शब्दाचे सामर्थ्य ५१

भारत हा काहीतरी, धार्मिक, पारलौकिक गोष्टींचा विचार करणारा, अध्यात्मवादी देश आहे, अशी काही अस्पष्ट कल्पना अजूनही ब-याच पाश्चात्त्यांच्या मनांत घर करून आहे. हा एक प्राचीन संस्कृतीचा देश आहे, अशी कल्पना आहे. आधुनिक भारताच्या आर्थिक, वैज्ञानिक कर्तृत्वाची माहिती तुलनेने त्यांना कमीच आहे. आधुनिक भारताच्या जीवनाची माहिती देण्याचा आमचा सतत प्रयत्‍न सुरू आहे. भारत आणि मेक्सिको, जमेकासारखे लांबचे देश यांतील मोठे अंतर ही एक अडचण जाणवते. परंतु तरीही आमच्यासारखे भारतीय तेथे पोहोचतात, तेव्हा नव्या भारताची, स्वतंत्र भारताची माहिती मिळते. या पुढच्या काळात व्यापारी, आर्थिक व्यवहार ज्या प्रमाणात वाढतील, त्या प्रमाणात हे अंतर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. कॅरेबियन देशांत आणि मेक्सिकोसारख्या ठिकाणी लोकांनी गांधी-नेहरू यांचे पुतळे उभारले आहेत. या नेत्यांनी स्वातंत्र्याचे विचार दिले, त्याचा परिणाम येथे उमटला आहे. जुन्या पिढीतले लोक त्यांना मानतात. गांधी, नेहरू, टागोर या त्यांच्या प्रेरणा आहेत. नव्या प्रेरणा तेथवर पोहोचविणे हेच यापुढचे काम आहे, असे प्रवासानंतर माझे मत बनले.

भारताच्या परराष्ट्र-नीतीबद्दलच्या धोरणाने पाश्चात्त्य जगात आता चांगलेच मूळ धरले आहे, याची जाणीवही परदेशच्या प्रवासात सातत्याने होत राहते. जागतिक लष्करी गटबाजीपासून अलिप्त राहून देशहिताच्या दृष्टीने स्वतंत्र निर्णय घेण्याचे धोरण पं. नेहरूंनी पुरस्कारले, त्या वेळी उलट-सुलट टीका होत राहिल्या. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तंटे तडजोडीच्या मार्गाने सुटावेत, असा भारतीय नेत्यांचा कळकळीचा प्रयत्‍न होता. पं. नेहरूंनी त्या दृष्टीने जे प्रयत्‍न केले, त्यामुळे जागतिक राजकारणात पंडितजींना आणि पर्यायाने भारताला मानाचे स्थान मिळाले. भारताला जागतिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने देशातील जनतेचा स्वाभिमानही द्विगुणित झाला.

पंडितजींच्या या स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणामुळे, परदेशांतील बड्या राष्ट्रांकडून भारताला मदतीचा ओघ सुरू राहण्यास मदत झाली आणि त्यामुळे देशाच्या अंतर्गत गरजा लक्षात घेऊन, आवश्यक ते आर्थिक धोरण भारताला आखणे शक्य झाले. अलिप्तवादी धोरणाबद्दल पाश्चात्त्यांचे काही आक्षेप होते, टिका केल्या जात होत्या. अमेरिकेचे मुत्सद्दी शंका व्यक्त करीत होते, तर रशिया सहानुभूती दाखवीत होता. तरी पण पं. नेहरूंनी जाणीवपूर्वक आपल्या धोरणाचा पाठलाग चालूच ठेवला. भविष्यकाळात या धोरणाला भरघोस पाठिंबा मिळेल, असे चिन्ह काही लोकांना दिसत नव्हते. आज मात्र पं. नेहरूंनी सुरू केलेली अलिप्तवादाची परराष्ट्रनीतीच योग्य असल्याचा पडताळा येऊ लागला आहे.

सध्या शंभरावर राष्ट्रे या धोरणाचे सभासद आहेत, काही देश पं. नेहरूंनाच या धोरणाचे उद्‍गाते मानतात. त्याचे प्रतीक म्हणून सार्वजनिक उद्यानांतून म. गांधी, पं. नेहरूंचे पुतळे त्यांनी उभारले आहेत. अविकसित देशांमध्ये अलिप्तता तत्त्वाचा स्वीकार आता झालेला आहे. एका अर्थाने याबाबत स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रांच्या निरनिराळ्या परिषदा होतात, त्या वेळी अलिप्तता तत्त्व मानणा-या राष्ट्रांच्या जोडीला बसण्यासाठी ‘आमच्या देशाला सभासद करून घ्या’ अशी मागणी पुढे येत राहिली आहे. या संदर्भात भारताला जागतिक क्षेत्रात मोठे काम करता येण्यासारखे आहे. तशी परिस्थिती निर्माण होत आहे. मला विविध देशांच्या भेटींमध्ये हे जाणवले. विकसनशील राष्ट्रांसमोर आज त्यांच्या देशान्तर्गत विकासाचे विविध प्रश्न उभे आहेत. विकासाच्या स्पर्धेत बड्या राष्ट्रांच्या जोडीला बसण्याची प्रत्येकाची ईर्ष्या आहे. विकास साध्य करून जनतेचे जीवनमान सुखी व्हावयाचे, तर विकासाच्या रथाला अडथळा प्राप्त होणार नाही, असेच जागतिक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता विकसनशील राष्ट्रांना आता मान्य असल्याचे दिसू लागले आहे.

प्रत्येक राष्ट्रातील अंतर्गत विषमता व राष्ट्राराष्ट्रांतील विषमता दूर करण्यासाठी व्यापार, उद्योगधंदे या आर्थिक क्षेत्रातील कार्यपद्धतीत मूलभूत फरक करून दुनियेतील संपत्तीची पुनर्वाटणी मानवी विकासासाठी झाली पाहिजे, असा प्राथमिक स्वरूपाचा प्रश्न जगापुढे अग्रहक्काने आहे. या प्रश्नाच्या उत्तरावर व त्याच्या अंमलबजावणीवर जागतिक शांतता व एका अर्थाने मानवाचे भवितव्य अवलंबून आहे.

विकसनशील राष्ट्रे या संदर्भात आशेने आणि विश्वासाने भारताकडे पाहत आहेत. चर्चा, वाटाघाटी, निरनिराळे आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक देवाण-घेवाणीचे करार घडत आहेत. परराष्ट्र नीतिसंबंधांत तत्त्वनिष्ठ, पण व्यवहारी धोरण भारताच्या नेतृत्वाने स्वीकारले असल्याने विकसनशील राष्ट्रांच्या मनात त्याने मूळ धरले आहे. मला वाटते, भारत या दृष्टीने ऐतिहासिक कामगिरी करू शकेल. पृथ्वीपर्यटनाने माझा हा विश्वास वृद्धिंगत झाला आहे.