शब्दाचे सामर्थ्य ७२

गांधीजींनी चळवळीच्या तंत्रामध्ये क्रांती केली. त्यांनी प्रत्येकाकडून कृतीची अपेक्षा केली व प्रत्येकाला जमेल व साधेल, अशी कृतीची साधना त्याला सांगितली. त्यामुळे गांधीजींच्या चळवळीत शिक्षित - अशिक्षित हा भेदच नष्ट झाला. किंबहुना शिक्षित व्यक्तीने कोणताही अहंगंड बाळगू नये, यावर गांधीजींनी भर द्यायला सुरुवात केली. पोशाखातला थाट, इंग्रजी भाषेचा वापर, राहणीमानाचा दर्जा, इत्यादी ज्या गोष्टी सुधारणेची लक्षणे बनत होती, त्यांना गांधींनी कटाक्षाने रजा दिली. स्वतः ते इतका साधा पोशाख घालू लागले की, बॅरिस्टर असून, ते एखाद्या शेतक-याप्रमाणे पोशाख घालत. या गोष्टीमुळे गांधी व बहुजनसमाज यांच्यांतील अंतर एकदम कमी झाले. पुढे तर ते पंचाच नेसू लागले व त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, ‘भारतातील कोट्यवधी दरिद्री बांधवांच्या हृदयाचे दार त्यांना सताड उघडले गेले.’ बहुजन-समाजात व तत्कालीन राजकारणी माणसात जी दुर्लंघ्य दरी होती, ती एकदम बुजवली गेली. १९२२ साली त्यांच्यावर अहमदाबादच्या कोर्टात जो खटला झाला, त्या वेळी त्यांनी आपला व्यवसाय कोणता, हे सांगताना‘मी शेतकरी व विणकरी आहे’ असे उत्तर दिले. त्या वेळी सारा भारत या उत्तराने त्यांच्याकडे खेचला गेला. भारतात परतल्यापासून गांधीजी कधीही शहरात एखादे घर घेऊन व ऑफिस थाटून राहिले नाहीत. ‘माझा भारत खेड्यात राहतो व मीही खेड्यात राहणार’, असे ते म्हणाले.

या सा-या गोष्टींचा बहुजन समाजावर फार खोल परिणाम झाला, असे मला निश्चितपणे वाटते. त्यांच्या चळवळीमुळे महाराष्ट्राचा ग्रामीण भाग ढवळून निघाला, यात मुळीच शंका नाही.

गांधींच्या विचारांचा स्वीकार करण्यासंबंधी महाराष्ट्रातील शिक्षित समाजात त्या वेळी गट पडले होते, असे दिसून येते. टिळकांच्या पक्षातील काही मंडळी गांधींकडे खेचली गेली. शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडिलकर, गंगाधरपंत देशपांडे, इत्यादी मंडळींनी असे मानले, की गांधीजींचे नेतृत्व हे टिळकांच्या कार्याची पूर्तता आहे. परंतु सर्वसामान्यपणे असे चित्र दिसते की, १९२० ते १९३० या दशकात महाराष्ट्रात गांधीजींना विरोध करणारी पिढीच शिक्षित समाजात अग्रभागी होती. काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव, अप्पासाहेब पटवर्धन, इत्यादी मंडळींना फार प्रतिकूल परिस्थितीत कार्य करावे लागत होते.

१९३० च्या दांडीयात्रेनंतर मात्र हे चित्र बदलू लागल्याचे दिसले. एक अशी नवी पिढी महाराष्ट्रात वर येत होती, की जिचे मन गांधीजींच्या क्रांतिकारक कल्पनांनी भारावले होते. या पिढीला गांधी-विचारांचे व तत्त्वज्ञानाचे मर्म उलगडून सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या वेळी विनोबा भावे, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, काकासाहेब कालेलकर, दादासाहेब धर्माधिकारी, आदी मंडळी करीत होती व त्यात त्यांना बरेच यश आले, असे म्हणावे लागेल.

१९२९-३० नंतरच्या प्रत्येक सत्याग्रहात महाराष्ट्रात जे चैतन्य संचारत होते, ते कल्पनातीत होते. भारतातील इतर प्रांतांत गांधीजींसंबंधी जेवढे प्रेम, आदर असेल, तेवढाच त्या काळात महाराष्ट्रात निर्माण झाला होता, असे मी निश्चितपणे म्हणू शकतो. ज्या उत्कटतेने सारा देश त्यांच्या कार्यक्रमात व चळवळींमध्ये सामील होत होता, तीच उत्कटता महाराष्ट्रात दिसत होती. विशेषतः, महाराष्ट्रातील बहुजन समाजावर गांधीजींचा जो परिणाम झाला, तो अभूतपूर्वच होता. मी प्रत्यक्ष या गोष्टी पाहिल्या आहेत. ‘महात्मा गांधी की जय’ या गजराने गावेच्या गावे स्वातंत्र्याच्या भावनेने उद्दीपित होत असत. जात, धर्म, गरिबी-श्रीमंती, इत्यादी भेद लुप्त होऊन जात असत. गांधी हा एक सर्वश्रेष्ठ संतपुरुष आहे, अशी भावना सर्वांमध्ये निर्माण होत असे. गांधीजी ज्या प्रकारच्या त्यागाची अपेक्षा करतील, तो त्याग करण्यास हजारो माणसे पुढे येत असत.