्यांना उद्देशून मी दोन काव्यपंक्ती उच्चारल्या- अगदी उत्स्फूर्त. राजकीय भाषणात कविताबिविता आणणे व्यक्तिश: मला मुळीच आवडत नाही. पण त्या दिवशी त्या दोन ओळी आल्या. अंतरीचे ते स्वभावे बाहेरी प्रकटले. मी म्हणालो, ‘‘यशवंतराव, जा सुखेनैव जा.

उभा देश आहे तुझा पाठिराखा.
तुझी कीर्त वाढो जशी चंद्ररेखा’’

या उत्स्फूर्तर्त पंक्तीच्या रचनेवर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजमुद्रेची उघड छाप आहे. ‘‘प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णु’’चाच अनुवाद तिच्यात उमटला आहे. पण ते साहजिकच नव्हे का? शिवाजीनंतर, शिवाजीच्या लोकसंग्राहकवृत्तीचा आणि दूरदृष्टी सुजाणपणाचा साक्षात्कार यशवंतराव याच राज्यकर्ताच्या ठिकाणी जाणवला. स्वत: यशवंतरावांना त्यांनी कुणी शिवाजीची-लोकमान्यांची पदवी दिलेली आवडत नाही. नम्रता हाही एक दुर्मिळ सद्गुण त्यांच्या ठायी आहे.

एका जन्मात यशवंतरावांनी खूप कमाई केली. इकडची दुनिया तिकडे करून टाकली.

दादा कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या काळातील घटना. मी माझ्या खेड्याकडे निघालो होतो. एस.टी.बसने निघालो होतो. गाडी विटे गावातून जाणार होती. गावाबाहेर गर्दी दिसली. तोरणे उभारलेली दिसली. गाड्या लागलेल्या दिसल्या.

‘‘काय आहे?’’ मी चौकशी केली.
‘‘समारंभ.’’
‘‘कसला?’’
‘‘कॉलेजचं उद्घाटन आहे.’’

कॉलेज-आणि आमच्या विट्याला? माझा आनंद उरी भावेना. गर्दीमुळे थांबलेल्या एस.टी. गाडीतून मी माझी बॅग घेऊन उतरलो. निमंत्रणावाचूनच त्या समारंभात सामील होण्यात मला संतोष होता. प्रथमदर्शनीच सोनेरी रंगात लिहिलेले कॉलेजचे अभिधान वाचले- ‘‘बळवंतराव चव्हाण कॉलेज.’’

वा: ! पुत्र व्हावा ऐसा गुंडा!
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !

बिचा-या बळवतरावांच्या पदरी पाच-सात बुके तरी पडली होती की नाही, कुणास ठाऊक. आपल्या मुलांना कसे शिकवावे या चिंतेने त्यांना भाकर गोड लागली नसेल. आज एक महाविद्यालयाला त्यांचे नाव दिले जात होते मुलाच्या कर्तृत्वामुळे कृण्या कोट्याधीशांच्या नावांनी महाविद्यालये ओळखली जात असतील, तर गरीब शेतक-याचे नाव मिरवणारे हे पहिलेच कॉलेज असेल.

यशवंतरावांच्या मातु:श्रींच्या नावानेही काही संस्था ओळखल्या जातात. ती केवढी कमाई? मी कमाई म्हणतो ही मंत्रिपदे आणि अधिकाराच्या जागा लाभलेल्या महाभागांनी आणखी काही कमावले धन मिळवले, दौलत मिळवली. यशवंतरावांनी मिळवले ते फार थोड्यांना मिळवता आले. व्यक्तिगत चारित्र्याच्या बडिवार आजकाल बड्याबड्यांना राहिलेला नाही. तळे राखणारा पाणी चाखणारच, हा लोकोक्तीतील सिद्धान्त आता सर्वसामान्य झाला आहे. यशवंतराव मात्र या वाटांना वळलें नाहीत.  आज सा-या देशाची संपत्ती हाताळणा-या या माणसाचे कराड येथील निवासस्थान कुणी आवर्जून जाऊन पहावे. इंग्रजांच्या जमान्यातील मामलेदारदेखील याहून चांगली बंगली बांधता !

राजकारणाच्या धकाधकीत त्यांचा वाचनाचा व्यासंग सुटलेला नाही. ते केव्हा वाचतात, देव जाणे. गाठीभेटीत संदर्भ निघतात तेव्हा नवल वाटते ते त्यांच्या वाचनाचे आणि स्मरणशक्तीचे.

आपल्या सहका-याविषयी तर त्यांच्या मनी प्रेम आहेच, पण माझ्यासारख्या अनेक साहित्यिकांचा सहवास त्यांना फार प्रिय वाटतो. उत्तम चित्र, उत्तम कविता, उत्तम नाटक यांचा रसास्वाद घेताना अजूनही त्यांना वेळेचा विसर पडतो.