मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११३

११३ - सुसंस्कारित मराठी नेता – श्री. गोविंद तळवलकर

यशवंतरावांनी राजकारणात प्रवेश केला तो विशिष्ट संस्कार घेऊन, त्यांनी व्यासंगाने आपल्या मनाची मशागत केली. मॅट्रिक होण्यापूर्वी स्वातंत्र्य चळवळीने व सामाजिक जीवनाने ते आकर्षित झाले होते. म्हणून जतीनदासांनी उपोषण करून मृत्यू कवटाळला तेव्हा दु:खी होऊन ज्यांनी त्या वेळी उत्स्फूर्तर्तपणे उपवास केला त्यात यशवंतराव होते. मॅट्रिकला असतानाच कराडात हरिजनांसाठी रात्रीची शाळा सुरू करण्यात पुढाकार घेणा-या यशवंतरावांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना उद्घाटनासाठी आमंत्रण देण्याचे सुचले. पुढे अनेक दशकांनंतर त्यांनी पुणे विद्यापीठात विठ्ठल रामजींवर मार्मिक भाषणही केले ते त्यांच्या वाचनाची फलश्रुती म्हणून. कारावासात माक्र्सवाद, इतिहास याबरोबरच टागोर आणि कालिदास यांच्या वाङ्मयाचे वाचन झाले. या कामी ह.रा.महाजनी, आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन इत्यादींचे साहाय्य त्यांना मिळाले होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित झालेल्या यशवंतरावांच्या मनावर वास्तविक वडील बंधूंचे सत्यशोधक समाजाच्या राजकारणाचे व सामाजिक विचारांचे परिणाम व्हावयाचे. पण ते त्यापासून दूर राहून राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. तेथेही गांधींचा प्रभाव मान्य करूनसुद्धा त्यांच्यावर माक्र्सवादी विचारांचा पगडा बसला. तुरूंंगातून बाहेर पडल्यावर ते जवळपास कम्युनिस्ट पक्षात जाणार होते ! आणि तसे नसते तर रॉयिस्ट पंथ त्यांनी स्वीकारला असता, पण राष्ट्रीय चळवळीला अग्रक्रम असून ती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच करू शकते ही यशवंतरावांची पक्की समजूत होती. आधुनिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक विचारांचा मागोवा घेतल्यामुळे गांधीवादी कर्मकांडात यशवंतराव सापडले नाहीत आणि स्वातंत्र्यवीर गांधीवादी कर्मकांडात यशवंतराव सापडले नाहीत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्याचे महत्त्व त्यांना कमी वाटले नाही. म्हणून रत्नागिरीला जाऊन त्यांनी सावरकरांची भेट घेतली. पक्षाच्या वा पंथाच्या भिंती स्वत:भोवती उभ्या न केल्याने पुढे सत्तेवर असताना व नसताना यशवंतराव अनेकविध पक्षांच्या, मतपंथाच्या लोकांत, सहजपणे मिसळत. कारावासात असताना जशी वाचन व चर्चा याद्वारे यशवंतरावांनी आपल्या मनाची मशागत केली होती त्याचप्रमाणे महाविद्यालयातल्याप्रमाणेच अखेरपर्यंत त्यांचे ग्रंथप्रेम कमी झाले नाही. म्हणून मराठी व इंग्रजी पुस्तके ते आवडीने घेत व चोखंदळपणे वाचीत. परदेशात जात तेव्हाही पुस्तकाच्या दुकानात वेळ घालवून खरेदी केल्याशिवाय ते परत येत नसत.

तरूणपणी कराडहून कोल्हापूरला जाऊन पिटात बसून त्यांनी नाटके पाहिली. म्हैसूरकर महाराज, भागवतबुवा, बाबा आळतेकर यांची संगीत भजने व औंधच्या दाजी गुरवाचा पखवाज ऐकण्यात अनेक रात्री घालविल्या.

गडक-यांच्या नाटकातले संवाद त्यांनी पाठ केले होते आणि ‘‘राजसंन्यास’’ हे तर त्यांचे आवडते नाटक होते. रशियाला गेल्यावर मॉस्कोपासून काही अंतरावर असलेल्या टॉलस्टॉय यांच्या यस्नापलाना या निवासस्थानाला भेट देण्यास यशवंतराव विसरले नव्हते. तेथील शांतता व घनदाट वृक्षराजी पाहिल्यावर सोन्याच्या पिंपळाखाली ज्ञानदेवांनी ज्ञानसाधनेस बसावे असे ते ठिकाण असल्याची यशवंतरावांची भावना झाली. रॉय जेन्किन्स हे एक काळ ब्रिटिश मजूर पक्षाच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आता ते सोशल डेमोव्रॅâटिक पक्षात आहेत. जेकिन्स हे चांगले लेखक. त्यांनी अॅस्क्विथ यांचे सुंदर चरित्र लिहिले आहे. ते यशवंतरावांनी वाचले होते व लंडनला गेल्यावर त्यांनी जेकिन्स यांची मुद्दाम भेट घेतली. स्वत:च्या मनाची मशागत त्यांनी अशी केली होती. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होते त्याचप्रमाणे स्वाभाविक आवडही होती. यामुळे त्यांचे लेखन व भाषण मोजके व अनेकदा मार्मिक असे.

स्वातंत्र्याबरोबरच यशवंतरावांचा प्रवास दीर्घकाळ सत्ताधारी या नात्याने झाला. पूर्वीच्या मुंबई राज्यात पार्लमेंटरी सेक्रेटरी या पदाचेपासून ते दिल्लीत निरनिराळ्या खात्याचे मंत्री झाले. द्विभाषिकाचे मुख्यमंत्रिपद, दिल्लीत संरक्षण व नंतर गृहमंत्रिपद ही पदे यशवंतरावांना मिळाली तेव्हा अगोदर त्या स्थानांवर असलेल्या व्यक्तींनी निर्माण केलेल्या परिस्थितीची पाश्र्वभूमी मिळाली होती. त्यामुळे यशवंतरावांची कारकीर्द अधिकच उजळून निघाली. ते द्विभाषिकाचे मुख्यमंत्री झाले. तत्पूर्वी मोरारजीभार्इंच्या एकांगी भूमिकेने लोकांची मने दुखावली होती. यशवंतरावांनी बंदुकीच्या जोरावर द्विभाषिक न राबविण्याचे ठरविले. त्यानंतरही ते चालणे शक्य नाही हे दाखवून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी मांडली. ती मान्य झाली. समितीच्या चळवळीचा रेटा, लोकमताचा दणका यांना यशवंतरावांच्या कारभाराची जोड मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा मराठी मनाला नव्या आशेची पालवी फुटली. यामुळेच कुसुमाग्रजांसारख्या कवीने घोषणा केली......