शब्दाचे सामर्थ्य ७०

व्यक्ती

१५

महात्मा गांधी

महात्मा गांधींच्या जीवनाचा व विचारांचा परिणाम महाराष्ट्रावर किती झाला, असा प्रश्न काही वेळा विचारण्यात येतो. परप्रांतीय मित्रमंडळी अथवा परदेशी अभ्यासक जेव्हा हा प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांच्या मनांत तुलनात्मक दृष्टी असण्याचा संभव असतो. भारताच्या इतर प्रदेशांवर गांधी-जीवन व गांधी-विचार यांचा परिणाम किती कमी-अधिक प्रमाणात झाला, त्याचा संदर्भ त्यांच्या मनांमध्ये असण्याची शक्यता असते; परंतु अशी तुलना करून पाहणे फारसे इष्टही नाही व शक्यही नाही, असे माझे मत आहे. कारण महात्मा गांधी जेव्हा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर अवतरले, तेव्हा प्रत्येक प्रांताची पार्श्वभूमी वेगवेगळी होती. त्या संदर्भातच त्या त्या प्रांतावर गांधीयुगाचा किती व कसा परिणाम झाला, हे अजमावावे लागेल, ही गोष्ट सोपी नाही. म्हणूनच महाराष्ट्राच्या बाहेरच्या किंवा महाराष्ट्रातील मंडळींनी गांधी व महाराष्ट्र असा प्रश्न उपस्थित केला, की मी त्यासंबंधी, तुलनेचा विचार सोडून देऊन, महाराष्ट्रापुरते मला काय वाटते, काय जाणवते, तेवढेच सांगतो.

लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या सुमारे पाच वर्षे आधी गांधीजींनी भारतातील आपल्या कार्याची सुरुवात केली. तो काळ असा होती की, टिळक हेच भारताचे सर्वसामान्य लोकमान्य दैवत होते. मंडालेच्या सहा वर्षांच्या कारावासानंतर ते नुकतेच परत आले होते. बदललेल्या परिस्थितीचा शोध घेत होते. जागतिक स्वरूपाचे असे हे पहिलेच युद्ध होते. युद्ध सुरू होऊन दोन-तीन महिने होतात, तोच गांधी आफ्रिकेहून भारतात येऊन पोहोचले. आफ्रिकेत बावीस वर्षे राहून आणि जगातील विचारवंतांचे व मुत्सद्द्यांचे लक्ष खेचून घेईल, अशा अभिनव स्वरूपाचे क्रांतिकारक कार्य करून, गांधी भारतामध्ये कायमचे राहण्यासाठी आले होते. नामदार गोखले यांच्या सूचनेवरून, काहीशा आग्रहावरून, त्यांनी आफ्रिकेतील कार्याची अखेर केली होती व यापुढे भारत हीच आपली कर्मभूमी करावयाची, असा संकल्प त्यांनी केला होता. मात्र, ज्या गोखल्यांच्या सूचनेवरून ते भारतामध्ये आले, त्यांच्या निधनाची वार्ता त्यांना महिन्या-दीड महिन्यात ऐकावी लागली.‘गांधी व महाराष्ट्र’ यांच्यांत जो एक दुवा नियतीने निर्माण केला होता, तो गोखले यांच्या निधनामुळे एकाएकी निखळला.

१९१५ ते १९२० हा भारतीय राजकारणातला फार महत्त्वपूर्ण घडामोडींचा काळ आहे. गांधीजींचा उदय ह्या काळात व्हावा, ही गोष्ट फार अर्थपूर्ण आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्यप्राप्तीचा जो रस्ता दाखविला होता व जो वर्ग जागृत केला होता, त्यापेक्षाही पुढचे पाऊल टाकण्यासाठी गांधीजी सज्ज होत होते. १९१७ मधील चंपारण्याचा लढा हे एक उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. हा लढा देण्यासाठी गांधीजींशिवाय कोणताही नेता त्या काळात पुढे येणे शक्य नव्हते.

एका सामान्य शेतक-याच्या निमंत्रणावरून गांधीजी तेथे गेले. खेडुतांमध्ये मिसळले. आफ्रिकेत आपल्याला ज्या तंत्राचा शोध लागला होता, त्या सत्याग्रहाच्या अस्त्राचा वापर करण्याची त्यांनी तयारी केली. इंग्रज अधिका-यांजवळ व गो-या शेतमालकांजवळ त्यांनी बोलणी केली. आत्मक्लेशाची सारी सारी सिद्धता केली... अन् काहीतरी चमत्कार झाला. इंग्रज कलेक्टरने माघार घेतली व गांधीजींचा विजय झाला. परंतु त्यातूनच गांधीजींच्या विधायक कार्याची सुरुवात झाली. आपल्या आश्रमातील अनेक मंडळी ते तेथे घेऊन गेले. कस्तुरबा गेल्या. इतर स्त्रियाही गावक-यांच्या शिक्षणासाठी, सेवेसाठी गेल्या. प्रगतीसाठी नव्या त-हेच्या चळवळीची मुहूर्तमेढ रचण्यात आली.